आपल्या सभोवतालचे जग हे सत्य आहे की मिथ्या आहे याचा निर्णय करण्यात बहुतेक साधकांचा वेळ जात असतो. स्वप्नातल्या विश्वा प्रमाणे जागृती मधील विश्व सुद्धा मिथ्या आहे असे बहुतेक अध्यात्मिक छातीठोकपणे सांगत असतात. आणि आपल्या सभोवतालचे जग कसे मिथ्या आहेत त्याच्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत.
सर्व काही शिवशक्तिचा खेळ आहे असे सांगितले जाते. यामधील शिव म्हणजे ईश्वर आणि शक्ती म्हणजे विश्व होय. शक्तीचा विनाश होऊन ती अविनाशी ब्रह्ममध्ये विलीन होते या अर्थाने ते उदाहरण आहे. ब्रह्म हे अविनाशी तत्व आहे त्याचा विनाश होत नाही परंतु शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत ती सत्य आहे, जे आहे ते स्वप्नवत मिथ्या नाही.
आपल्या सभोवतालच्या परिसराला दृश्य असे संबोधले जाते आणि ते दृश्य अनुभवनारा मी दृष्टा असे संबोधले जाते. अनुभवाचे विश्लेषण केले असता त्यामधील मी हा केवळ भास आहे हे लक्षात येते याचा अर्थ ज्याला आपण दृष्टा समजत असतो तो केवळ भास आहे, तो मिथ्या आहे. भौतिक दृष्ट्या दृश्य सत्य आहे आणि द्रष्टा हा भास आहे. द्रष्टा हा भास आहे, तो मिथ्या आहे हे समजल्यानंतर दृष्टा नाहीसा होतो आणि द्रष्टा नाहीसा झाल्यामुळे दृश्य पाहणारा कोणीच नसल्यामुळे दृश्य असून ते अदृश्य होते. आपण घरामध्ये टीव्ही चालू केला आहे त्यावर प्रोग्राम चालू आहेत परंतु घरातील मंडळी इतर खोल्यांमध्ये आहेत टीव्हीसमोर कोणीही नाही याचा अर्थ टीव्ही हे दृश्य असत्य आहे असे होत नसून टीव्ही चे दृश्य सत्य आहे परंतु पाहणारे दृष्टे गायब आहेत.
ज्यावेळी द्रष्टा म्हणजे मी शिल्लक असतो त्यावेळी तो समोरील दृश्याचे चित्रीकरण करून ते चित्रीकरण मेंदूच्या स्मृतीमध्ये साठवितो आणि ते भूतकाळातील चित्रीकरण आपणास तो दाखवित असतो. हे मेंदूच्या स्मृती मधील भूतकाळातील चित्रीकरण म्हणजे दृश्य आहे असा भास निर्माण केला जातो. तो दृश्याचा भास असत्य आहे. एखादे दृश्य प्रत्यक्ष पाहणे आणि त्याच दृश्याचे व्हिडिओ शूटिंग पाहणे असा या दोन दृश्या मधील फरक आहे. म्हणजे दृश्य सत्य आहे पण त्याच्या व्हिडिओ शूटिंग मधील दृश्य मीथ्या आहे.
आपण पूर्वीचे ग्रंथ आणि गुरु यांना जर श्रध्देने अनुकरण करत असू तर त्यांची अशी ब्रह्मवाक्ये आपला नक्कीच गोंधळ उडवितात आणि आपणास सत्य समजत नाही. जगातील कोणताही ग्रंथ अथवा गुरु अथवा प्रेषित यांच्याकडे श्रद्धेने न पाहता त्यांच्या वाक्यातून आपल्याला सत्य समजते का याची शहानिशा करावी. त्यांच्या विचारातून आपल्या प्रश्नांची उकल होत नसेल तर आपणास मार्गदर्शन करण्यात ते व त्यांचे विचार निरर्थक ठरले आहेत आणि होय, अनुकरण केल्याने सत्य समजत नाही.
अंधानुकरण करण्या पासून पूर्णपणे स्वतंत्र झाल्याशिवाय आपणास सत्य दर्शन असंभव आहे.
Freedom from authority is absolutely necessary to find out if there is, or if there is not ultimate truth. - J Krishnamurti

No comments:
Post a Comment