वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥
कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥
तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥
संत तुकारामांच्या वेळची हि मनमोहक परिस्थिती होती. हिरव्यागार नैसर्गिक वातावरणाामध्ये माणूस लहानाचा मोठा होत होता, भोवतालच्या निसर्गाचा आस्वाद घेत घेत तो इथेच वैकुंठाचे सुख उपभोगीत होता. संत तुकाराम सदेह स्वर्गात गेले याला कारण त्यांचा स्वर्ग वा वैकुंठ इथे पृथ्वीतलावरच होता.
आज परीस्थिती बदलली आहे. माणसाने या सुंदर वसुंधरेचे लचके तोडून तिला विद्रूप केली आहे. नजीकच्या काळात परीस्थिती इतकी भयानक होईल कि माणसाला साध्या पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा युद्धे करावी लागतील. आपल्या ग्रहाची वाट लाऊन आजकाल आपण अवकाशामध्ये पृथ्वी सारखा दुसरा ग्रह कोठे दिसतो आहे काय याचा शोध घेत आहोत, पण सापडत नाही कारण पृथ्वी सारखा ग्रह बनविण्यासाठी निसर्गाला करोडो वर्षांची मेहनत घ्यावी लागते. जे बनवायला निसर्गाला अनेक युगे लागली ते आपण काही पिढ्यांमध्ये गमावणार आहोत. वेळीच आपण जर काही हालचाली केल्या नाहीत तर निसर्ग कोणाची वाट पहाणार नाही, त्याचे सृजनाचे चक्र जसे अव्याहतपणे चालत आहे तसेच त्याचे विनाशाचे चक्रही सुरु व्हायला वेळ लागणार नाही व एकदा का ते चालू झाले कि त्याला कोणीही थांबवू शकणार नाही.
काय करू शकतो आपण? गरज म्हणून नव्हे तर हव्यासापोटी आपण नैसर्गीक साधन संपत्तीचा विनाश करीत आहोत. जसजशी लोकसंख्या वाढणार आहे तसतसा या वाढत्या लोकसंखेचा हव्यास वाढणार आहे व निसर्गाचा विनाश वाढतच राहणार आहे. दुर्दैव असे कि हे हव्यासी लोकच जगभरातील सरकारे चालवीत आहेत. त्यांच्या पिढ्यान पिढ्यांच्या रसदीची ते सोय करीत आहेत, पण सामान्य माणसांचे काय?
एक रामबाण उपाय आहे. जे हव्यासी लोक आजपर्यंत या वसुंधरेचे लचके तोडीत होती तीच लोक तिला हिरव्यागार शालुने सजवतील!!!
काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागामध्ये आपल्या कडे शौचालयांची सोय नव्हती स्त्रियांसह सर्वजन बाहेर उघड्यावर बसायचे. सरकारने एक नियम केला ज्याच्या घरी शौचालय असेल त्यालाच पंचायतीच्या निवडणुकीस उभे रहाता येईल. परीस्थित झपाट्याने बदलली व प्रत्येक घरांघरांमध्ये शौचालये उभी राहली. हाच फॉर्म्युला आपण वृक्ष संवर्धनासाठी वापरू शकतो. सर्वत्र एकच नियम करायचा अमुक एक गोष्ट हवी असेल तर तमुक एव्हढी झाडे तुमच्या नावावर तुमच्या सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी असायला हवीत.
काहि ऊदाहरणे :
इयत्ता १ली मध्ये प्रवेश पाहिजे तर मुलाच्या नावावर किमान एक झाड हवे, पाचवी प्रवेशाच्या वेळी पाच तर कॉलेज प्रवेशावेळी किमान दहा झाडे लागतील. प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येकाने किमान एक झाड लावावे.
नोकरी हवी असेल तर किमान २५ झाडे हवीत
व्यवसाय सुरु करायचा असेल तर व्यवसायाच्या जागेत, गुंतवणुकीच्या प्रमाणात झाडांची लागवण असायला हवी. उदा. एक लाख रुपये गुंतवणी मागे एक झाड.
घर बांधायचे असेल तर घराभोवती प्रत्येक कुटुंबाच्या मागे किमान पाच झाडे असावीत.
निवडणुकीला उभे राहायचे असेल तर त्यासाठीहि झाडांची संख्या हि पात्रता ठरवली जाईल. प्रत्येक मतदार संघात जास्तीत जास्त झाडे ज्याच्या नावावर असतील तो त्या मतदार संघाचा प्रतिनिधी असेल. निवडणुकीचा खर्च वाचेल व पर्यावरणप्रेमी, जागरूक उमेदवार शासन यंत्रणेमध्ये निवडले जातील. आजकाल सरपंचाच्या निवडणुकीसाठी गावागावातील राजकारणी काय काय करतात हे आपण पाहतोच आहोत. हि कल्पना प्रत्यक्षात उतरली तर पंतप्रधान बनण्यासाठी इच्छुक असणारा उमेदवार आपल्या मतदारसंघात तर झाडे लावेलच पण जागा कमी पडली तर राजस्थान सारख्या वाळवंटाचेही नंदनवन करतील. मंत्रीपदांसाठी निवडणूक घ्यायचीच झाली तर उमेदवारांना पडलेली मते व प्रत्येक मतदाराची झाडांची संख्या यांचा गुणाकार करून जी संख्या येईल ती त्याची मते ठरवली जाईल.
सामान्य माणसांना भुर्दंड का? प्रत्येकाला प्रत्येक श्वासाला प्राणवायुची गरज भासते. प्राणवायु फक्त झाडांपासुनच मिळतो सबब प्रत्येकाने आपल्या प्राणवायुची सोय केलेली बरी नव्हे काय?
वरील कल्पना प्रत्यक्षात उतरवणे तसे फारसे अवघड नाही व अशक्य तर मुळीच नाही फक्त जबरदस्त इच्छाशक्ती व पुढील पिढ्यांसाठी आपण हि वसुंधरा नुसती सुरक्षितच ठेवली नव्हे तर तिचे संवर्धन हि केले याचे समाधान आपणास मिळेल. यासाठी काही पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागेल.
वनविभागाची पुनर्रचना करून तिचे अद्ययावत संगणीकृत करावे लागेल. देशातील प्रत्येक झाडाची संगणकामध्ये नोंदणी करावी लागेल. देशातील प्रत्येक माणसाचे खाते वनखात्याकडे असेल, त्याच्या ग्रीनकार्ड मध्ये त्याच्या खाजगी मालकीच्या झाडांची अद्ययावत नोंद असेल. झाडांचा आकार, वय व त्याची ऊपयुक्तता यांनुसार प्रत्येक झाडाला वनखाते गुण देतील. ज्या व्यक्तीकडे स्वतःकडे झाडे लावण्याची सोय म्हणजे जागा नसेल त्याने दुसऱ्याची जागा विकत वा भाड्याने घेवून त्यामध्ये झाडे लावावीत व त्याचे संवर्धन करावे. तेही शक्य नसेल तर त्याने वनखात्याला प्रत्येक झाडामागे काही रक्कम दरवर्षी 'हरित कर' म्हणून जमा करावा, वनखाते या रकमेतून त्याच्या नावावर वनखात्याच्या जागेमध्ये वृक्षारोपण करेल व त्याचे संवर्धन करेल. वनखाते हे स्वतंत्र विभाग असेल व ते वेळोवेळी प्रत्येकाच्या झाडांच्या संख्येचीे पडताळणी करेल व हि माहिती ते माहितीजालावर वेळोवेळी अद्ययावत करून ठेवतील.
वृक्षतोड वा वृक्षहानी हि मनुष्यवध वा मनुष्य हानिसारखा गंभीर गुन्हा समजला जाईल व संबंधितांवर त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.
झाडांशिवाय बर्याच काळ पडीक राहिलेली जमीन सरकार जमा करण्यात येऊन त्या जमीनी मध्ये वनखात्या मार्फत वृक्ष लागवड करण्यात येईल.
डोंगर व टेकड्या यांचा वापर पावसाचे पाणी जिरवण्या साठी storage tank म्ह्णुन करावा. यासाठी माथ्यापासुन ते पायथ्या पर्यंत आडवे चर काढावेत व त्याच्या बांधावर वृक्षारोपण करावे. या पध्दतीने काहि वर्षामध्ये दुष्काळी भागाचा कायापालट होऊ शकतो व मोठमोठी धरणे बांधावी लागणार नाही.
वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजन यासाठी प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती ग्रामिण भागामध्ये होऊ शकते, शहराकडे वळणारा लोंढा कमी होऊन शहरांचा बकालपणा तर कमी होईलच शिवाय शहरीकरणामुळे होणारा निसर्गाचा संहार सुध्दा कमी होईल.