जागेपणातील प्रत्येक गोष्टी वर लक्ष ठेवण्यापेक्षा फक्त जागेपणा वरच लक्ष ठेवले तर चालू शकेल काय?
मनाला ज्याची सवय होते त्या गोष्टी मन त्याची जाणीव न ठेवता सुद्धा करीत राहते. पोहणे अथवा ड्रायव्हिंग हे सुरुवातीस लक्ष पूर्वक शिकावे लागते परंतु नंतर त्याची सवय झाली की मनाला ते सहज जमू लागते. मनाला जुने आणि तेच ते नको असते, त्याला सतत नवीन हवे असते. सतत नवे हवे असण्याची जी जाणीव आहे तेच मन असते. अशा अवखळ मनाला वेसण कशी घालायची तर त्याला जे नको आहे ते त्याला करावयास लावायचे.
आपण आत्ता काय करीत आहोत याचे सतत भान ठेवल्याने मनाला अवांतर कल्पना मध्ये रमण्यास वेळ मिळत नाही. आणि आपल्या आयुष्याचा खूप कमी भाग असलेल्या मनास तेव्हढ्या उपायाने निरुत्तर करता येते.
आपण जागे असतो याची जाणीव असते परंतु त्याची इतकी सवय झालेली असते की मन ते लक्षात ठेवत नाही.
अशा वेळी मी जागा आहे या एकाच जाणिवेत राहणे योग्य होईल की मी आता जे काही करीत आहे त्या जागे पणातील जेव्हढ्या शक्य होईल तेव्हढ्या गोष्टीवर लक्ष ठेवणे योग्य होईल?
सकाळी उठल्यावर आपण जागे असतोच. समजा आपण फक्त मी जागा आहे एव्हढीच जाणीव सतत ठेवली तर मन तेथे अडकून राहील. जागे झाल्या नंतर पुढे काय करायचे आहे हे मन विचार करू शकणार नाही आणि जीवन तेथे ठप्प होण्याची शक्यता आहे.
दिवस आणि रात्र हे भास आहेत, तथ्य फक्त सूर्य आहे. सूर्य असल्या आणि नसल्या मुळे दिवस रात्र भासतात. त्या प्रमाणे जीवन सतत चालू असते आणि त्यामधील जागृत अवस्था आणि निद्रिस्त अवस्था हे ठराविक काळ कामासाठी आणि विश्रांती साठी आवश्यक झाले आहेत.
जागृत अवस्थेत आपण आवश्यक कामासाठी फक्त वेळ दिला आणि अनावश्यक कामांना वेळ दिला नाही, त्या बद्दल विचार केला नाही तरी सुद्धा आपण मनाला वेसण घालू शकतो. जीवन प्रवाह चालू ठेवून त्या मधील अनावश्यक / अवांतर गोष्टींना थारा न देणे याला नैसर्गिक शून्य अवस्था म्हणता येईल.
Nothingness / शून्य अवस्था याचा अर्थ काहीच न करणे असा होत नसून आवश्यक तेव्हढे करणे आणि अनावश्यक ते टाळणे होय.
जागे असताना जागेपणा मधील देव, देश, धर्म, समाज, कुटुंब, नाते संबंध यांची सत्यता तपासा, फक्त श्रद्धेतून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या मधील असत्यता आपणास समजली तरच आपणास सत्य अवस्था समजू शकते. जागृत अवस्थेतील अशा सर्व गोष्टींचा असत्यपना लक्षात आला तरच मग फक्त जागे असण्याची जाणीव पुरेशी होईल.
शरीराचा मृत्यू होण्या पूर्वी मनाचा मृत्यू होणे आवश्यक असतो. मन म्हणजे अवांतर, अनावश्यक विचार आशा आकांशा होत.
No comments:
Post a Comment