Tuesday, March 30, 2021

Insight अंतर्दृष्टी - भाग १

 


कृष्णमूर्ती: मला असे वाटते की आपण सत्य शोधण्यासाठी, देवाचा शोध घेण्यापूर्वी, साधना सुरू करण्यापूर्वी किंवा समाजातील दुसर्‍या समवेत संबंध ठेवण्यापूर्वी प्रथम आपण स्वतःला समजण्यास सुरवात करणे अत्यंत आवश्यक आहे. 

मी त्यालाच प्रामाणिक व्यक्ती समजेन जो त्याच्या भौतिक ध्येयाचा पाठलाग करण्यापूर्वी स्वतःस नीट समजून घेईल. आपण सहसा असे करत नाही त्यामुळे आपण स्वतः, आपले नाते संबंध, आपला समाज सर्व काही भ्रमात जीवन जगत आहोत. आणि याचा अर्थ असा नाही की स्वयं शोध हा कोणत्या नात्यांच्या आड येत आहे, त्यांच्या पासून विभक्त होत आहे, त्यांना विरोध करीत आहे. सत्यशोधक हा कुटुंब आणि समाज विरोधी नसतो हे पक्के लक्षात असू द्यात.

स्वतःचा शोध करण्यासाठी कोणत्याही हेतूची आवश्यकता नसते. स्वतःचा शोध हाच सत्याचा शोध असतो.

सत्य अवस्था हि विचारांनी प्रदूषित झालेल्या मेंदूला कदापि अवगत होत नाही. अर्थातच सत्य अवस्था जी सदोदित असतेच तिचे आकलन होण्यासाठी किंवा तिच्याशी समरस होण्यासाठी एकच अडथळा असतो तो म्हणजे विचारांचा / मी चा / स्मृतींचा / पूर्व माहिती संग्रह आदींचा.

आपले विचार, आपला मी हेच आपण असतो आणि त्यांच्या पासून आपणास वेगळे होता येत नाही. आपल्या मीपणाचा निरास होण्यासाठी जे आपण प्रयत्न करतो, साधना करतो ते सर्व मी ला बळकट करीत असतात. मी स्वतःचे खरे स्वरूप कधीच प्रदर्शित करीत नाही. परंपरा बरोबर श्रद्धा असतात त्यामुळे त्यांच्या शिकवणी  शिवाय काही वेगळे असू शकते याचा विचार येत नाही. यामुळे श्रद्धाळू परंपरागत मनात अंतरदृष्टीला जागा उपलब्ध नसते, अशा मनाला सत्य आकलन होत नाही. 

श्रद्धा, परंपरा, संमोहन आणि या सर्वातून निर्माण होणाऱ्या दुःखातून पळवाट काढण्या ऐवजी *त्यांचे खोलवर निरीक्षण केले, प्रतिप्रश्न केले, तपासणी केली तरच त्यातून मुक्तता शक्य होते.

जर एखाद्या मनाला याची जाणीव झाली की त्याचे मन, बुद्धी संमोहित झाली आहे, त्याचे ज्ञान त्याला चुकीचे मार्गदर्शन करीत आहे, आपण चुकीच्या मार्गाने चाललो आहोत तर त्या मनाचा मीपणा ढासळू लागतो.

परंपरा, श्रद्धा यांना बाजूला केले की प्रदूषित मन मोकळे होते, मेंदूची संपूर्ण ऊर्जा वाया जाणे थांबते आणि अंतरदृष्टिला जागा आणि ऊर्जा उपलब्ध होते. अंतर्दृष्टी मनाला आणि विचारांना बाजूस ठेवून मेंदूची सरळ वर्तमान अवस्थेशि जोडणी करून देते. वर्तमान क्षणाच्या आकलनाने मेंदू सत्याच्या मूळ अवस्थेत येतो. 

सत्याच्या असिमित मूळ ऊर्जा अवस्थेची भौतिक पदार्थाने बनलेल्या मेंदूला कधीच प्रत्यय येऊ शकत नाही. सत्य हे स्वतःला गुप्त ठेवीत नाही, त्याच्या मध्ये तशी वृत्ती नसते परंतु भौतिक मानवी मेंदू किंवा त्याने बनविलेली उपकरणे त्या शक्तीचे आकलन करू शकत नाही. 

प्रश्न निर्माण होतो की शोधाची सुरुवात करण्याची इच्छा मनात कशी निर्माण होते? स्वतःच्या सांप्रत स्थितीबद्दल असंतोष हे स्वशोधाचे मूळ कारण असते. शोध सुरू करताना सगळे सगळ्यात दूर असणाऱ्या ईश्वराचा शोध सुरू करतात आणि संकल्पनांच्या मायाजालात फसविले जातात. परंतु शोध स्वतःपासून सुरू केला तर एकेक कडी जुळविणे शक्य होते. आपण, आपले जग हे सर्व निसर्गाचा भाग आहे, निसर्ग काल्पनिक नाही, आणि तो एक तथ्य आहे. आणि आपण आत्ता ज्या स्थितीमध्ये आहोत ते सुद्धा तथ्य आहे. तथ्यापासून सुरुवात करता येते. जे काही आत्ता वर्तमान आहे ते कालातीत आहे.

आत्ता जे वर्तमान आहे त्याचे पृथक्करण, विश्लेषण वगैरे न करता फक्त निरीक्षण करण्यासाठी अतिशय कुशाग्र बुद्धि आणि विनम्र हृदय असणे आवश्यक असते. जर आपण आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीचे निरीक्षण करू शकलो तर आपण स्वतःस समजू लागतो. आपण स्वतःला आपल्या कृतीच्या आरशात पाहु शकतो. आपण काय करीत आहोत, आपल्या काय भावना आहेत, आपण काय विचार करीत आहोत याविषयी आरशात आपण स्वतःला जानु शकतो. जेव्हा पूर्ण लक्ष असते आणि मौन असते तेव्हा शिकणे शक्य होते.

सत्य आपणास दुसरे कोणी सांगू शकत नाही ते आपल्यालाच शोधावे लागते. त्यासाठी प्रत्यक्ष वर्तमानाचे आकलन आवश्यक आहे. जेव्हा मनातील प्रदूषित विचार मध्ये येतात तेव्हा ते प्रत्यक्ष आकलन होत नाही. जेव्हा कोणी पळवाट न काढता, विरोध न करता त्या वर्तमानात राहू शकतो तेव्हा ती अवस्था सत्याकडे निर्देश करते, त्याला तो निर्देश आकळला तर त्याच्यात क्रांती होते.

Monday, March 15, 2021

प्रेम हे सत्य आहे की वास्तव आहे?


कृष्णमूर्ती: सत्य अवस्थेत प्रेमाचे काय स्थान असावे?

डेव्हिड बोहम: प्रश्नाचा नेमका अर्थ काय आहे हे समजले नाही.

कृष्णमूर्ती: प्रश्नाचा अर्थ असा आहे की ज्यास आपण प्रेम म्हणतो ते वास्तविकतेच्या क्षेत्रात असते की ते सत्य अवस्थेचा आविष्कार आहे?

डेव्हिड बोहम: मला असे वाटत नाही की ते वास्तवाच्या क्षेत्रात असू शकते.

कृष्णमूर्ती: पण आपण त्याचे अधःपतन केले आहे हे कबूल आहे?

डेव्हिड बोहम: हो, त्यामुळे ते वास्तवाच्या क्षेत्रात कार्य करू शकते.

कृष्णमूर्ती: मग प्रेम आणि सत्य यांच्यात काय संबंध आहे? सत्य हे प्रेम आहे का? ‘प्रेम’ म्हणजे काय, सर?

डेव्हिड बोहम: करुणा, सद्भावना, परोपकार परंतु प्रेमाचा बहुतेक अर्थ विविध प्रकारचे आनंद या सदरात मोडतात.

कृष्णमूर्ति: अगदी बरोबर. मग वास्तविकतेच्या क्षेत्रात आनंद आहे का?

डेव्हिड बोम: होय तो वास्तविक जीवनाचा भाग आहे.

कृष्णमूर्ती: अर्थातच मग वास्तविक आनंदाचा सत्याशी काही संबंध असणार नाही.

कृष्णमूर्ती: मग वास्तवाच्या क्षेत्रात करुणेचा काय संबंध असेल? जर आपण म्हणालो की करुणा म्हणजे प्रेम आणि तेच सत्य ...

डेव्हिड बोहम: करुणा हि सत्याच्या कृतीचा भाग आहे.

कृष्णमूर्ती: बरोबर. मानवी प्रेम हे वास्तवाच्या ठिकाणी असते तर करुणा ही सत्य अवस्थेच्या ठिकाणी असते.  हे समजणे तसे खूप कठीण जाते. ज्यावेळेस एखादा यथार्थपणे पाहतो तेव्हा त्याला कळते आणि ती करुणा असते. 

डेव्हिड बोहम: सत्य हे पूर्ण आणि अविभाज्य ( अद्वैत ) असते. करुणेचा अभाव विभाजनातून (द्वैत) उद्भवू शकतो. जर कोणी निसर्गापासून आणि इतर मानवी समुहा पासून स्वतःला विभक्त समजत असेल तर तो विभाजित असणार त्याला करुणा येणार नाही.

कृष्णमूर्ति: जेव्हा विचारांची प्रक्रिया आपल्या मी मध्ये ‘मी’ आणि ' इतर ' म्हणून चालत असते तेव्हा द्वैताची भावना असते, तेव्हा तेथे प्रेम असते की तेथे करुणा असते?

डेव्हिड बोहम: त्यात वेगळेपण आहे, विभाजन आहे, द्वैत आहे तिथे करुणा नसते.

कृष्णमूर्ती: वास्तविक जीवनात आपण इतरांवर आपल्या स्वार्थासाठी अवलंबून असतो आणि त्यासाठी आपण त्यांच्यावर प्रेम करत असतो. जेव्हा आपला स्वार्थ साधला जात नाही तेव्हा आपले प्रेम सुद्धा समाप्त होते. हा वास्तविक जीवनातील प्रेमा आडचा स्वार्थ ज्याच्या लक्षात येतो त्याच्यासाठी प्रेम हि भावना समाप्त होते. त्यासाठी त्याचे इतर जनावरील अवलंबत्व नाहीसे होते, तेव्हढा तो स्वतंत्र कुवतीचा असावा लागतो याचा अर्थ तो कठोर झाला असे नसते. या बदला नंतर त्याच्या स्वार्थी प्रेमाचे रूपांतरण निस्वार्थी करुणेेत होते. तो कोणावर अवलंबून नसला तरी तो सर्वांवर सारखेच प्रेम करेल.

डेव्हिड बोम: होय. करुणेसाठी तो बदल आवश्यक आहे.

कृष्णमूर्ती: परंतु जोपर्यंत मी इतरांवर अवलंबून आहे तोपर्यंत करुणा निर्माण होत नाही. 

(जोपर्यंत आपण जीवन जगण्याच्या आनंदातून आणि संघर्षातून स्वतंत्र होत नाही तोपर्यंत सत्य आपणास कळत नाही).

डेव्हिड बोहम: जेव्हा आपण इतरांवर अवलंबून असतो तेव्हा आपले ते वास्तविक जीवन असते ज्यात अज्ञान आणि असत्य असते.

कृष्णमूर्ती: नक्कीच. यातून आपण काय सुचवीत आहोत? जो माणूस वास्तवात जगतो आणि त्या क्षेत्रातील असमंजसपणाचे तर्कसंगत निरीक्षण करतो त्याच्यासाठी ते तर्कशुद्ध पाहणे हे सत्य आहे कारण त्यामुळे त्याला त्या क्षेत्रातील संपूर्ण असमंजपणा, विकृती दिसते.

डेव्हिड बोहम: होय, ते सार आहे.

कृष्णमुर्ती: आणि कारण तो तर्कसंगत पाहतो - ते पाहणे म्हणजे कृती करणे होत, तेच सत्य होय. म्हणून तो जरी वास्तवाच्या क्षेत्रात दिसत असला तरी तो सत्यात जगत असतो.

डेव्हिड बोम: होय. जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्‍यावर अवलंबून असते (गुरु, ग्रंथ, ईश्वर वगैरे) तेव्हा त्या अवस्थेत तो तर्कसंगत, निष्पक्ष पाहण्यात असमर्थ असतो. तो वास्तविक क्षेत्रात त्या क्षेत्राच्या योग्यतेपेक्षा कमालीचे जास्त व्यग्र राहिल्याने तो वास्तविक क्षेत्रास खूपच जास्त महत्त्व देत असतो.

कृष्णमूर्ती: अगदी बरोबर.

डेव्हिड बोहम: आणि म्हणून आपले सर्व जीवन विकृत झाले आहे.

Thursday, March 11, 2021

यथार्थ पाहणे

 


डेव्हिड बोहम: सत्य पाहणे म्हणजे यथार्थ पाहणे होय. एखाद्याला वास्तवातील विकृत रूप दिसते, परंतु तरीही ते त्याला सोडता येत नाही. तो विकृतींकडे कसे पाहू शकेन म्हणजे ते संपूर्ण सुटू शकेल आणि त्यामध्ये तो परत अडकणार नाही?

कृष्णमूर्ती: महाशय, खरी मेख इथेच आहे. विकृती पाहणे, ती नाहीशी होणे हि वैचारिक प्रक्रिया आहे की ती विवेकाचे आकलन आहे?

डेव्हिड बोहम: नाही, वैचारिक प्रक्रिया नक्कीच नाही.

(पूर्वसुरींचे ज्ञान कितीही महान असले तरी का कामास येत नाही? ते सर्व आता विचार मात्र आहेत).

कृष्णमूर्ती: तुम्ही म्हणता ते विचारांनी आकलन होत नाही; विचार प्रक्रिया केवळ त्याचे स्पष्टीकरण करताना उपयोगात येते, स्पष्टीकरण आणि वर्णन म्हणजे ते नव्हे.

यथार्थ पाहणे म्हणजे संपूर्ण पाहणे होय. ते तसे असलेच पाहिजे, अन्यथा ते पाहणे होत नाही. आणि जर मनाने खरोखर यथार्थ पाहिले तर विकृती कधीही परत येऊ शकत नाही.

डेव्हिड बोहम: होय, मी असे म्हणतो आहे की, वास्तव जीवनातील विकृतीचे स्थूल स्वरूप पहा, प्रत्येक लहान तपशील पहायची आवश्यकता नाही. 

( उदा. संपूर्ण राजकीय व्यवस्था भ्रष्ट आहे हे लक्षात आले तर कोण अधिक भ्रष्ट आणि कोण कमी भ्रष्ट आहे याचा तपशील पाहणे महत्वाचे नाही. भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याशिवाय राजकारणात टिकणे अशक्य आहे, हे पाहणे आणि समजणे म्हणजे यथार्थ पाहणे होय). 

कृष्णमूर्ती: नाही, नक्कीच नाही. तसे करीत राहिलो तर संमोहन जाणार नाही.

वैश्विक बुद्धिमत्ता, विवेक वास्तविक जीवनात ठराविक परिस्थिती मध्ये काय आणि कसे कार्य करतो हे कोणी अगोदर सांगू शकते काय? त्याचे भाकीत करू शकतो काय? त्याचे तपशील सांगू शकतो काय? किंवा असे आपण म्हणू शकतो काय की हे प्रश्नच विकृत आहेत?

डेव्हिड बोहम: ते काहीसे विकृत आहे. त्या प्रश्नांचा अर्थ असा होतो की वैश्विक बुद्धिमत्ता सुद्धा ही एक प्रकारची वास्तविकता आहे.

कृष्णमूर्ती: होय. परंतु आपण हेच सतत करीत असतो. जुन्या ग्रंथात केलेली वर्णने, भाकिते सत्य मानून त्याचे आचरण करीत राहतो. आपण गुरूंना प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडून सत्य आपल्या वास्तविक जीवनात येईल यासाठी विनवणी करीत असतो. 

डेव्हिड बोहम: मला वाटते की एखाद्या माणसाकडे ज्ञान आहे असे सांगण्याऐवजी त्या माणसाच्या कृतीतून वैश्विक बुद्धिमत्ता कार्यरत आहे हे आपण समजू शकतो, असे म्हणणे योग्य होईल.

(म्हणजे ती व्यक्ती धार्मिक अधिकारी, अध्यात्मिक गुरु या परंपरेत अडकणार नाही).


क्रमशः...


सत्याचे आकलन कसे होते?

कृष्णमूर्ती: आपण वास्तव जगात जगत असतो. वास्तव जग म्हणजे विचारांच्या संकल्पनेतून साकारलेले जग. विचार कधी बरोबर असतील किंवा कधी चुकीचे असतील. वास्तव जगात वावरत असताना त्यातील विषमता, हिंसा, भ्रष्टाचार, धर्मांधता, सत्त्तालोलुपता, व्यभिचार, दुःख पाहून त्या जीवनातील विफलता लक्षात येवू लागते. वास्तव जीवनातील विकृती लक्षात येणे हे विवेक बुद्धिमत्तेचे कार्य असते. वास्तवातील विकृती लक्षात येणे म्हणजे जीवनातील तथ्ये ओळखू येणे होय आणि द्रष्टा आणि दृश्य म्हणजे काय आणि ते दोन्ही एकच कसे आहेत हे लक्षात येणे, ते सर्वंकष आकलन हेच सत्य होय.

डेव्हिड बोहम: आपण थोडी घाई करीत आहो असे वाटते. वास्तवातील विकृती पाहिल्यामुळे द्रष्टा आणि दृश्य एक आहेत हे लगेच आकलन होत नाही.

कृष्णमूर्ती: बरोबर, मी घाई केली, होय. आपण विकृती कशी बघतो? विकृती पाहणे ही एक तर्कसंगत प्रक्रिया आहे काय?

डेव्हिड बोहम: नाही, ते त्वरित, वेळेशिवाय होते.

कृष्णमूर्ती: होय, वेळेशिवाय होते 

डेव्हिड बोहम: कदाचित आपण यावर हळू हळू पुढे जावे कारण कधीकधी एखाद्याला असे दिसते की ते एका फ्लॅशमध्ये होते, तर काहीवेळा ते इतके हळू समजते की ते केव्हा होते हे आपल्याला ठाऊक नसते.  असे दिसते की हे दोन्ही सत्याला अनुभवण्याच्या वेगवेगळ्या वाटा आहेत.

कृष्णमूर्ती: सत्य हे हळूहळू समजू शकते काय? विकृती पाहणे म्हणजे विकृती मधून तत्क्षणी बाहेर येण्यासारखे आहे, ते एकदम होईल, हळूहळू कसे होईल? 

डेव्हिड बोहम: नाही, हळूहळू होणार नाही, परंतु मला असे वाटते की आपण ‘फ्लॅशमध्ये’ म्हणाल तर तुम्ही तिथे काळ आणता की नाही?

कृष्णमूर्ती: नक्कीच.

डेव्हिड बोहम: अचानक म्हणालो तरी आपण काळ आणतो. आपण हळूहळू असे म्हणाल्यास परत काळ येतोच. आपण दोन्हीही म्हणू शकत नाही. एखादा विकृति पाहिल, परंतु तो अजूनही त्यापासून मुक्त नसल्याचे त्यांना आढळेल आणि म्हणूनच काळ मध्ये येतो.

कृष्णमूर्ती: मग त्याने सत्य पाहिलेच नाही. जर मी ते असत्य, विकृत जीवन पाहिले आणि तरीही त्यातून मुक्त होत नसेन तर मी सत्य पाहिले नाही असा त्याचा अर्थ होतो.

डेव्हिड बोम: होय. त्याने ते यथार्थपणे पाहिले नाही.

कृष्णमूर्ती: आणि सत्य पाहणे म्हणजे यथार्थ पाहणे होय.

डेव्हिड बोहम: पाहणे यथार्थ हवे, खोलवर हवे, परंतु मला वाटते की या मुद्द्यावर फार सावधगिरीने कार्य करणे आवश्यक आहे, कारण सामान्यत: काय होते की एखाद्याने पाहिले तर संपूर्ण दिसत नाही आणि मग तो तुम्हाला विचारेल, 'मला वास्तवातील विकृत रूप दिसते, परंतु तरीही ते सोडता येत नाही. मी कसे त्याच्याकडे पाहू शकेन म्हणजे ते सुटू शकेल? अशा परिस्थितीत मी काय करावे?'


क्रमशः...

Monday, March 08, 2021

सत्य आणि वास्तव

What is the point of listening to the speaker and not living it. In the listening and not doing is the wastage of life. If you listen to something that is true and not acting you are wasting your life. Life is much too precious, it is the only thing that we have. And we have also lost touch with nature. Which means we have lost touch with ourselves which is part of nature. When one realises all this not merely intellectually and verbally then one lives religious life. - J Krishnamurthy

आता पर्यंत अनेक सत्य मार्गदर्शक येवुन गेले परंतु आपल्या जीवनातील दुःख संपत नाही, अंधकार नाहीसा होत नाही, प्रकाशाचा नेमका कोठे शोध घ्यावा कळत नाही.

एखाद्यास सत्य काय आहे हे कळल्यानंतर त्याच्या जीवनात परिवर्तन होते की त्याच्या जीवनात परिवर्तन होत असताना त्याला सत्य समजू लागते?

मनुष्यप्राणी सहसा इतरांचे ऐकून आपले जीवन बदलत नाही आणि सत्य स्वतःहून कोणाच्या जीवनात ढवळाढवळ करणार नाही, अतिक्रमण हा त्याचा स्वभाव नाही. 

दोघेही आपापल्या मर्यादेत राहून आपापल्या मर्यादा सोडणार नसतील तर दोघे कधीकाळी एकत्र कसे येणार?

Let there be a Light, माझ्या जीवनात सत्य येवू दे हि हाक वास्तव जीवनातून सत्या पर्यंत पोहोचली की सत्य वास्तवाला वास्तवाच्या मजबूत भिंती पाडायला मदत करू लागते काय? कारण वास्तवाने जीवापाड मेहनत करून उभारलेले त्याचे विश्व पाडण्या ईतकी धमक आणि बुद्धीचे वैभव त्याच्या जवळ असेलच असे नाही. वास्तवाला अज्ञातामध्ये काय दडले आहे हे समजू शकत नाही आणि ज्ञातामधले सुख, सुरक्षा सोडवता येत नाही. 

सुखाच्या एका रेषेत चाललेले आयुष्य मग अचानक भरकटू लागते, वास्तवातील एक एक मजबूत बुरुज ढासळू लागतात, जीवन असह्य होवू लागते, तहान भूक हरपते, नको ते जीवन असे वाटू लागते आणि त्याचवेळी ज्ञातातील सुख आणि सुरक्षा कवडीमोल आहेत हे कळून चुकते. जर ज्ञात जीवनात निरंतर सुख आणि सुरक्षा नसेल तर तसे काही नसतेच ती कदाचित अज्ञाताची खेळी असावी याचा स्वयं साक्षात्कार होतो आणि ते मन मग अज्ञातात उडी मारण्यास तयार होते. 

एका अथांग जलाशयावर उसळलेली लाट काही काळ दिसते आणि नंतर नाहीशी होते. एक लाट शांत झाली तरी दुसरी परत उसळी घेते. जी लाट वरती जाते ती खाली येणार असते आणि जी खाली येत असते ती सागराशी एकरूप होत असते.

I have energy. The mind has energy now because I have pushed away all the things through observation, not through resistance that were dissipating energy. 

विरोध न करता केवळ आकलनाने मी माझ्या वास्तव जीवनातील सर्व काही दूर केले आहे ज्यासाठी माझी शक्ती व्यर्थ वाया जात असे. ती शक्ती आता माझ्या जवळ आहे, ती शक्ती माझ्या मनाला अज्ञाताच्या प्रवासात मदत करील.

Krishnamurti from Dialogue 6 with Allan W. Anderson in San Diego, California, 20 February 1974

Sunday, March 07, 2021

श्रद्धा आणि सत्य

 प्रश्न: आपणाकडे हजारो वर्षांची परंपरा आहे जी आपणास ईश्वर, परब्रम्ह, ब्रम्ह, आत्मा, परमात्मा या गोष्टींचे प्रतिपादन करत असतात. या गोष्टी आपल्या श्रद्धा बनलेल्या आहेत. आपली मने त्यांच्या श्रद्धा मधून बाहेर येत नाहीत. तेच सत्य आहे की सत्य त्यापेक्षा काही वेगळे आहे?

कृष्णमूर्ती : Word is not the thing, description is not the described. शब्दांनी सत्याचे वर्णन करता येत नाही. ज्याचे वर्णन करता येतात, ती वर्णने म्हणजे सुद्धा सत्य नव्हे, हे प्रथम आपल्या मनात खोलवर रुजले पाहिजे. 

आपले वेद, उपनिषदे, गीता, इतर ग्रंथ, ग्रंथकर्ते, शंकराचार्य सारखे विद्वान हि सर्व मंडळी आपले मन संमोहित करत राहतात हे सुद्धा लक्षात घेणे महत्वाचे आहे. 

सत्य म्हणजे काय असावे यासाठी वरील सर्व शास्त्रे, ग्रंथ यांचा अभ्यास करायला हरकत नाही. परंतु त्यातील मतितार्थ लक्षात आला की त्यांना लगेच संपूर्ण बाजूस करायला हवे, ते आपला आधार बनता कामा नये. ज्याला कशाचा तरी आधार लागतो ते सत्य नसते याची मनात खूणगाठ बांधलेली असावी.

सत्य हे सर्व धार्मिक आणि अध्यात्मिक संकल्पनांच्या बाहेर असणार हे त्यामुळे आपणास समजू शकते. 

जिथे मन जावू शकत नाही, ज्याचा विचार करता येत नाही असे 'जे काही असेल ते तसे'  सत्य असू शकते.

https://youtu.be/qxlhTgCeA4w

Wednesday, March 03, 2021

मन आणि सत्य यांचा संबंध

 


कृष्णमूर्ति: जेव्हा एखादी व्यक्ती ही विवेकी विचार करू लागते त्यावेळी त्याच्या मनातील शांत अवस्थेचे काय होत असावे? 


DAVID BOHM: जेव्हा मन शांत झालेले असते आणि त्या शांतीने संकल्प विकल्पांचे विचार नाहीसे झालेले असतात त्यानंतर विवेकी विचार हे सत्य अवस्थेशी समांतर चालत असणार.


कृष्णमूर्ती: ते समांतर असतील की दोघांमध्ये एकसुत्रीपणा असेल?


DAVID BOHM: एका अर्थाने ते एकच असू शकतील कारण विवेकी विचार हे सत्य विषद करत असतात. 


कृष्णमूर्ती: आपण पूर्वी सांगितले होते की विचार हे सत्य नसतात. विचार हे कालबद्ध असतात तर सत्य हे कालमुक्त असते.


DAVID BOHM: सत्य अवस्था विचारांवर अवलंबून नसते हे बरोबर आहे परंतु विचार हे सत्य अवस्थेवर अवलंबून आसु शकतात. सत्य अवस्थेमुळे विचारांना योग्य गती मिळणे शक्य आहे.


कृष्णमूर्ती: सत्य हे विचारांवर कृती करू शकत असेल तर ते सर्व एकाच मनाच्या ठिकाणी आहेत असे होते. म्हणजे तिथे सत्य आणि विचार अशी द्वैत अवस्था नाही. सत्य अवस्था हि विचारांची मदत घेवू शकते, विचारांच्या माध्यमातून ती वास्तविक जगात कार्य करू शकते, त्यावेळी तिच्या विवेक बुद्धिमत्तेचा प्रत्यय येतो. या उलट, जेव्हा विचार सत्यावर प्रतिक्रिया करतात तेव्हा तिथे विभाजन दिसते, अद्वैत दिसते.


डेव्हिड बोम: होय. सत्याचे कार्य करण्यासाठी वास्तविकता हे एक आवश्यक क्षेत्र आहे. पण जेव्हा संमोहित विचार सत्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते सत्यापासून विभक्त असतात, तेव्हा खरी अडचण येते. (तथाकथित प्रचारक जेव्हा स्वरूप साक्षात्कार नसताना ग्रंथ लिहीत असतात) तेव्हा ते सत्य अवस्थेचा केवळ कल्पना विलास असतो.


कृष्णमूर्ति: आणि म्हणून ते विभागलेले आणि खंडित असतात, द्वैतबुद्धित असतात, होय.


डेव्हिड बोहम: आणि असा कल्पनाविलास  वास्तविकतेस सत्याचा दर्जा देतात, त्यास अधिक विकृत करतात. जेव्हा वास्तविकता ही सत्य अवस्थेची एक क्रिया, कार्य असेल तर ती त्याचा एक भाग असते, तेव्हा ते दोन्ही एक असतात.


कृष्णमूर्ती: होय. जेव्हा विवेकी बुद्धिमत्ता वास्तविकतेच्या क्षेत्रात कार्य करते, तेव्हा दोन्ही एक असते, ते विभाजन करत नाही.


कृष्णमूर्ती: सर, आपणास असे म्हणायचे आहे काय की, जेव्हा सत्य अवस्था ही वास्तविक अवस्थेच्या संपर्कात येते, क्रिया करते तेव्हा ते दोन्ही एक असतात, तेव्हा द्वैत नसते. म्हणजे सत्याला वास्तवतेची कार्य करण्यासाठी आवश्यकता भासते? 


आपण सत्याविषयी काही बोलू शकत नाही. सत्य म्हणजे काय हे त्याचा अनुभव येत नाही, ते अज्ञात आहे आणि अज्ञातच राहणार आहे. आपण फक्त वास्तविकता आणि वास्तविकतेचे अज्ञान याबद्दलच चिंतन करू शकतो. वास्तविकता म्हणजे आपले विचार, भूतकाळ, माहिती संग्रह, श्रद्धा म्हणजे सर्व मानसिक कल्पना आणि त्यावर आधारित जीवन होय. आपल्या मानसिक - वास्तविक अवस्थेतील अज्ञाना विषयी, विकृती विषयी, संमोहन विषयी आपण सजग होणे, त्यांना सतत निरपेक्ष वृत्तीने न्याहाळणे एवढेच करू शकतो, त्यांचा प्रतिरोध सुद्धा करू शकत नाही. हे जे निरपेक्ष न्याहाळणे असते त्याला स्वातंत्र्य हवे असते, संकल्प विकल्प विरहित विचारांचे स्वातंत्र्य हवे असते. असे स्वातंत्र्य आपणास ती ऊर्जा देते ज्यामुळे आपली विकृती नाहीशी होते. ते आकलन, विकृतींना पाहणे हेच सत्य होय. म्हणजेच सत्य हे आपल्या विकृती पाहणे आणि त्या नुसार क्रिया करणे याच्या व्यतिरिक्त असू शकत नाही. यालाच आपण सत्सदविवेक म्हणू शकतो, जो वास्तविक जीवनात विकृती विना कार्यरत होऊ शकतो. 


जेव्हा आपण स्वतःला विकृती पासून मुक्त करतो तेव्हा सत्य म्हणजे ती विकृती पाहणे, म्हणजेच विवेकी क्रिया करणे होय आणि त्यानुसार विवेकाचे वास्तविक जीवना मध्ये आचरण करणे होय. आपल्या जाणीव मध्ये, आपल्या जीवनामध्ये असंख्य संमोहन असतील, प्रचंड अज्ञान असेल, अनेक विकृती असतील ते सर्व या निरपेक्ष न्याहाळण्यात एकत्रित निघून जातील. हे सर्व होण्यासाठी मन शून्य अवस्थेत हवे.


DAVID BOHM: शून्य अवस्था म्हणजे रिकामे मन


कृष्णमूर्ती: मनाला रिकामे करणे म्हणजे खरी साधना होय, खरे ध्यान होय.



Tuesday, March 02, 2021

मनाच्या अवस्था ते निर्मन अवस्था

https://krishnmurti.blogspot.com/2021/03/blog-post_2.html 

वरील भाषांतर केल्या नंतरचे विचार:

[3/2, 6:55 AM] Vitthal Sawant: एखादे मन देव, देश, धर्म, गुरु, ग्रंथ, संप्रदाय यांच्या भक्तीतून म्हणजे त्यांच्या संमोहन मधून रिकामे झाले की त्याला रिकामे मन म्हणतात. असे रिकामे मन नंतर द्रष्टा आणि दृश्य हे एक आहे हे समजू शकते. ते उलटे असू शकणार नाही असे मला वाटते.

जोपर्यंत एखाद्या मनाला आपणास सत्य का समजत नाही असा प्रश्न पडतो त्यावेळी त्याचे संस्कार आणि त्याची संस्कृती सत्याच्या आड येत आहे हे लक्षात येते तेव्हा तो त्या जीवनातून मुक्त होवू शकतो. 

विकृती नष्ट झाल्याशिवाय सत्य दर्शन असंभव आहे. द्रष्टा आणि दृष्य हे एक आहेत हे समजणे म्हणजे सत्य दर्शन आहे आणि ते आपण संस्कारांच्या विकृती मध्ये जीवन जगत असू तर ते समजणे अशक्य आहे.

[3/2, 7:30 AM] Vitthal Sawant: मन हे नेहमी मर्यादित असते त्याला अमर्याद व्हायचे असते.

मन मर्यादित असताना त्याला संसारातील सुखे आकर्षित करतात जसे की सेक्स, food, politics, music, dance, tours etc. यांना आपल्या शास्त्रांनी तुच्छ सूखे कल्पीली आहेत.

याउलट देव, देश, धर्म, गुरु, ग्रंथ, संप्रदाय यामध्ये मन अमर्याद होण्याचा प्रयत्न करते. यांना शास्त्रांनी उच्च स्थान दिले आहे त्यामुळे त्यांची भक्ती म्हणजेच मुक्ती असे समीकरण झाले आहे. 

परंतु मनाच्या हे लक्षात येतं नाही की त्याला सतत मनोरंजन हवे असते यासाठी हि तुच्छ सूखे आणि उच्च भक्ती निर्माण झाली आहेत. त्यामध्ये ते आकंठ बुडालेले असते. आणि मग ते सगळे उपभोगून नंतर शांतीच्या मागे लागते.

म्हणजे जोपर्यंत मन अपूर्ण असते तो पर्यंत मनाला मनोरंजन हवे असते तोपर्यंत ते सुख आणि भक्ती करीत राहते. आणि जेव्हा एखादे मन सर्व सुखांचा त्याग करायला तयार होते त्यावेळी ते अमर्याद INTELLIGENCE च्या कक्षेत येते आणि मग त्याचे सत्य जीवन सुरू होते.

[3/2, 8:00 AM] Vitthal Sawant: इथे काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात की, 

हे नेमके घडते कसे?

जे मन सुखांच्या मागे सतत लागलेले असते ते मन सुखांचा त्याग का करेल?

INTELLIGENCE जे नेहमी अव्यक्त असते ते मनाला त्याची सूखे सोडण्यासाठी guide आणि force करू शकते काय?

की जे मन सांसारिक सूखे उपभोगून नंतर भक्ती करून थकले आहे ते आता शांत होवू इच्छित आहे, त्याला आता काही नको आहे, ते मन सहज अवस्थेत येत असावे काय?

सांगून कोणत्याही मनास समजत नाही. प्रत्येक मनाला जे हवे आहे तो ते मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असते. जेव्हा खरीखुरी शांती ही त्याची गरज निर्माण होईल तेव्हा त्याला ती प्राप्त होईल.

[3/2, 9:02 AM] Vitthal Sawant: *कर्म, भक्ती, ज्ञान, मुक्ती या चारही मनाच्या अवस्था असाव्यात?* 

जेव्हा मनास आत्यंतिक सुखाची अपेक्षा असते तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी *कर्म* आवश्यक असते.

कर्म आणि सुख लोलुपता यातून समाज विघातक वृत्ती येवू नये म्हणून देव, देश, धर्म यांची *भक्ती* ही मनाची अवस्था येत असावी. 

सुखलोलुप आणि भक्तीपेक्षा जीवनाचे सत्य शोधणे श्रेष्ठ आहे यासाठी *ज्ञानप्राप्ती* करून घेणे अपरिहार्य होते. 

सुख, भक्ती आणि ज्ञान या सर्व मनाच्या अवस्था होत याची जाणीव मनास होणे म्हणजे त्या सर्वानपासून *मुक्तता* होय. 

मर्यादित मन आणि अमर्यादित INTELLIGENCE या दोन्ही मधील सीमारेषा म्हणजे मनाची ही मुक्तवस्था असणार. या सिमारेशेचया आतील जगा विषयी मन सजग असू शकते परंतु त्या सीमा रेषेच्या पलिकडील अवस्था ही मनाची नसते म्हणून ते मनाला जाणता येत नाही.

[3/2, 9:23 AM] Vitthal Sawant: मर्यादित मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांच्या पलीकडे अमर्याद अवस्था असावी असे भासते परंतु हि अमर्याद अवस्थाच फक्त अस्तित्वात असते. 

अमर्याद अवस्थेवर मनाच्या अवस्थांचे ढग आलेले असतात. ढगांचा एकेक पुंजका नाहीसा होताच आकाश स्वच्छ, निरभ्र होते.

[3/2, 9:40 AM] Vitthal Sawant: संपूर्ण मानव समाज एकाचवेळी मनाच्या एकाच अवस्थे मध्ये अथवा मनाच्या अत्युच्च अवस्थेमध्ये असू शकणार नाही. 

कोणी सुखलोलुप असू शकतो, कोणी भक्ती करीत असेल, कोणी ज्ञानी असेल आणि कोणी मुक्त असू शकतो.

जसे सुखलोलुप इतरांना नावे ठेवतो तसेच मुक्तजन सुद्धा इतरांना नावे ठेवतात, त्यांना अज्ञानी, विकृत समजतात वगैरे 😄😄😄