Thursday, September 02, 2021

सत्याची ओळख

अध्यात्मिक साधक अशी कालातीत अध्यात्मिक अवस्था शोधीत असतात, ज्या अवस्थेत त्यांचा अहं आणि मी चा नाश होवू शकतो. परंतु हा एक असा चाणाक्षपणा आहे ज्यामुळे उलट शोध घेणाऱ्याचा मीपणा, अहं अधिक बळकट होत असतो.

जेव्हा साधक अशी श्रद्धा धरून चालतो की कालातीत, ईश्वर, सत्य, अमर अशी अवस्था असते त्यावेळी तो त्याचा मी पणा अधिक दृढ करीत असतो.

आपला मी हाच अशा अंध श्रद्धा युक्त कल्पना निर्माण करत असतो ज्या कल्पना मधून तो मीपणाचा नाश करण्याच्या वल्गना करीत असतो. कालातीत ब्रम्ह अवस्था ही अशीच कल्पना आहे ज्यामुळे आपला अहं दृढ होत असतो. अशा भ्रामक कल्पनांनी आपण आपल्या अहं चा नाश न करता त्याला ब्रम्ह हे वेगळे नाव, वेगळा आयाम मात्र दिला आहे. भौतिक किंवा अध्यात्मिक हे वेग वेगळे नसून ते मी पणाच्या वेगळ्या कृती आहेत. एकच अहं, एकच मी हा वेगवेगळ्या संकल्पना मांडून स्वतःला जिवंत ठेवीत असतो.

जेव्हा या संपूर्ण धूर्त, विलक्षण चाणाक्ष पणाच्या कृतीला प्रचारी सद्गुणांद्वारे, ऐकीव अनुभवाद्वारे, अंधश्रद्धाद्वारे कसे झाकतात हे पाहिले तर लक्षात येते की ते सर्व एका न संपणाऱ्या वर्तुळात फिरत आहेत. मन त्याच्या स्वतःच्या कुटील निर्मितीच्या पिंजऱ्यात अडकत असते. 

जेव्हा आपण हे पाहता तेव्हा काय होते?

जेव्हा काहीही नसताना या धर्मांध आणि तथाकथित अध्यात्मिक बुवाबाजी करणाऱ्यांनी त्याचा प्रचंड मोठा जो डोलारा उभा केला आहे तो पाहताना, तो धूर्तपणा जर लक्षात आला तर काय होईल?

जेव्हा एखाद्याला या सत्याची जाणीव होते, त्याबद्दल पूर्ण माहिती येते, तेव्हा तो विलक्षण शांत नाही का होणार? बळजबरीने नव्हे, कोणत्याही पुरस्काराद्वारे नाही, कोणत्याही भीतीद्वारे नाही, जेव्हा तुम्ही ओळखता की मनाची प्रत्येक हालचाल, प्रत्येक कल्पना ही फक्त त्याला बळकट करण्याचा एक प्रकार आहे, जेव्हा तुम्ही त्या स्थितीचे निरीक्षण करता, जेव्हा तुम्हाला त्याची पूर्ण जाणीव होते, जेव्हा तुम्ही त्या वैचारिक टप्प्यावर येता, मानसिक अनुभवांद्वारे नाही, परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्या स्थितीत असता, तेव्हा तुम्हाला दिसेल की, मन पूर्णपणे स्थिर झाले आहे आता त्याच्यात कुटीलता निर्माण करण्याची कुटिलता उरली नाही.

मन जे काही कुटिलता निर्माण करते ती कुटीलता तिच्या एका वर्तुळात फिरत असते, तिच्या स्वतःच्या क्षेत्रात. जेव्हा मन कुटिलता निर्माण करत नाही तेव्हा जी सहजता निर्माण होते, ती सहजता ओळखण्यायोग्य नसते. सहजपणा, वास्तव, सत्य ओळखले जाऊ शकत नाही. ती विचारांची प्रक्रिया नसते की ती विचारांनी ओळखली जावू शकते.

जीवनात सत्य येण्यासाठी श्रद्धा, ज्ञान, अध्यात्मिक अनुभव हे सर्व जाणे अत्यंत आवश्यक आहे.

सद्वर्तनी, सद्गुणांचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला सत्य सापडत नाही. तो एक अतिशय सभ्य व्यक्ती असू शकतो परंतु तो सत्य जाणणारा, सत्य समजणारा माणूस असण्यापेक्षा पूर्णपणे भिन्न असतो. एक सद्गुणी माणूस एक नीतिमान माणूस असू शकतो परंतु एक नीतिमान माणूस सत्य काय आहे हे समजू शकत नाही. कारण त्याच्यासाठी सद्गुण हे त्याच्या अहंचे आच्छादन आहे, अहंला तो बळकट करत असतो कारण तो वैचारिक, काल्पनिक सद्गुणांचा पाठपुरावा करत असतो. 

जेव्हा सद्गुणी म्हणतो, 'मी लोभाशिवाय असणे आवश्यक आहे,' अ-लोभाची स्थिती ज्याचा तो अनुभव घेतो ती केवळ एक मानसिक कल्पना असते आणि अशा अनेक मानसिक कल्पना ह्या अहं याला बळकट करत असतात.

म्हणून केवळ भौतिक संसाधनानीच नव्हे तर अंधश्रद्धा आणि ज्ञानामध्येही गरीब असणे खूप महत्त्वाचे आहे. ऐहिक श्रीमंती असलेला माणूस किंवा ज्ञान आणि अंधश्रद्धा यांनी समृद्ध असलेला माणूस अंधाराशिवाय दुसरे काहीही जाणणार नाही आणि तोच जगातील सर्व दुष्टपणा आणि दुःखांचे केंद्र असतो.

या उलट सत्याच्या माणसाला, सत्य हे त्याच्या जीवनातच अस्तित्वात आलेले असते.

परंतु जर तुम्ही आणि मी एक सामान्य व्यक्ती म्हणून मी पणाची संपूर्ण कुटिलता पाहू शकलो तरच सत्य काय आहे हे आपल्याला कळेल. आणि मी तुम्हाला खात्री देतो की हाच एकमेव बदल आहे जो जग बदलू शकेल. मी पण म्हणजे सत्य नव्हे, प्रेम नव्हे. 

अहंकार आणि मी पण हे कधीच सत्याला ओळखू शकत नाही. ते वर वर प्रेम करताना दिसेल परंतु अंतर्यामी ते कुटील असते. परंतु ज्याला सत्याचा स्पर्श होतो तो कुटील नसतो, तिथे मीपणा नसतो, अहंकार नसतो.

From the book The First and the Last Freedom, by J. Krishnamurti.


No comments: