Tuesday, June 29, 2021

संकल्प विकल्प रहित कृती


संकल्प विकल्प रहित होवून जगणे शक्य आहे काय? 

समाजात ज्ञानी व्यक्तीचा आदर राखला जातो. त्या ज्ञानी व्यक्तीचे अंतर्बाह्य जीवन काय आहे याची खातरजमा न करता केवळ तो किती शिताफीने पोपटपंची करीत असतो याकडे लोकांचे लक्ष असते. धर्मग्रंथांचे पाठांतरे करून त्यातील उतारे फेकून समाजाला बेवकुफ बनविता येते. साजेसा पोशाख घातला की महाराज सुद्धा सहज बनता येते. अशा तथाकथित ज्ञानी व्यक्ती केवळ पोथी पुराणे वाचून पुराणिक झालेले असतात त्यांना स्वतःचे यथार्थ ज्ञान झालेले नसते. स्वयं साक्षात्कार झालेला नसताना केवळ जुने ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करणे, नवीन ग्रंथ लिहिणे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार केला गेल्यामुळे समाजात अज्ञान पसरत असते. अज्ञानी त्यांच्या अज्ञानाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करण्यासाठी अज्ञान विकत असतात. अशा गोष्टी-वेल्हाळ व्यक्तीला ज्ञानी समजले गेल्याने समाज भरकटला जातो. समाजाचे भले करण्याच्या नादात आपण समाजाचे किती नुकसान करीत आहोत याचे कोणालाही भान राहत नाही. धार्मिक, अध्यात्मिक कल्पना अशा अज्ञानी व्यक्तींच्या अपप्रचाराने वृद्धिंगत होत असतात आणि कसलाही प्रचार प्रसार न करणारे खरे ज्ञानी आणि खरे ज्ञान झाकोळले जाते. सत्य म्हणजे काहीच नसणे होय आणि काहीच नसणे याचा प्रचार करता येत नाही. यामुळे जे अज्ञान असते ते समाजात बोकाळले जाते. 

कोणत्याही धार्मिक - अध्यात्मिक - सामाजिक संकल्पना शिवाय जगता येवू शकेल काय? समाजात अगोदरच रीती रिवाजांच्या असंख्य संकल्पना रुजलेल्या असतात. संकल्पना नुसार समाज कृती करीत असतो. 

आत्ताच्या वर्तमानात जगायचे असेल तर फक्त आत्ताच्या क्षणाच्या गरजेनुसार त्या क्षणाची कृती असायला हवी. तेव्हाच आपण संकल्पना रहित जीवन जगू शकतो. यासाठी आत्ताच्या क्षणाशी सतत सावधान आणि जागरूक असायला हवे. आपण आणि आपल्या कल्पना यांचे द्वैत नसले की विसंवाद उत्पन्न होत नाही. जेथे विसंवाद असतो तेथे प्रयत्न करावे लागतात. नदीच्या प्रवाह सारखा जीवन प्रवाह असतो त्या प्रवाह बरोबर सहज जगता येते. परंतु जीवन प्रवाह विरुद्ध जगताना त्रास, दुःख सहन करावे लागतात. म्हणजे आपले जीवन खडतर का असते तर आपण मानसिक कल्पनासाठी कृती करीत असतो आणि ते जीवन प्रवाहाशी विसंगत असते. 

जीवन प्रवाह बरोबर प्रवास करता येत नाही याचे कारण आपण आपल्या कल्पनांचे हवेत पुल बांधून त्यावरून जात असतो. प्रवाह आणि पुल दोघे सहसा एकमेकांना भेटत नाहीत. जीवन प्रवाह समजण्यासाठी एकतर कल्पनांचे पुल कोसळायला हवेत किंवा प्रवाहात महापूर यायला हवा. यासाठी महापुरुष जीवनात दुःख मागतात.

जीवन जगण्यासाठी सतत कृती आणि कार्य करीत राहावे लागते. कार्य करताना ते जीवनाशी विसंगत असेल तर ते योग्य कार्य नसते. विसंगती निर्माण करणारे मानसिक, काल्पनिक कार्य हे आपल्या मी पणाच्या अज्ञानातून निर्माण होत असतात. मी चे अज्ञान आपणास स्वतः शोधावे लागते. ते दुसऱ्याकडून शिकता येत नाही. मी म्हणजे स्मृतींचा प्रतिसाद असतो, तो भूतकाळात असतो. तो कधीच वर्तमानकाळ अनुभवू शकत नाही. त्यामुळे त्याच्या सर्व कल्पना ह्या भूतकाळातील असतात. याचे ज्ञान झाले तरच आपण मी शिवाय, मी पणाच्या कल्पना शिवाय जगू शकतो. मी सोडून जे इतर अनंत जीवन आहे त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. त्या अनंत जीवनाच्या ऊर्जेच्या संपर्कात असताना जे सहज कार्य होते ती योग्य कृती असते, ती योग्य कृती जीवनाशी विसंगत नसते, आणि सहज होत असल्याने प्रयत्नांची आवश्यकता नसते. प्रयत्न आणि विसंगती यांच्या संघर्षामध्ये, त्यांच्या सततच्या विचाराने मेंदू थकला जातो. व्यक्तीचे वय लहान असले तरी जुनाट विचाराने ते वयस्कर वाटतात.

जीवन जगण्याची ही सहज वृत्ती नसेल तर मनुष्य जीवन जगत नसतो तर तो त्याच्या मनाने बनविलेल्या कल्पनांचा पाठलाग करीत असतो. मी आणि त्याच्या संकल्पनांचे जीवन अतिशय संकुचीत असते त्या उलट त्यांच्या शिवायचे जीवन अनंत ऊर्जेने भारलेले असते. त्या अनंत जीवनाची सर मानवी शब्दात पकडता येत नाही.

The Collected Works of J. Krishnamurti -Volume XIV 1963-1964: The New Mind

(October 25, 1964.)




Friday, June 25, 2021

विचार म्हणजे नेमके काय असते?

 


आपला मी आणि मी जे सतत विचार करीत असतो त्यांचे खरे स्वरूप समजले तर आपणास आपल्या जीवनाचे खरे स्वरूप समजू शकते म्हणजेच सत्य आकलन होवू शकते. 

कॅसेट् प्लेअर येण्यापूर्वी सीडी सारखी मोठी तबकडी असणारा ग्रामोफोन प्लेअर होता. ती तबकडी गोल फिरत असायची आणि त्यावर एक पिन ठेवली जायची. तबकडीवर रेकॉर्ड केलेले गाणी ती पिन read करायची आणि स्पीकर मधून ते गाणे वाजले जायचे. हीच पद्धत कॉम्प्युटर मधील बंदिस्त hardisk या memory storage device मध्ये असते. हार्ड डिस्क मधील माहिती कॉम्प्युटर आपणास हवी तशी पुरवीत असतो. माहितीची ही देवाण घेवाण करणारी जी यंत्रे मानवाने बनविली आहेत ती सर्व यांत्रिक आहेत. म्हणजे यांत्रिक पद्धतीने आपण माहितीची देवाण घेवाण करू शकतो, माहिती साठवणूक करू शकतो. अगदी अशीच यंत्रणा आपल्या मेंदूमध्ये असते. आपल्या पूर्वजांनी जन्मतः दिलेली माहिती अधिक आपल्या लहानपना पासूनची सर्व माहिती आपल्या मेंदूमध्ये साठविलेली असते. ज्यावेळी जी माहिती मी याला हवी असेल त्यावेळीं ती माहिती आपल्या मेंदूमधील स्मृती मधून आपल्या मी ला पुरवली जाते. यालाच आपण विचार करणे असे समजतो. म्हणजे आपल्या विचाराची प्रक्रिया ही कॉम्प्युटर सारखीच यांत्रिक - तांत्रिक असते. 

मी हा सुद्धा आपल्या स्मृती मधील विचार असतो. ज्यावेळी आपणास कोणी काही विचारीत असतो त्यावेळी त्याचे उत्तर देण्यासाठी आपल्या स्मृती मधील माहिती संग्रहा मधून एक तात्पुरता announcer / उदघोषक तयार केला जातो. हा उदघोषक म्हणजे आपला मी असतो. अनुभव आणि माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी हा तात्पुरता तेव्हढ्या साठी मी नावाचा उदघोषक उत्पन्न होतो. व्यवहारीक गोष्टी करण्यासाठी, शरीराच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठीच्या विचारांसाठी हा मी तात्पुरत्या सोयीसाठी हवा असतो. परंतु एकदा मी निर्माण झाल्या नंतर त्याला जास्तीत जास्त काळ अस्तित्वात राहण्याची इच्छा तयार होते. त्याच्या या इच्छे पूर्ततेसाठी तो इतर अनेक इच्छा तयार करीत राहतो. तो फक्त इच्छा तयार करून थांबत नाही तर त्यासाठी इतर अनेक भावना, संकल्पना, श्रद्धा यांनाही तोच जन्माला घालतो. 

मी हा एक विचार आहे, त्याने बनविलेल्या सर्व इच्छा, आशा, आकांशा, भावना, संकल्पना, श्रद्धा हे सर्व विचार आहेत. आणि सर्व विचार हे तांत्रिक आहेत. 

राग येवुन गेल्या नंतर आपणास ते समजते, त्यावेळी राग आणि मी एकच असतात म्हणून मी ला नंतर समजते. नंतर समजणारी गोष्ट ही भूतकाळ असते, ती वर्तमानकालीन असू शकत नाही म्हणजेच ती जिवंत नसून मृत झालेली असते. आपले विचार हे सर्व भूतकाळातील मृत विचार असतात आणि तेच आपल्या संघर्षमय जीवनास कारणीभूत असतात. 

आपले जुने कोणतेही विचार हे वर्तमानाला कदापिही जानु शकत नाहीत म्हणून सर्व पारंपरिक ज्ञान आणि त्यांचे गुरू सत्याचे आकलन करण्यात सपशेल अयशस्वी होतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते सगळे विचार, ज्ञान आणि परंपरा ह्या स्मृती मधून तयार झालेले केवळ भास आहेत. मी आणि मी चे भास म्हणजे तथ्य नव्हेत, सत्य तर कदापिही नव्हेच. म्हणून मी म्हणजे आत्मा वगैरे केवळ कल्पना आहेत. 

ज्यावेळी आपण रागावतो तेव्हा नेमके कोण रागावते? आपल्या मी चे विचार दुःखी झाले की ते रागावतात. मी हा एक भास आहे, ते भास रागवण्याचे भास तयार करतात. प्रत्यक्षात तिथे इतर कोणीच रागावण्यासाठी नसते. इतर विचारापासून मी हा विचार वेगळा होतो आणि तो द्वैत निर्माण करतो. मी आणि इतर अनुभव आणि त्यांचे विचार अशी भासामध्ये विभागणी होते. आणि जेथे मानसिक विभागणी होते तेथे संघर्ष अटळ असतो. उदा. दोन धर्म, दोन देश, दोन संस्कृती वगैरे.  

शरीराचे संरक्षण, संवर्धन यासाठी विचार आवश्यक असतात परंतु या भौतिक गरजांचे आपला मी त्याच्या मानसिक संकल्पना बनविण्यात यशस्वी झाला आहे. उदा. आपल्या संरक्षणार्थ समाज / धर्म / देश अशा संकल्पना आपल्या मी याने बनविल्या आहेत. परंतु दोन गटामध्ये हिंसाचार होवून मूलभूत संरक्षण धोक्यात येते. 

मी आणि त्याचे विचार यांचे यथार्थ ज्ञान झाले तर जीवन मानसिक संघर्षातून निवृत्त होवून नैसर्गिक सहजीवनात बदलू शकते, आणि ते सहज शक्य आहे.

Thursday, June 24, 2021

नैसर्गिक ध्यान

 

आपण आपली वर्तमानातील कामे सोडून टीव्ही समोर बसून आपले मनोरंजन करीत असतो. टीव्ही वरील सर्व कार्यक्रम हे भूतकाळा मध्ये तयार केलेले असतात, अनेकदा त्यांचे repeat telecast केलेले असतात. टीव्ही केंद्रात असे असंख्य कार्यक्रम साठविलेले असतात. 

भूतकाळात होवून गेलेल्या घटना पासून आपण जेव्हा आपले मनोरंजन करत असतो तेव्हा आपले वर्तमान कालाकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेले असते. वर्तमान काळातील समस्यांकडे आपले लक्ष जावू नये म्हणून सुद्धा अनेकदा टीव्ही वर जास्त मनोरंजक कार्यक्रम दाखविले जातात.

अगदी असेच आपल्या अंतरंगात होत असते. आपले मन सतत आपणास मेंदूच्या समृतिमध्ये साठविलेल्या जुन्या घटना दाखवित असते, त्यावर मन सतत विचार करीत असते. जुन्या घटना पाहताना आणि त्यावर विचार करीत असताना त्याचवेळी ते मन भविष्य काळातील योजना सुद्धा बनवीत असते. मनातील सततच्या विचारामुळे आपणास वर्तमानकाळ कधीच समजत नाही. तो समजुच नये यासाठी मनाला अधिक मनोरंजक अशा श्रद्धा, भक्ती, साधना यांच्या आहारी केले जाते. 

ज्या ज्या वेळी आपण अवांतर विचार करीत असतो त्या त्या वेळी आपल्या मेंदूमध्ये त्या अवांतर विचारांची फिल्म फिरत असते. या फिल्म मुळे आपले वर्तमानाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत राहते. या फिल्म मधून जर आपल्या भावना उत्तेजीत केल्या जात असतील तर त्याची नशा होवून जाते आणि मग आपण त्या फिल्म शिवाय जगू शकत नाही. 

आपले नैसर्गिक जीवन आणि आपले मानसिक जीवन यामधील हा फरक आहे. आपले मानसिक जीवन हे तथ्य नसून ते काल्पनिक आहे हे लक्षात येणे खूप महत्वाचे आहे. 

काल्पनिक जीवनाची नशा उतरवायची असेल तर नशा चढविनाऱ्या ज्या श्रद्धाच्या गोष्टी परंपरा सतत सांगत असतात त्यांचा त्याग करायलाच हवा आणि नैसर्गिक जीवनात स्थिर होण्यासाठी जे काही आपण आता वर्तमानात कार्य करीत असतो त्याच्या कडे सतत लक्ष देत राहणे, वर्तमानाचा योग करीत राहणे अगत्याचे आहे. 

त्याग कशाचा करायचा आणि योग कशाचा करावयाचा याचे सतत स्मरण ठेवणे म्हणजे खरे ध्यान होय.


Tuesday, June 22, 2021

भिती

 


भिती कशी तयार होते आणि ती कशी नाहीशी करावी?

मानव प्राणी हा सतत भीती खाली वावरत असतो. मृत्यू, आजार, वृद्धत्व, अपघात, एकटेपणा, अंधार, आपण कोणीच नसण्याची भीती, नोकरी - व्यवसायात मोठे यश न मिळण्याची भीती, नेता नसण्याची भीती अशा वेगवेगळ्या गोष्टींची भीती आपणास सतावत असते. 

अनेकांना भीतीची जाणीव असते तर काही जण आपला न्यूनगंड लपविण्यासाठी आपण खरे कोण आहोत, आपणास कशाची भीती आहे याचा विचारच करीत नाही. या गोष्टी त्यांच्या जाणिवेत सुद्धा नसतात. आणि जर अशा गोष्टी लपविलेल्या असतील तर त्या उघड कशा होणार? 

भीतीची संपूर्ण रचना आकलन करून घेणे अगत्याचे आहे, केवळ २-३ मिनिटे ऐकून नंतर ते विसरून जाण्यासारखे नाही. 

भीतीचे मूळ सापडले तर तिच्या विविध प्रकारावर उपचार करण्याचा वेळ आणि श्रम वाचविता येतील. 

भीतीचे द्रष्टा आणि दृष्य एक आहेत या द्वारे अवलोकन केले तर भीतीचा समूळ उच्चाटन करता येणे सहज शक्य आहे. 

उदाहरणादाखल आपण एकाकीपण मधून निर्माण होणाऱ्या भीतीचे अवलोकन करू यात. एकाकीपणा हे वास्तविक आहे की ती एक कल्पना आहे. एखादी व्यक्ती खरीच एकटी असते तर दुसरी व्यक्ती गर्दीमध्ये असून सुद्धा स्वतःला एकटी समजते. दोघांना त्या एकटेपणाची भीती वाटत असते. भिती खरी आहे की भीतीची केवळ कल्पना केलेली आहे याचा आपण विचार केलेला असतो काय? कारण बऱ्याचदा भीती ही केवळ मानसिक असते. 

समजा आपली एकटेपणाची भीती हि कल्पना नसून वास्तविक आहे तर एकटेपणा म्हणजे नेमके काय? 

एकटेपणाची भीती निर्माण होण्यास आपली स्वकेंद्रित वृत्ती, केवळ स्वतःचा विचार करणे, स्वतःचे पुढे पुढे करणे, स्वतःची मते, वैयक्तिक स्वप्ने, दृष्टिकोन, मानमरातब, महत्त्व स्वतःकडे घेणे आदि कारणीभूत असतात. हे सर्व आपणास अप्रत्यक्षरीत्या एकाकी करत असतात हे आपल्या लक्षात येत नसते. दररोज वर्षानुवर्षे आपण हे करत आलो आहोत आणि अचानक आपल्याला आढळून येते की आपण पूर्णपणे एकटे आहोत. एकटेपणाची तीव्र भावना मधून भीती निर्माण होते. 

भीतीची भावना कोणाला होत असते? आपल्या मी याला. आपला मी आणि आपली भीती हे वेगवेगळे असतात अशी मी याची समजूत झाल्याने मी भीती घालविण्यासाठी प्रयत्न करतो अथवा पलायन करतो. आपला मी आणि आपली भीती यांच्या मधील संबंध जर आपल्या लक्षात आला तर दोघांचे मूळ उलगडू शकते आणि त्या साक्षात्कार मध्ये दोघांचे भ्रम नाहीसे होवू शकतात. 

आपण भीती या अनुभवाचे सूक्ष्म अवलोकन केले तर आपला मी म्हणजे भीती आणि भीती म्हणजे मी हे लक्षात येते, ते दोघे एक असल्यामुळे भीती पासून मी पलायन करू शकत नाही, तो भीती टाळू शकत नाही. मी कोणतीही साधना करून, सत्कर्म करून, गुरूकडे जावून अथवा देवाची प्रार्थना करून भीती पासून वेगळा होवू शकत नाही. मी आणि मी याने बनविलेली भीतीची मानसिक कल्पना हे दोघे एक आहेत, दोघेही काल्पनिक आहेत, दोघेही भ्रम आहेत हे अवलोकन केल्या नंतर लक्षात आले तर? ना मी उरतो आणि ना त्याची भीती उरते.

मी आणि भीती एक कसे असू शकतात?

आपली भीती म्हणजे आपणास भीती विषयक असणारी पूर्व माहिती होय. ही पूर्व माहिती आपल्या मेंदूच्या स्मृतीमध्ये वर्षानुवर्षे साठवीलेली असते. म्हणजे भीती हि एक प्रकारे स्मृती मधील केवळ माहिती होय. आपला मी हा या स्मृतींचा प्रतिनिधी असतो, स्मृतींचा प्रतिसाद असतो, तो स्मृती मध्येच तयार होत असतो, म्हणून मी सुद्धा स्मृतींचा एक भाग आहे. भिती आणि मी हे दोघे स्मृतींचा भाग आहेत म्हणजे ते दोघे एक आहेत. 

मी आणि मीची भीती हे वेगवेगळे नसून एकच आहेत, ते दोन्ही स्मृती आहेत, ते भूतकालीन आहेत याचे यथार्थ आकलन झाले तर आपण मी आणि त्याची भीती या द्वैत भावने मधून मुक्त होतो. मी आणि मिची भीती हे एकच आहेत याच्या आकलनामधून आपण दोघांचा होणारा संघर्ष टाळू शकतो, भीतीच्या समग्र भावनांचे उच्चाटन करू शकतो. 

एकाकीपणाच्या एका भीतीद्वारे आपण समग्र भीतीची मध्यवर्ती वस्तुस्थिती पाहू शकलो. भिती ही मी पणाच्या अस्तित्वामुळे आहे. मी आहे म्हणून मी याच्या भीती सारख्या अनेक संकल्पना आहेत. मी पणाची भावना नसेल तर भीती सारख्या भावना नसतील. 

आपण आपल्या शिक्षण, संस्कार यातून मीपणा जतन करीत असतो. मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, मी अमका आहे, मी तमका आहे यातून आपण मी पणाचे संगोपन करीत राहतो. 

आपण “मी” शिवाय या मी च्याच जगात राहू शकतो काय? जेव्हा आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर “मी” चा शिक्का असतो : संस्कृती, सभ्यता, कला, व्यवसाय, राजकारण, धर्म, आपल्या सभोवतालच्या या प्रत्येक गोष्टीद्वारे आपणास सतत ठामपणे सांगितले जाते की, ‘मी व्हा’ - ‘मी’ वाढवा. अशा मानवी संस्कृतीत किंवा सभ्यतेत ‘मी’ शिवाय कोणी जगू शकेल काय? अध्यात्मिक म्हणतात की ते शक्य नाही, म्हणून ते जगापासून दूर पळतात, मठात राहतात, आपले नाव बदलतात, ते आपले जीवन अज्ञातास समर्पित करतात. परंतु “मी” अजूनही तेथे आहे कारण “मी” आणि ईश्वर यांच्या प्रतिमेसह मी स्वतःची ओळख जिवंत ठेवतो. “मी” वेगळ्या अध्यात्मिक रूपात अजूनही जिवंत राहतो.

तर मग एखादी व्यक्ती मी” शिवाय जगू शकते काय? - कृपया, हा एक अत्यंत महत्वाचा आणि अतिशय गंभीर प्रश्न आहे, हे केवळ एक चर्चेची गोष्टच नाही - या राक्षसी जगात कोणीही “मी” शिवाय जगू शकेल का? म्हणजेच वेडेपणाच्या जगात एखादा शहाणा माणूस जगू शकतो का? आस्तिक, श्रद्धाळू आणि धार्मिक जगात सर्व वेडे आहेत. तुम्हाला जे काही घडत आहे ते माहित आहे, मी तुम्हाला ते सांगत बसत नाही. 

 https://kfoundation.org/the-root-of-fear





Sunday, June 20, 2021

सुव्यवस्था

आपले घर, आपल्या व्यवसायाची जागा, आपला परिसर हे व्यवस्थित राखण्यासाठी तेव्हढी बुद्धिमत्ता आणि तेव्हढी जबाबदारीची काळजी असणे आवश्यक असते.

म्हणजे सुव्यवस्थित अवस्था असण्यासाठी intelligence आणि compassion हे अंगभूत असणे आवश्यक असते.

Compassion, intelligence हे उसने आणता येत नाही, विकत घेता येत नाही, ते मानसिक रित्या तयार करता येत नाही. त्यासाठी गुरु आणि त्यांचे courses करून ते शिकता येत नाही. 

आपले जीवन सुव्यवस्थित नाही आणि ते सुव्यवस्थित असलेच पाहिजे याची जाणीव होणे हीच ती अंतर्दृष्टी / आकलन असते ज्यामुळे परिवर्तन शक्य असते. 

संपूर्ण विश्व हे कमालीचे सुव्यवस्थित (in order) आहे. या सुव्यवस्थित अवस्थेचे स्वतःचे अंगभूत असे Intelligence असते आणि ते विश्वातील सर्वांची काळजी घेत असते.

आपला वैयक्तिक मी हा हजारो वर्षांच्या मानवी संस्कृती चा प्रातिनिधिक भाग आहे. मानव समाजाची जी धारणा असते तीच आपल्या मी याची धारणा असते. मी याच्या मानवी धारणेला त्यांच्या अंगभूत अहंकार मुळे वैश्विक सूव्यवस्थेचे आकलन होणे शक्य नसते. त्यामुळे मानवी अहंकार हा त्याची स्वतःची वेगळी मानसिक व्यवस्था ( disorder ) निर्माण करीत असतो. ज्या व्यवस्थेचा पाया हा विभाजन, अहंकार आणि मी असतो ती व्यवस्था कधीही सुव्यवस्था होणे शक्य नसते. मानवी अहंकार मधून बनलेल्या सर्व मानवी व्यवस्था मध्ये संघर्ष अटळ असतो. 

जी व्यक्ती प्राधान्याने आपले जीवन सुव्यवस्थित करते म्हणजे स्वतःमधील सर्व मानवी धारणा नाहीशा करते त्यावेळीच तो वैश्विक सुव्यवस्थेशी सहजरीत्या जोडला जातो. विश्र्वा मध्ये सुव्यवस्था आहे फक्त मानवी मनाला त्याच्या अव्यवस्थेमुळे ती कळत नाही. 

आपल्या मानसिक धारणांच्या मानसिक धरणाने आपण आपला जीवन प्रवाह कोंडून ठेवला असतो. मी ची भिंत नाहीशी झाली की सर्व काही सुव्यवस्थित होते. 

Order बाबतचे J Krishnmurti यांचे विचार खालील व्हिडिओ मध्ये आले आहेत.

https://youtu.be/mxoe9IrLdfo



Monday, June 14, 2021

ध्यान

 


ध्यान कसे करावे? ध्यान करताना सुद्धा विचार थांबत नाहीत, मग विचारशून्य अवस्था कशी प्राप्त करावी? 

विचारशून्य अवस्था म्हणजे अजिबात विचार नसणे असे समजले जाते. त्या ऐवजी ते अनावश्यक विचार नसणारी अवस्था असे समजावे. 

विचार नाहीत हे कोणास समजते? विचारांना. विचार नसतील तर ते समजू शकत नाही. आपण विचारपूर्वक जे विचार करतो तेच आपणास समजतात. इतरवेळी आपला मेंदू जे काही विचार करीत असतो ते सजग विचारांना समजत नाही. आणि त्याही पलिकडील अशी निर्विचार अवस्था असते तिचा आपणास पत्ता लागू शकतं नाही. 


जीवन जगण्यासाठी विचार आवश्यक आहेत, त्याला आपण जीवनावश्यक विचार म्हणुया. परंतु इतर असंख्य अवांतर विचार आहेत त्यामुळे मेंदू वर प्रचंड ताण येतो ते अनावश्यक विचार काढणे आवश्यक ठरते.

विचारशून्य होण्यासाठी ध्यान साधना करताना सुद्धा विचार येतात. ध्यान करताना आपण येणाऱ्या विचारांकडे लक्ष ठेवून त्या वेळी आपण थोडेफार विचार कमी करू शकतो. जसे लहान मुलांवर लक्ष ठेवले की तेव्हढा वेळ मुले अवखळपणा कमी करतात. तसे ध्यान करताना जे विचार येतात ते कोठून येतात, कोण विचार करीत आहे, थोडा वेळ शांत बसता येत नाही काय? असे प्रश्न विचारीत राहिलो की विचारांवर त्या वेळी काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. विचारांवर लक्ष ठेवणे याला ध्यान समजले जाते. मंत्र म्हणणे सुद्धा विचार आहे. श्वासावर लक्ष दिले तर श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम असा नैसर्गिक नाद तयार होतो, त्याला संप्रदायीक मंत्र बनविला गेला आहे. 

सतत विचार करणे हा मनाचा स्थायी स्वभाव आहे (default mode of mind). त्या सततच्या विचारांना शक्य होईल तसे अटकाव करणे (धारणा / धरण) आपणास सहज शक्य आहे.

ध्यान केले अथवा नाही केले तरी दिवसभर आपण जे काही कार्य करीत असतो त्यावेळी फक्त त्या कृतीचा विचार करावा. त्या वेळी इतर विचार येवू देवू नये. याला निरपेक्ष सजगता असे  म्हटले जाते. 

जीवनावश्यक विचार आले तरी चालतील परंतु अनावश्यक विचार येवू न देण्यासाठी आपण आपल्या अनावश्यक सवयी बंद करायला हव्यात. अनावश्यक सवयी आपणास अनावश्यक विचार करण्यास भाग पाडतात.

जसे की राजकारण, समाजकारण, टीव्ही, चित्रपट, कथा, कादंबऱ्या, शेजाऱ्यांच्या कुचाळक्या आदि विषय बंद केले तर किती प्रमाणात आपण विचार कमी करू शकतो. तेव्हढा बोजा आपण मेंदूचा कमी करीत असतो. 

एकदा वरील अवांतर विषय कमी झाले की आपण आपल्या कुटुंबात, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यामध्ये नसल्या सारखे राहू शकतो (संन्यास). विचार अजून कमी होतील, मेंदूचा बोजा अजून कमी होईल.

या नंतर देव, देश, धर्म, जात, संप्रदाय, गुरु, ग्रंथ आदि सर्व संकल्पना जर सोडता आल्या तर विचार अजून कमी होतील, मेंदू अधिक मोकळा होईल (वानप्रस्थ).

वरील सर्व गोष्टी आणि इतर अनेक गोष्टी आपण स्वतः पकडून ठेवल्या आहेत आणि तरीही thoughtless, peaceful होण्यासाठी परत साधना कोणत्या कराव्यात, कशा कराव्यात याच्या विचारांची भर टाकतो. मनाचा हा चतुरपणा सहसा लक्षात येत नाही.

आपला मी म्हणजे आपला पूर्व माहिती संग्रह, सर्व संकल्पना त्या बाबतचे सर्व विचार आहेत आणि त्या सर्व विचारांचा प्रतिनिधी असलेला मी हा विचारांपासून वेगळा होवू शकत नाही. 

वरील सर्व गोष्टी टाळता येत नसतील, बंद करता येत नसतील तर आपण फक्त जीवनावश्यक काय आहे आणि अनावश्यक - अवांतर काय आहे याचा शोध घ्यावा. मी म्हणजे नेमके काय आहे याचा शोध घ्यावा. 

आपला नशिला मी तसे करू देत नाही. नशा सुरू करता येतात पण बंद करणे मी ला जमत नाही. नशा सोडणे जितके अवघड आहे तितके मी पण सोडणे अवघड आहे, परंतु अशक्य नक्कीच नाही. जो जीव ते सोडल्या नंतरचे हलाहल अवस्थेचे प्राशन करतो तोच शिव होतो.





Sunday, June 13, 2021

विश्वाचे आर्त - २

 


विश्वाचे मूळ अधिष्ठान

प्रश्न: जे अज्ञात तत्व आहे त्याला पारंपरिक तत्वज्ञानाने निर्गुण, निराकार, विश्वाचे अधिष्ठान, ब्रम्ह असे संबोधले आहे. 

कृष्णमूर्ती: नाही, आपणच मला सांगितले होते की जे अज्ञात आहे ते विचारांनी तयार केलेले नाही, म्हणून त्याला आपण अज्ञात असे म्हणतो. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही विचारांच्या आधारे अज्ञाताचा शोध घेऊ शकत नाही. एकजण कृष्णाला भजतो, दुसरा जिजस, तिसरा मुहम्मद, बौद्ध, महावीर, नानक अशांचे पाठीराखे वेगवेगळ्या मान्यता मानतात, आणि ते एकमेकांच्या दैवतांचा तिरस्कार करतात. ज्यांनी जीजस यांचे नाव ऐकले नसेल त्यांना त्याचा अनुभव येत नाही, तीच गोष्ट इतर प्रेशीतांची. एक विचारी मनुष्य म्हणून मी सर्व श्रद्धा स्थानांचा विचार करीत नाही. 

प्रश्न: जगतील बहुतेक धर्म असे सांगतात की जो विश्वाचा मूळ आधार आहे तो ईश्वर आहे आणि तो निर्गुण, निराकार, ब्रम्ह असून अनुभवात येत नाही मग आपण काही वेगळे सांगत आहात काय?

कृष्णमूर्ती: त्यांची चतुराई आपल्या लक्षात येत नाही. ते एकीकडे असे सांगतात की ते जे काही अज्ञात आहे त्याचे शब्दाने वर्णन करता येत नाही आणि दुसरीकडे त्या अज्ञाताची वर्णने करण्यासाठी असंख्य ग्रंथ लिहितात! ग्रंथात लिहिल्या प्रमाणे आपला मी ते जाणण्याचा प्रयत्न करतो ते सुद्धा विचारानेच ना? ते जे असिमित अज्ञात आहे ते ग्रंथ कर्ता आणि वाचक यांच्या संकुचित विचारा मध्ये येवू शकेल काय? 

प्रश्न: मग आपण त्या बद्दल विचारच करू नये काय?

कृष्णमूर्ती: आपण सर्व धर्माचा अभ्यास केला आहे, सर्व शोधण्याचा प्रयत्नही केला आहे परंतु ते सर्व फक्त शब्द आहेत. जिज्ञासू माणूस म्हणून मला ते शोधणे भाग आहे. मानवी मेंदू हजारो वर्षे झाले तो कधी हिंदू होतो, कधी मुस्लिम, कधी ख्रिश्चन असतो परंतु या सर्वांचे मूळ श्रद्धा आहेत, त्याचे वरील आवरण वेगळी आहेत परंतु आतमध्ये सर्व श्रद्धा आहेत. 

डीबी: म्हणजे या सर्व धार्मिक श्रद्धाच्या विचाराद्वारे हे विश्वाचे मूळ अधिष्ठान नावाचे खूळ मानवी मेंदूमध्ये पेरले गेले आहे. धर्म, धार्मिक ज्ञान आणि विचारांच्या माध्यमातून आणि इतर विविध मार्गांनी लोकांनी निर्माण केलेली ब्रम्ह हि केवळ कल्पना आहे आणि प्रत्यक्षात तसे काहीच नाही असेच ना?

कृष्णमूर्ति: नक्कीच. मग अशा काल्पनिक ब्रम्ह आणि मानवी मनामध्ये काही संबंध असावा काय? 

DB: मानवी मन हे एक भ्रम आहे आणि वैश्विक आधाराची कल्पना असलेले ब्रम्ह हे त्या मनाचा भ्रम आहे. 

कृष्णमूर्ती: हिंदू असे म्हणतात की देव तुमच्यात आहे, जे सर्वोच्च तत्व आहे ते ब्रह्म तुमच्यात आहे, ही एक सुंदर कल्पना आहे. मी त्या सर्व शब्दांच्या प्रकारातून गेलो आहे.

आपले मन हे सर्व भ्रमाचे मूळ अधिष्ठान आहे, मन हे सर्व मानसिक कल्पनांचे केंद्र आहे. हे केंद्र सर्व गैरवर्तन, सर्व मानसिक निष्कर्ष, सर्व भ्रम, सर्व साधना, सर्व प्रयत्न, सुख दु:ख यास हे मनाचे मी नावाचे केंद्र कारणीभूत आहे. या मनाचा भ्रम निरास होणे अत्यावश्यक आहे. मनाचा विस्फोट होवून त्यामध्ये त्याचा विनाश होणे गरजेचे आहे. हजारो वर्षांच्या मानवी प्रयत्नाने ते गेले नाही. 

जसा चांगुलपणा आणि वाईटपणा यांचा सुतराम संबंध नसतो तसे प्रत्यक्ष जीवन आणि मानसिक कल्पना यांचा काहीच संबंध नसतो.

( उदाहरण: नदी सारखे नैसर्गिक प्रवाही आपले जीवन असते. आपण विचार करून त्या नैसर्गिक नदी प्रवाहावर ज्ञानाचे पुल बांधतो. पूल इतका सोईचा होतो की आपण मूळचा नदी प्रवाह विसरून जातो. पूल हा कधीच नदीस स्पर्श करीत नाही म्हणजे वैचारिक / मानसिक जीवन हे कधीच नैसर्गिक जीवन समजून घेत नाही.

ज्यावेळी नदीस महापूर येतो तेव्हा ती नदी जसा तो पुल ढासळून टाकते तसे आपल्या जीवनात वादळे आली की आपल्या सर्व मानसिक सुरक्षेच्या कल्पना ढासळतात आणि आपण उघडे पडले जातो. त्या अवस्थेत नैसर्गिक जीवनाचा अर्थ कळू शकेल.)

डीबी: होय, जर आपण असे म्हणत असाल की एका अर्थाने मी चे केंद्र हा एक भ्रम आहे आणि जे सत्य आहे त्याच्याशी भ्रम संबंधित असू शकत नाही कारण भ्रमातील सामग्रीशी जे सत्य आहे त्याचा काही संबंध असू शकत नाही.

कृष्णमूर्ती: तेच, ते तसेच आहे. हा एक खूप महत्वाचा शोध असल्याचे पहा. मी ला त्या मूळ अधिष्ठान याच्या बरोबर संबंध प्रस्थापित करायचा आहे. मी नामक छोट्या गोष्टीला त्या विशालतेशी संबंध जोडण्याची इच्छा आहे. ते होवू शकत नाही.

डीबी: होय, ते ब्रम्ह केवळ त्याच्या विशालतेमुळेच नाही तर खरं तर ती गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीच. 

कृष्णमूर्ती: एखादे गंभीर असणारे मानवी मन जे अनेक वर्षांपासून भ्रमात जगत होते त्याला जर या सत्याचे आकलन झाले तर त्याचा विस्फोट होवून त्या मनाचा विनाश होवू शकतो. 

प्रश्न: विज्ञान सुद्धा असे सांगते की मन हि एक कल्पना आहे, भ्रम आहे.

कृष्णमूर्ती: नाही, विज्ञान असे म्हणते की आम्ही भौतिक जगताचे संशोधन करीत भविष्यामध्ये जगाच्या उत्पत्तिकर्त्याचा शोध लावू शकू. शास्त्रज्ञ म्हणतात, 'या सगळ्या पलीकडे काही आहे की नाही हे शोधण्यासाठी आम्ही पदार्थ, मानवी मेंदू आणि त्या सर्वांचा अभ्यास करीत आहोत.' 

प्रश्न: ईश्वर आहे अथवा नाही हे समजल्या शिवाय त्याला नाकारून फारसा फरक पडताना communist देशात दिसत नाही.

डीबी: जोपर्यंत मनाचे केंद्र असेल आणि त्या केंद्रात गोंधळ असेल तोपर्यंत आपण ते मन योग्य मार्गाने वापरु शकत नाही.  मला वाटते की हे सांगणे अधिक अचूक होईल की त्या गोष्टींमध्ये एक महान संभावना होती परंतु जोपर्यंत त्याचा केंद्रावर परिणाम होत नाही तोपर्यंत ते सर्व निरर्थक आहे.

कृष्णमूर्ती: जर आपले मन त्याच्या सर्व मानसिक संकल्पना, सर्व मानसिक श्रद्धा सोडू शकले तर तेच मूळ आधार बनू शकते नवीन समाज रचना करण्यासाठी. 

डीबी: होय. मला असे वाटते की आपण असे म्हणू शकतो की आपण पूर्व ज्ञानाद्वारे जे अज्ञात शोधत असतो ते पूर्व ज्ञान हेच आपल्या मार्गात अडथळा बनत असते.

कृष्णमूर्ती: जीवनावश्यक तांत्रिक ज्ञान मिळविण्या ऐवजी मानवाने अनावश्यक धार्मिक ज्ञान संकल्पना का बनविल्या असाव्यात? 

David Bohm: असे दिसते की अनावश्यक ज्ञानाच्या द्वारे एका अभेद्य भ्रामक ब्रम्ह वस्तूची निर्मिती मुद्दाम केली गेली असावी. 

कृष्णमूर्ती: याचा अर्थ प्राचीन संत, तत्ववेत्ता, यांनी आपणास ज्ञान दिले आणि त्या ज्ञानाद्वारे कपोकल्पित अज्ञात ब्रम्ह शोधण्यासाठी आपणास प्रोत्साहित केले?

प्रश्न: समाजा मधून अंधश्रद्धा कमी करण्यासाठी तसे मुद्दाम केले असावे काय?

कृष्णमूर्ती: नाही. छोट्या अंधश्रद्धा घालविण्यासाठी कोणी मोठ्या ब्रम्हश्रद्धा तयार करणार नाही.

डीबी: आता तुम्ही आधी जे बोललात ते म्हणजे मन हेच मूळ भूमी आहे, तेच अज्ञात आहे.

कृष्णमूर्ती: होय मन हीच मुळभुमी आहे परंतु ते मन वेगळे आहे. ज्यावेळी आपले मन पूर्वीच्या सर्व संकल्पनांचा अंत करते तेव्हा ते नवीन मन बनते. .

डीबी: होय. ते स्पष्ट आहे. जुने मन हेच त्याची सामग्री आहे आणि मनाची सामग्री हे त्याचे ज्ञान आहे आणि पूर्वज्ञाना शिवाय असलेले मन हे नवीन मन आहे.











Saturday, June 12, 2021

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले


विश्वाचे मूळ अधिष्ठान

Dr David Bohm: या विश्वाच्या मूळ आधाराचे स्वरूप काय असावे? आणि ते जे काही असेल त्याचा मानवामध्ये काही रस असावा का? त्याच्यामुळे मानवाच्या वर्तनात बदल होण्याची शक्यता आहे काय?

कृष्णमूर्ती: विश्वाचा मूळ आधार असावा ही केवळ कल्पना आहे काय? एक भ्रम आहे काय, एक तत्वज्ञान आहे काय? किंवा, ज्या अर्थाने ते मूळ आधार आहे त्यापलीकडे परत दुसरे काही नाही ना? याचा तपास करावा लागेल. 

डीबी: होय, मूलभूतपणे आपण असे म्हणतो की जे काही सत्य असेल ते मूलतः अज्ञात आहे. म्हणून आपण पूर्व ज्ञानापासून सुरुवात करू शकत नाही. अज्ञाताचा शोध घेण्यास अज्ञाता पासून प्रारंभ करायला हवा.

कृष्णमूर्ती: एखाद्याचे मन जे पुरातन ज्ञानाद्वारे विकसित झाले आहे, ज्यास त्या ज्ञानाने अत्यंत शिस्तबद्ध केले आहे ते मन हे कसे जाणू शकते? कारण ते जे काही अज्ञात असावे ते पूर्व ज्ञान असू शकत नाही, ते विचारांनी सुद्धा आकलन केले जावू शकत नाही.

ते जे काही अज्ञात आहे, जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा भ्रम आहे, जोपर्यंत इच्छा, आनंद, भीती आणि या अशा सर्व मी च्या गोष्टीं आहे तो पर्यंत अज्ञाताला स्पर्श करता येत नाही. याचा अर्थ मूळ अधिष्ठान ही एक केवळ कल्पना आहे काय? किंवा ते असे काहीतरी असावे ज्याचा तपास केला जाऊ शकत नाही, ते नेहमी अज्ञातच राहील?

आपली मने पूर्व अनुभवाद्वारे आणि पूर्व ज्ञानाने संस्कारित, अनुशासित केली आहेत आणि अशी मने त्या ज्ञात ठिकाणीच कार्य करू शकतात, ती मने अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील काय? आणि समजा एखादा असे सांगू लागला की, मूळ अधिष्ठान ही केवळ कल्पना नाही, ते तात्विक संकल्पना नाही, ते विचारांनी एकत्र केले जाऊ शकत नाही किंवा ते विचारांनी आकलन केले जाऊ शकत नाही. तर जिज्ञासू माणूस या गोष्टीची कशा प्रकारे अनुभूती घेवू शकतो, त्यास कसा स्पर्श करू शकतो किंवा ते कसे समजून घेवू शकतो?  

शब्द ते व्यक्त करू शकत नाहीत, त्यामुळे गुरु आणि त्यांचे ग्रंथ उपयोगाचे नाहीत. मग आपल्याकडे असे तंत्र असले पाहिजे जे सर्व प्रकारच्या ज्ञात ज्ञानापासून आपणास मुक्त करेल. मी प्रयत्न करेन असे म्हणावे तर तेही स्वार्थी इच्छेतून जन्माला येते. 

मग मी काय करावे? मला वाटते हा साधारण प्रश्न नाही. हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे.  

मी या प्रश्नाकडे कसे जाऊ? मला ते अव्यक्त आणि अज्ञात शोधायचे आहे. माझ्या मते जे जीवनाला अर्थ देते, जीवनाचा आधार आहे ते शोधणे, समजणे याचे मानवी जीवनात अपार महत्व आहे.

डीबी: मानव समाजाने जे जीवनाला महत्त्व देते तिथे देवाची कल्पना वापरली आहे.

कृष्णमूर्ती: नाही, नाही. देव हि फक्त एक कल्पना आहे, ती आपल्या मनाची कल्पना आहे, मनाची कल्पना मधून मन मुक्त नाही होवू शकत. आपण सांगता की ते जे काही अज्ञात आहे ते विचारांनी तयार केलेले नाही. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मानसिक कल्पनांच्या आधारे अज्ञाता पर्यंत येऊ शकत नाही. एक प्रामाणिक, विचारवंत माणूस म्हणून मी हे सर्व सर्वस्वी नाकारतो.

कारण सर्वप्रथम देव हे सर्वश्रुत, श्रद्धा आणि म्हणून ते सामान्य ज्ञान झाले आहे. सामान्यतः सगळेच तसे श्रद्धेने देव मानतात, तेथे त्यात इच्छा, आशा, भीती यांनी निर्माण केलेल्या भ्रमाची एक मोठी भावना आहे.

( कृष्णमूर्ती आणि Dr David Bohm यांच्या मध्ये १९८० साली Ojai, California येथे झालेली चर्चा )

क्रमशः…..


Wednesday, June 09, 2021

मृत्यूचा अंत !!!

अंतर्दृष्टि इच्छाशक्तीद्वारे, साधनेद्वारे, कोणत्याही प्रकारच्या मानवी प्रयत्नातून तयार केली जाऊ शकत नाही. तशी ती शक्यताच नाही. आपण ते सर्व करून पाहिले आहे. आपण पाहिले आहे की काही लोकांकडे ही अंतर्दृष्टी सहज नैसर्गिक असते आणि मग ती इतरांना ती सहज, नैसर्गिकरीत्या का मिळत नाही?

कृष्णमूर्ती: समजा क्ष या व्यक्तीकडे अंतर्दृष्टी आहे. ती त्यालाच का प्राप्त होते?

David Bohm: बहुतेक सर्वच नैसर्गिक रित्या पशुवृत्तीचे असतात. आणि ते समजतात की त्यांचा दुसरा सहकारी क्ष हा अप्राकृतिक आहे. म्हणून मानवजात नेहमी असा विचार करते की जर खरोखरच काही लोक असे वेगळे असतील तर ते खूपच असामान्य आणि दैवी असले पाहिजेत.

कृष्णमूर्ती: तेच. बहुतेक मानव हे द्वेषाद्वारे द्वेषाला प्रतिसाद देत असतात. म्हणून ते जेव्हा वेगळी क्ष सारखी व्यक्ती पाहतात ते त्यांना नैसर्गिक किंवा तर्कसंगत दिसत नाही. क्ष् कडे अंतर्दृष्टी आहे आणि त्यामुळे त्याच्या जीवनातील अंधकार आणि त्या अंधाराचे केंद्र असणारा मी आणि अहंकार पूर्णपणे दूर झाले आहेत. आणि दुसरा एक गंभीर, प्रामाणिक, हुशार माणूस, त्याचे म्हणणे ऐकतो आणि क्ष जे काही सांगितले ते त्याला अतिशय वाजवी, तर्कसंगत आणि शहाणपणाचे वाटते. तो तसे वागण्याचे ठरवितो, काही साधना करतो परंतु ते सर्व विचार असतात आणि जोपर्यंत अंतर्दृष्टि येत नाही तोपर्यंत ते सर्व मिच्या अंधारात घडत असते. 

ज्याच्या जवळ अन्तरदृष्टी नाही त्याच्या जवळ काहीच पर्याय रहात नाही काय? 

त्याने त्याच्या जीवनात अंधकार कशामुळे आहे हे शोधले पाहिजे. आपले विचार हेच आपला मी आहे, मी हा भास आहे आणि या भासरुपी मी चे विचार हेच मिच्या अंधकारास जबाबदार आहे हे मीच्या लक्षात येत नाही. मी ला हे का समजत नाही? 

आपला मी हाच आपल्या जीवनातील अंधकारास जबाबदार आहे हे समजणे हि सत्य आकलनात येण्यासाठी खूप महत्वाचा टप्पा आहे. 

ज्यावेळी X इतरांना सांगतो की प्रत्यक्षात अंधकार नाही, तो अंधकार आपल्या मिने त्याच्या विचारांनी बनविलेला आहे. मीने बनविलेल्या सर्व संकल्पना केवळ मानसिक आहेत. हे ऐकल्या नंतर ज्यांच्या मनात स्फोट होतो त्याच क्षणी त्यांच्या मि ने बनविलेल्या संकल्पना डळमळीत होवू लागतात. मी चे विचार, मी च्या संकल्पना असतात. संकल्पना नाहीशा झाल्या तर मी चे अस्तित्व धोक्यात येते. X ने केलेला बोध हा मूलभूत सत्य असेल तर त्याने इतरांच्या मनाची घडी विस्कटून टाकण्यास मदत होते.

मी माझ्यातील अंधार दूर करण्यास काही करू शकत नाही परंतु जेव्हा X त्याच्या अंतर्दृष्टिचा इतरांना बोध करतो त्या प्रकाशात मी चा अंधार नाहीसा होतो. 

मी चे विचार, मी च्या अनावश्यक संकल्पना नाहीशा झाल्याने ती व्यक्ती नैसर्गिक पातळीवर येते. या पातळी वरील जीवनात अंधार नसतो की प्रकाश नसतो. त्याला आदि आणि अंत नसतो. त्या जीवना मधील चैतन्याची विभागणी नसते, द्वैत नसते. काळ नसतो, अंतर नसते, काहीच नसते. परंतु तीच काहीच नसण्याची अवस्था संपूर्ण ऊर्जेची असते. जे कालातीत आहे तेच अमर सुद्धा आहे. मी च्या मानसिक संकल्पनांचा अंत म्हणजे मी चा मानसिक अंत, मानसिक मृत्यू असतो. 

कसलाही संघर्ष नसलेल्या मेंदूची अवस्था काय असेल? त्या मनाची गुणवत्ता काय असेल ज्यामध्ये कोणतीही अडचण नसेल? समजा असे मन शुद्ध प्रदूषण रहित हवेमध्ये रहात असेल, योग्य प्रकारचे अन्न घेत असेल तर ते जास्त वर्षे सहज, नैसर्गिकरीत्या जगू शकत नाही का?

किती विलक्षण गोष्ट घडली आहे! याचा माझ्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होईल, कारण मला या पृथ्वीवर जगायचे आहे ना? पूर्वी माझे दैनंदिन जीवन म्हणजे आक्रमकता, सतत काहीतरी मिळविण्याचा प्रयत्न करणे, यशासाठी धडपडत - त्या सर्वाचा अंत झाला आहे.





Monday, June 07, 2021

मी ची खरी ओळख

आपल्या मी ची ओळख हीच आपली ओळख

अध्यात्मिक साधना करणाऱ्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीची ओढ असते. आत्मसाक्षात्कार म्हणजे मी नेमका कोण आहे याचा साक्षात्कार करणे होय. 

जीवनातील असंख्य समस्यांचे कारण सुद्धा मी चे अज्ञान हेच असते. त्यामुळे मी चे आकलन हा आपल्या जीवनातील एक फार मोठा शोध ठरतो. 

अध्यात्मिक शास्त्र या विषयी असे सांगते की मी देह नाही, मी मन नाही आणि त्याही पलिकडील मी आत्मा आहे. त्यालाच इतर काही spirit, soul असेही समजतात. वैयक्तिक आत्मा आणि वैश्विक परमात्मा अशा त्या संकल्पना आहेत. गीता आणि इतर अनेक धर्म ग्रंथात याची वर्णने आहेत. 

मी म्हणजे आत्मा आहे हे शास्त्रांनी सांगितल्या मुळे सर्वजण आत्म्याचा शोध घेत राहतात, त्या एकाच मार्गाने जातात. मी चा शोध करण्यासाठी आणि त्याचा साक्षात्कार साठी अनेक साधना कराव्या लागतात, ध्यान करावे लागते, अभ्यास करावा लागतो. असा शास्त्रांनी आपला पक्का समज करून ठेवला आहे.

कृष्णमूर्ती यांनी मी म्हणजे नेमके काय आणि तोच कसा द्रष्टा आणि दृष्य आहे हे सप्रमाण सिद्ध केले, कोणत्याही गुरु, संप्रदाय आणि साधने शिवाय. आणि त्यांनी नंतर जगभर स्वतःच्या अनुभवाचा प्रचार केला. आपणही मी चा साक्षात्कार कोणत्याही साधने शिवाय करून घेवू शकतो. फक्त आकलन आणि बुद्धिमत्ता याची थोडी आवश्यकता आहे.

कृष्णमूर्ती यांनी मी म्हणजे आपला भूतकाळ आहे, आपल्या स्मृतीचा प्रतिसाद आहे असे सांगून तोच आपला संपूर्ण पूर्व माहिती संग्रह आहे, तोच आपला पूर्वग्रह आहे, तोच काळ आहे, तोच विचार आहे, तोच द्रष्टा आहे आणि तोच दृष्य आहे हे सतत प्रतिपादन केले आहे. हे सर्व त्यांच्या भाषणातून अनेकदा ऐकून सुद्धा मी नेमका सापडणे अवघड असते.

एकदा मी स्वतः अनुभव म्हणजे नेमके काय असते आणि अनुभवाच्या एक एक पायरीचे आकलन करताना वरील सर्व गोष्टी मला त्या मध्ये एकत्रित दिसल्या आणि मी माझ्या परीने मी चा शोध लावला आहे. आपण प्रत्येक जण त्याची शहानिशा करू शकता. स्वीकारणे अथवा न स्वीकारणे पेक्षा याचे फक्त आकलन होणे खूप महत्वाचे आहे.

सत्य हे नेहमी अज्ञात असते आणि जे ज्ञात आहे ते सत्य नसते या साध्या कसोटीवर कोणतेही पारंपरिक शास्त्रे आणि त्यांचे ज्ञान हे ज्ञात असल्यामुळे ते सत्य नसते हे मान्य करणे अवघड जाते. याचे कारण श्रद्धा असतात. श्रद्धा या सत्य संशोधनातील सर्वात मोठा अडसर आहे हे बहुतेकांच्या लक्षात येत नाही. 

आता आपण कोणतीही कल्पना न करता शास्त्रशुध्द रित्या आपल्या मी चा शोध घेऊया. आपले शरीर स्वतःच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी सतत अनुभव घेत असते. अनुभव करताना नेहमी दोन घटक असतात, एक अनुभव घेणारा मी असतो आणि दुसरा अनुभवात येणाऱ्या घटना असतात. अनुभव करणारा जो मी असतो त्याला द्रष्टा संबोधले जाते आणि तो जे काही अनुभव करीत असतो ते त्याचे दृष्य असते. 

आपण एक झाड पहात आहोत या साध्या आणि सोप्या अनुभवाचा उदाहरणासाठी उपयोग करूया. आपण जेव्हा झाड पहात असतो तेव्हा प्रत्यक्ष डोळे झाड पहात असतात. डोळे कॅमेरा प्रमाणे झाडाची प्रतिमा काढतात आणि ती प्रतिमा ते मेंदूकडे पाठवितात. मेंदूकडे आलेली झाडाची प्रतिमा मेंदूच्या स्मृतीमध्ये साठविली जाते. स्मृतिमधून हा अनुभव विषद करण्यासाठी एक विचाराची प्रतिक्रिया निर्माण होते. ही प्रतिक्रिया म्हणजे आपला मी असतो. मी हा स्मृतींचा प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद विचारांच्या माध्यमातून व्यक्त होतो. हाच मी म्हणजे द्रष्टा असतो. हा मी स्मृती मध्ये असल्यामुळे तो प्रत्यक्ष झाड पाहु शकतं नसतो. तो नेहमी स्मृतीमधील साठविलेल्या प्रतिमा / माहिती पहात असतो. द्रष्टा असणाऱ्या मी चे दृष्य हे नेहमी स्मृती मधील माहिती असते. 

द्रष्टा मी हा स्मृतींचा प्रतिसाद असतो तर स्मृती मधील माहिती म्हणजे दृष्य असते. या अर्थाने द्रष्टा आणि दृष्य हे स्मृतीचे भाग असतात, ते दोन्ही स्मृती असतात, म्हणून ते दोघे एक असतात.

प्रत्यक्ष झाड आणि आपण वेगळे आहोत परंतु मानसिक अनुभव मध्ये दोन्ही एक आहेत, यालाच भ्रम म्हणतात

वर्तमान काळातील दृष्य हे स्मृतीमधील मिला समजे पर्यंत ते भूतकाळ झालेले असते. याचाच अर्थ आपला मी हा स्वतः भूतकाळात जन्मत असतो आणि तो भूतकाळातील स्मृती मधील माहिती अनुभव करीत असतो. आपले सर्व अनुभव हे प्रत्यक्ष नसतात ते काही कालांतराने आपणास समजतात. 

मी चे हे सत्य स्वरूप खरोखर आकलन झाले तर त्याच्या बद्दलच्या अनेक भ्रामक कल्पना आपोआप गळून पडतील. मी हा एक तात्पुरता विचार आहे, तो भ्रम आहे, तो जे काही विचार करतो ते सर्व भ्रम असू शकतात. जे काही तथ्य असते त्याचा खरे तर विचार करावा लागत नाही परंतु मी नामक विचार स्वतःस जिवंत ठेवण्यासाठी सतत नवनवीन कल्पना लढवीत राहतो आणि त्या सतत चर्वण करीत राहतो. 

मी च्या मानसिक कल्पनामध्ये अडकलेला मानव यामुळे जीवना मधील सत्य समजू शकत नाही.

मी चे यथार्थ आकलन झाले तर भ्रामक मी ने बनविलेल्या त्याच्या आत्मा, परमात्मा, ईश्वर, धर्म, देश आदि असंख्य भ्रामक कल्पनांचा निरास होवू शकतो. आणि मनाचे भ्रामक पण लक्षात आले की त्याच्या सर्व मानसिक संकल्पना शुन्यवत होतात, त्या बरोबरच आपले जीवन नैसर्गिकरीत्या यथार्थ होते, परिपूर्ण होते, पूर्णत्व प्राप्त होते. 

@ vitthal@viyoddha.com

Sunday, June 06, 2021

तथ्य, भ्रम आणि सत्य

विश्व आणि विश्वातील सर्व सजीव निर्जीव हे जसे तथ्य आहेत तसेच तथ्य म्हणजे मानवी युद्ध आहे. बरोबर? मनुष्य हिंसक आहे ही वस्तुस्थिती आहे. तथ्य म्हणजे राष्ट्रा राष्ट्रातील विभागणी, राजकीय विभागणी, धार्मिक विभागणी, वैचारिक विभागणी आहे.  बरोबर?  तुम्ही आणि मी - विभागणी आली, स्त्री आणि पुरुष - विभागणी आहे. आणि वस्तुस्थिती अशी आहे की जेथे विभाजन आहे तेथे संघर्ष आहे. यहूदी - अरब, मुस्लिम -  हिंदू इत्यादी. तर जेथे विभाजन आहे तेथे संघर्ष आहे. ते एक सत्य आहे. तो एक नियम आहे. बरोबर?

प्रत्यक्षात जे काही चालले आहे किंवा प्रत्यक्षात काय आहे ते सर्व तथ्य असते. या तथ्यांवरून आपण जे निष्कर्ष काढतो, आवड आणि नापसंत ठरवितो जरी ते वास्तविक दिसले तरी ते भ्रम असतात.

विचारांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट वास्तविक आहे. विचारांनी हा मंडप तयार केला आहे. मंडप एक वास्तव आहे. विचारांनी हा मायक्रोफोन तयार केला आहे. तो वास्तव आहे. विचारांनी विविध भ्रम आणि संकल्पना निर्माण केले आहेत, ते सर्व वास्तविकता आहे. जे काही विचार निर्माण करते ते सर्व वास्तविकता असते - इमारत, तांत्रिक गोष्टी ज्या विचारांती तंत्रज्ञानाने तयार केल्या आहेत - संगणक, दूरदर्शन इत्यादी. विचारांनी निर्माण केलेले भ्रम यासह विचारांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट वास्तविकता आहे. राष्ट्रीयत्व हा एक भ्रम आहे. आणि देव हा सुद्धा एक भ्रम आहे, विचारांनी ते सर्व निर्माण केले आहेत.

परंतु विचारांनी निसर्ग - झाड, बाहेरील गोष्टी तयार केल्या नाहीत.  बरोबर?  पण झाडाच्या लाकडापासून बनविलेले खुर्ची ही एक वास्तविकता आहे.  कृपया, लक्ष द्या.  विचारांनी निसर्ग निर्माण केलेला नाही, परंतु झाडा पासून खुर्ची बनविणे हे वास्तव आहे. 

जेव्हा आपणास कोणताही भ्रम नसतो तेव्हाच योग्य कृती होऊ शकते. बरोबर?  जेव्हा भ्रम नसतो, जेव्हा मन सर्व प्रकारच्या भ्रमांपासून मुक्त असते तेव्हाच योग्य कार्य होऊ शकते. ते स्पष्ट आहे.  मी मनोरुग्ण असल्यास मी योग्यरित्या वागू शकत नाही. ते स्पष्ट आहे. मी संभ्रमित असल्यास मी योग्य वागू शकत नाही. मी त्याच्या निष्कर्षांद्वारे एखाद्या पूर्वग्रहाच्या विशिष्ट प्रकारात अडकल्यास मी योग्य रीतीने वागू शकत नाही. दैनंदिन जीवनात, योग्य मार्गाने वागण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा भ्रम आहे तोपर्यंत योग्य कृती शक्य नाही.

तर सत्य जे काय आहे ते असे वसंत ऋतू सारखे, फुलांसारखे, पाण्यासारखे सहज वाहणारे होऊ द्या. जेव्हा मनाने सर्व काही जे अव्यवस्थित होते ते सर्व व्यवस्थित केले असेल तेव्हाच ते येऊ शकते. बरोबर?

अजून एक प्रश्न होता: मनुष्य आणि निसर्गाचा काय संबंध आहे? 

विचारांनी मनुष्य निर्माण केलेला नाही.

मग माणसाचा निसर्गाशी काय संबंध आहे? मनुष्य त्याने निर्माण केलेल्या भ्रमात राहिला तर त्याचा निसर्गाशी काही संबंध नाही. पण भ्रम नसलेला माणूस, ज्याने विचारांनी काय निर्माण केले आहे हे पाहिले आहे तो मनुष्य सर्व विचार त्यांच्या योग्य जागी ठेवतो, मग त्याचा निसर्गाशी संबंध आहे. 

मला आश्चर्य वाटेल जर आपणास हे समजले तर.

Saturday, June 05, 2021

परंपरा आणि सत्य

आपण म्हणजे आपला मानसिक मी होय. हा मानसिक मी आपल्या भूतकालीन माहितीचा प्रतिनिधी आहे. 

आपल्यातील भूतकाळ म्हणजे आपली परंपरा, आपण वाचलेले ग्रंथ, आपल्या सर्व धार्मिक परंपरा तसेच वांशिक वारसा आणि आपण ज्या संस्कृतीत राहात आहोत ती, प्रार्थना स्थळे, श्रद्धा आदि सर्व जे मागील पिढ्यानी आपल्या स्वाधीन केले आहे ते सर्व काही आपला भूतकाळ आहे. 

गेल्या हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या धार्मिक अपप्रचाराचे आपण बळी आहोत. ख्रिश्चन धर्मीय दोन हजार वर्षांच्या अपप्रचाराचे बळी आहेत. ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि आपण कृष्णावर किंवा इतर हिंदू देवी देवतांवर विश्वास ठेवतो तसेच निधर्मी कम्युनिस्ट सुद्धा इतर कशावर तरी विश्वास ठेवतात. 

आम्ही पारंपरिक अपप्रचाराचा परिणाम आहोत. याचा अर्थ काय होतो हे आपल्या लक्षात आले आहे का? प्रत्यक्षात त्यांच्या जवळ सत्य काहीही नाही, फक्त परंपरा वाद्यानी केलेला प्रभावी अपप्रचार आहे ते सर्व. आणि कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधण्यासाठी आपल्यामध्ये सुव्यवस्था असणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्या मधील संपूर्ण अव्यवस्था कमी होते तेव्हाच व्यवस्था येऊ शकते. 

आपल्या मधील काही जे जिज्ञासू, गंभीर, विचारी आणि प्रामाणिक आहेत त्यांना प्रश्न पडतो की, काही पवित्र शक्ती आहे की नाही? त्याचे प्रामाणिक उत्तर असे आहे की मंदिर, मशीद किंवा चर्च हे पवित्र नाही आणि त्यातील प्रतिमाही पवित्र नाहीत.

मंदिरे आणि त्यामधील मूर्तींना आपण भीतीपोटी, परंपरेच्या ओझ्याच्या सवयीने, स्वतःस इतरांच्या गुलामी मध्ये हवाली करणे ज्याला आपण पावित्र्य समजत असतो त्यामुळे त्यांना आपण पवित्रतेची प्रतीके समजत आहोत. मग अर्थातच प्रश्न निर्माण होतो की विश्वात खरेच काही पवित्र आहे की नाही?

आपणास माहिती आहे की शतकानुशतके मनुष्य प्राणी याविषयी बोलत आहे. काहीतरी अविनाशी असे तत्व असावे, ते शोधून काढायला हवे, जे मनाने निर्माण झाले नसेल, जे स्वतःच पवित्र असेल, अशी गोष्ट जी भूतकाळाने कधीही स्पर्श केली नसेल. माणूस नेहमी ते तत्व शोधत असतो. ते तत्व त्याला सापडले नाही म्हणून त्याने धर्मादी श्रध्दास्थाने यांचा शोध लावला.

साधक जर प्रामाणिक जिज्ञासू असेल तर तो स्वतः वास्तविक, खरोखर, सार्वकालिक पवित्र काय आहे हे शोधून काढू शकतो. तो शोध नक्कीच त्याला कोणत्याही मुर्तीमधून, मंदिरामधून अथवा कोणत्यातरी भाकड  कथांद्वारे किंवा प्राचीन तत्वज्ञाना मधून लागणार नाही. जो त्याचा शोध घेणार नाही किंवा ज्याला ती पवित्र गोष्ट समजणार नाही तो नेहमीच अपवित्र, स्वार्थी राहील आणि तो क्रूर सुद्धा होवू शकेल.

आपण कोणीही ते समजून घेवू शकतो. त्यासाठी आपण आपल्या मधील अविचार काय काय आहेत हे पाहणे आवश्यक आहे, ते पाहण्यासाठी स्वयं अवलोकन करण्याची सवय हवी. कडक शिस्तप्रिय सवयीचे गुलाम असण्याची आवश्यकता नाही. 

ते पाहण्यासाठी आपण आपले संपूर्ण लक्ष त्याकडे दिले पाहिजे. आणि आपले संपूर्ण लक्ष वेधण्या मध्येच त्या पाहण्याची शिस्त असते, त्यासाठी इतर सांप्रदायिक शिस्त नको असते.  

कसलाही विचार येवू न देता जे केवळ लक्ष देणे असते त्यामध्ये जिवंतपना असतो, ते सातत्यशील असते. उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादे महत्वाचे ऐकत असतो तेव्हा त्या ऐकण्या कडे आपले संपूर्ण लक्ष असते, आपले विचार, आपल्या प्रतिक्रिया शून्य झालेल्या असतात. हे असे विचारशून्य होवून केलेली प्रत्येक कृती पवित्र असते. ते पावित्र्य मोजण्या साठी आपल्याला इतर कोणत्याही नैतिक मानकांची आवश्यकता नाही. 

जर आपण हे केले असेल, जसा वक्ता याबद्दल आता बोलत आहे, तर त्या पाहण्यामध्ये त्या पाहण्याची स्वतःची शिस्त आहे, त्याची स्वतःची सुव्यवस्था आहे, आणि त्याची पवित्रता आहे. विचार शून्य अवस्था हीच पवित्र अवस्था आहे. विचार हे स्वार्थी असतात म्हणून विचारी मन हे अपवित्र मन असते. पारंपरिक साहित्य, पारंपरिक विचार यामुळे सत्य समजण्यास उपयोगी पडत नाही. 

जर आपणास विचार शून्य आकलन करता येवू लागले तर ते मन सुव्यवस्थित होते. मनाचा सुव्यवस्थित असणे म्हणजे आवश्यक विचारांचा योग करणे आणि अनावश्यक विचारांचा त्याग करणे होय. मनाच्या अशा सुव्यवस्थित अवस्थेला मनाचा अत्युच्च पवित्रपणा समजावा. मला माहित नाही आपणास हे समजत आहे की नाही ते.

आपणास माहित आहे काय की जेव्हा आपण मत्सर न बाळगता झाड, पक्षी, आपल्या सहकाऱ्यावर, आपल्या साथीदारावर प्रीति करता तेव्हा ते मत्सर रहित प्रेम कधीच द्वेषाने स्पर्श करत नाही, जेव्हा ते मत्सर रहित प्रेम असते तेव्हा ते प्रेम स्वयं पवित्र असते, आपल्याकडे या व्यतिरिक्त इतर आणखी कोणतीही गोष्ट नाही जी यापेक्षा जास्त पवित्र असू शकते. म्हणून ती अतिशय पवित्र अशी वस्तू आहे, फक्त मनुष्याने एकत्र केलेल्या कोणत्याही गोष्टींमध्ये (मानवी विचाराने बनविलेल्या कल्पना) ती नाही. ती अस्तित्वात येते जेव्हा मनुष्य भूतकाळा पासून पूर्णपणे स्वतःला वेगळा करतो, भूतकाळ म्हणजे केवळ आठवणी आहेत.

याचा अर्थ असा होत नाही की तो माणूस विचार करणेच विसरून जाईल. त्याला जीवनावश्यक गोष्टींसाठी स्मरणशक्ती असणे आवश्यक आहे, परंतु त्या स्मरणशक्ती मध्ये भूतकाळाचा कोणताही संबंध नसेल.  आणि भूतकाळाचा शेवट फक्त तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण गोष्टी जशा आहेत त्याप्रमाणे वर्तमानात पहाल आणि थेट त्यांच्याशी स्मृती विना संपर्क साधलात तर. आपले जग अधिक चांगले समजण्यासाठी आपण गोष्टी जशा आहेत तशा त्या पाहणे आवश्यक आहे. 

मग अशा सुव्यवस्थेच्या मधून शिस्त, पावित्र्य, प्रेम अवतरित होते. हे प्रेम प्रचंड उत्कट असते आणि ते तत्क्षणी कार्य करते. त्याच्या पाहणे आणि कृती करणे यांच्या मध्ये वेळकाढूपणा नसतो. आणि जेव्हा आपणा सोबत ते प्रेम असते तेव्हा आपण आपले सर्व पवित्र ग्रंथ आणि आपल्या सर्व श्रद्धा काढून टाकू शकता. 

आणि त्या प्रेमासाठी तुम्हाला तुमचे सर्व पवित्र ग्रंथ, सर्व देवता, तुमच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागतील. हेच एकमेव पवित्र सत्य आहे. आणि हे सत्य समजण्यासाठी तुमच्यात चांगुलपणा फुलला पाहिजे.  चांगुलपणा .. समजतो का, सर?  .. 

सभ्यता केवळ स्वातंत्र्यातच फुलू शकते, परंपरेत नाही. 

जगाला परिवर्तनाची आवश्यकता आहे, तुम्हाला तर त्याची अत्यंत आवश्यकता आहे, सर.

आपल्यात मूलभूत, आमूलाग्र मानसिक बदलाची आवश्यकता आहे आणि हा बदलच व्यवस्था आणील. व्यवस्था शांतता आणते. आणि ही व्यवस्था तिच्या सद्गुण आणि शांततेसह, तेव्हाच येऊ शकते जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवना मधील अव्यवस्थेच्या  आकलनात असाल. मग त्या प्रमाणे अवलोकन केल्यास चांगुलपणा येईल आणि त्या नंतर सत्याच्या शोधण्याचा प्रयत्न करण्याची गरज राहणार नाही. जे असेल तेच पवित्र असेल.

J. Krishnamurti, Madras, 14 January 1968

Wednesday, June 02, 2021

जीवन खरे किती आणि भासमय किती?

घराच्या आतील सेक्युरिटी कॅमेरा हा घराबाहेरील दृश्य टिपू शकणार नाही. घरातील चार भिंतींच्या आतील कॅमेराची कक्षा ही त्याची मर्यादा असते, कॅमेरा त्याच्या मर्यादित कक्षेच्या बाहेरचे जग बघू शकत नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कॅमेरा लावलेला असतो, त्यामधील प्रत्येक दृश्य पाहण्याची गरज नसते फक्त जे अत्यावश्यक असते ते पाहावे लागते, कदाचित काही दृश्ये दीर्घ काळासाठी साठवावी लागतात. आणि उर्वरित बहुसंख्य अनावश्यक दृश्ये आपण न पाहता आपोआप निघून जात असतात. आपल्या निवडी नुसार कॅमेरा मधील कोणती दृश्ये आवश्यक आहेत आणि कोणती दृश्ये अनावश्यक आहेत हे नवीन intelligent कॅमेरे सुद्धा ओळखू शकतात, आवश्यक दृश्ये साठवून ठेवतात आणि अनावश्यक दृश्ये काढून टाकतात.

आपल्या शरीराच्या सुरक्षेसाठी असणारे कॅमेरे (ज्ञानेंद्रिये) हे शरीराच्या बाहेर आहेत आणि बाहेरील ज्ञानेंद्रिये त्यांची दृश्ये मेंदूमधील स्मृतीमध्ये साठवित असतात. आपला मी हा मेंदू मधील स्मृती मध्ये असतो त्याला प्रत्यक्ष शरीर आणि शरीराच्या ज्ञानेंद्रिय यांनी वर्तमानात बाहेर काय टिपले हे त्या गोष्टी स्मृती मध्ये आल्या नंतर समजते.

खरे जीवन आणि त्याचा बाहेरील जीवन प्रवाह हा आपल्या आतील मी ला तत्क्षणी समजणे शक्य नसते. खरे जीवन आणि त्यातील घटना हे वर्तमानात घडत असतात आणि आपला मी हा भूतकाळात असतो. खऱ्या जीवनात वर्तमानात होवून गेलेल्या घटनांची मी मुळे मिला नंतर जाणीव होत असते.

आपण रस्त्याने चालताना अचानक साप पाहिला तर थबकून शरीर थांबते. शरीराने पाहिलेल्या सापाची प्रतिमा मेंदूमधील स्मृतीमध्ये जाताच लगेच मी ची प्राथमिक प्रतिक्रिया भीतीच्या स्वरूपात येते. म्हणजे यामध्ये शरीर सापाला पाहते हे खरे जीवन आहे तर ते मिला समजल्या नंतर त्याची प्रतिक्रिया, त्याचे विचार आणि त्याची भीती हि केवळ मानसिक असते, भासमय असते.

आपले सर्व अनुभव असेच असतात. नैसर्गिक नियमांप्रमाणे आपले आणि इतर सर्व विश्वाचे खरे जीवन यथावस्थित चाललेले असतात. फक्त आपला मी त्याच्या भूतकाळातील अनुभवानुसार वर्तमानातील घटनांचा अर्थ लावीत असतो आणि भविष्यकालीन योजना आखित असतो. आपला मी हा आपल्या स्मृतीमध्ये साठविलेल्या असंख्य प्रतिमांचा, माहितीचा प्रतिनिधी असतो. स्मृती मधील माहिती हेच त्याचे अस्तित्व असते त्यामुळे तो अनावश्यक माहिती संग्रह आणि अनावश्यक प्रतिमा काढून टाकीत नाही उलट अर्थाचा अनर्थ लावीत त्यातून असंख्य मानसिक कल्पना बनवीत राहतो. 

मी हा भास आहे आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी कधी स्पर्श होवू शकत नाही त्यामुळे तो प्रत्यक्ष जीवना ऐवजी भासाच्या मानसिक जीवनामध्ये जगत असतो. मी स्वतःचे मानसिक मनोरंजन मध्ये व्यस्त राहून स्वतःची निरंतरता टिकवून ठेवतो. 

दररोजच्या त्याच त्या प्रतिमा आणि तीच ती माहिती मिचे मनोरंजन करू शकत नाही. म्हणून आपला मी हा इतर असंख्य मानसिक कल्पना बनवितो आणि त्याद्वारे स्वतःचे सतत मनोरंजन कसे होत राहील याची काळजी घेत असतो. 

आपल्या खऱ्या जीवनात कोणत्याही सुखाची, आनंदाची, समाधानाची आवश्यकता नसते परंतु आपला मी आणि त्याचे सततचे विचार मिळून जे मन बनलेले असते ते त्यांच्या मनोरंजनासाठी सुख - दुःख, समाधान - असमाधान, निराशा - आनंद, प्रीती, राग, द्वेष, हिंसा - अहिंसा आदि द्वैत निर्माण करतात आणि आपल्या सहज, नैसर्गिक जीवनाचा स्वर्ग बनविण्याच्या नादात नरक बनवितात. आणि शरीरास काही फरक पडत नाही ते स्वर्गात आहे की नरकात आहे. शरीरास ते जिवंत आहे हे सुद्धा त्याला मनच सांगत असते !!! 

जे मन त्याच्या मनोरंजना साठी खेळ, कला, साहित्य आदि बनवीत असते तेच मन त्याहीपुढे जावून देव, देश, धर्म, अध्यात्म आदि श्रद्धा युक्त अमर्याद मनोरंजनाची सोय करून ठेवीत असते. आणि आपला मी दैनंदिन खरे जीवन जगायचे सोडून या कल्पना विकणाऱ्या गारुड्यांच्या नादी लागत असते. अध्यात्मिक संत, बुवा, महाराज त्यांच्या नवनवीन संकल्पना आपल्या माथी मारीत राहतात आणि आपण त्यांच्या तथाकथित धार्मिक - अध्यात्मिक प्रभावाखाली आपले खरे जीवन जगायचे सोडून त्यांच्या कल्पना प्रमाणे जगू लागतो. 

जागृत अवस्थेतील हे ढळढळीत सत्य आपणास आकलन होत नसते तरीही आपण त्याही पलिकडील त्यांचे स्वप्न, सुशुप्ती, तुरिया आणि त्या पलिकडील अवस्थांचा भाकडपणा ऐकत राहतो. आपणास आत्ता या क्षणी आपल्या आसपास काय चालले आहे याची काळजी नसते परंतु दिल्लीत काय चालले आहे आणि स्वर्गात देव आहे की नाही याची खूप उत्सुकता असते. 

सत्य म्हणजे मनाने, विचारांनी, मी ने बनविलेल्या सर्व संकल्पनांचा, भाकड तत्वज्ञानाचा त्याग करणे होय. Truth is nothing but the total freedom from all known concepts. Negation of all, नेती नेती. नेती नेती हे हजारो वर्षापूर्वी सांगितले आहे तरीही समाजातील चतुर लोकांनी सतत ग्रंथ लिहून अज्ञान जिवंत ठेवले आहे.