एका व्यक्तीकडे काही गाई होत्या आणि तो गरजू व्यक्तींना गाई दान करायचा. एकदा एक व्यक्ती त्याच्याकडे आला आणि त्याची गाय दान मागू लागला. माझ्याकडे चांगला गोठा आहे, शेत आहे, भरपूर चारा आणि पाणी आहे. माझा गुराखी आपल्या गाईची चांगली देखभाल करीन आणि तिची योग्य अशी काळजी घेईन. दानशूर व्यक्तीने त्या गरजू व्यक्तीला त्याची एक गाय दान देण्याचे कबूल केले. घेवून जा एक गाय असे तो म्हणाला. गरजू व्यक्ती म्हणाली की आपण जे करीत आहोत त्याची इतरांना सुद्धा माहिती व्हावी म्हणून आपण माझ्याकडील आणि आपना कडील चार चौघांना बोलावू आणि त्यावेळी पुढील व्यवहार कसा करायचा ते ठरवू या. दानी व्यक्तीने ते सुद्धा कबूल केले.
ठरलेल्या दिवशी दोन्हीकडील बाया माणसे एकत्र आली, गाईची निवड केली. निवड झाल्या नंतर दानी व्यक्तीने गाय घेवून जा असे सांगितले. परत गरजू व्यक्तीने सांगितले असे नाही लगेच नेता येणार. आपण गाय घेवून जायचा मुहूर्त काढू या. पुजाऱ्याला बोलवा. पुजारी आला, मुहूर्त काढला गेला. गरजू व्यक्तीने जमलेल्या सर्वांना भोजन, पाहुणचार आणि पुजाऱ्याची दक्षिणा दानी व्यक्तीने करावी असे सांगितले. कारण दान तो करीत आहे.
नंतर योग्य मुहूर्तावर गाय दान करण्याचा सोहळा दानी व्यक्तीकडे घेण्याचे ठरले. दोन्हीकडील सर्व नातलग आणि मित्र मंडळीना पाचारण केले गेले. त्यांचा पाहुणचार दानी व्यक्तीला करावयास लावला. नंतर गाय सांभाळणाऱ्या गुराख्याचा यथोचित सत्कार केला गेला. गाईला सांभाळण्यासाठी दक्षिणा मागण्यात आली, गाईला नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करावयास लावली, कारण दान तो करीत आहे.
गोदान पेक्षा कन्यादान हे कितीतरी महान आहे. ती कन्या आता आपल्या कुटुंबाचा भाग होणार आहे, आपल्या मुलाची अर्धांगिनी होणार आहे, त्यांच्या मुलांची ती आई होणार आहे. तिचे नातलग सुद्धा आता आपले नातलग होणार आहेत.
आणि ते कन्या दान घेताना आपण वधू पक्षाला किती छळत असतो याचा कधी आपण विचारच करीत नाही.
याचे कारण पूर्वी जे जे त्या अनुभवातून गेले आहेत अगदी जुन्या गायी सुद्धा त्यांना तेच योग्य वाटत असते. आणि नवीन गाय घेताना तोच व्यवहार अधिक क्रूर कसा करता येईल याचाच सगळेजण विचार करीत असतात.
सत्य हे सहज असते त्याला आपण आपल्या अव्यवहाराने कडवट बनवीत असतो.
No comments:
Post a Comment