Sunday, February 21, 2021

आधुनिक मनाला प्राचीन तत्वज्ञान का समजत नसावे

 


चैतन्य, जाणीव हे त्यातील घटकांचा समुदाय आहे. लहानपणा पासून आपण जी माहिती गोळा केलेली आहे, ज्या अनुभवातून आपण गेलो आहोत तेच आपले ज्ञान असते. हे ज्ञान सभोवतालच्या जगापासून आपल्या कडे आलेले असते. आपला मी म्हणजे या ज्ञानाचा प्रतिनिधी असतो. कृष्णमूर्ती याचे थोडक्यात असे वर्णन करतात की, मी म्हणजे जग आहे आणि जग म्हणजे मी आहे.

आपल्या आजच्या आधुनिक जगात नवीन माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध होत आहे. या नवीन माहितीच्या संकल्पना नवीन आहेत. नवीन माहिती आणि नव्या संकल्पना यांनी जग सतत बदलत असते. लहानपणापासून आपण जे अनुभव केले आहे त्याचा अर्थ लागणे सहज शक्य असते. पुरातन शास्त्रे श्रद्धेने पारायण करता येतील, संस्कृत श्लोक म्हटल्याने पुण्य पदरात पडल्याचे मनाचे समाधान होईल परंतु त्या गोष्टी आकलनात येणार नाही. जिज्ञासूंनी पुरातन तत्वज्ञानाचे अध्ययन कितीही केले तरी नवीन चेतन मनाला ते आकलन होत नाहीत.

सत्य हे Live जिवंत असते ते जुन्या संकल्पनेत बसत नाही. जाणून घेणार चेतन मन सुद्धा नवीन असते. श्रद्धे पोटी समजून सांगणारा तत्वज्ञ आपण हजारो वर्षापूर्वीचा निवडला किंवा तो आधुनिक नसेल तर किंवा तो जुने तत्वज्ञान जुन्याच संकल्पनेत विषद करीत असेल तर कदाचित पवित्र ऐकल्याचे समाधान मिळेल परंतु सत्य आकलन होईलच असे नाही. परंपरेने सत्याला धार्मिक श्रद्धेने गुंडाळले आहे त्यामुळे बहुसंख्य लोक त्या श्रद्धा आणि परंपरा यात गुंतून राहतात. सत्य त्यापेक्षा काही वेगळे असू शकेल याचा विचारसुद्धा पापभिरू मनाला शिवत नाही. याचा इतका अतिरेक होत असतो की, एखादा नवीन विचारवंत नवीन भाषेत सत्य सांगत असेल तर समाज त्याचाच छळ करतो. त्याच्या मृत्यू नंतर त्याचे तत्वज्ञान समाजाला कळू लागते. तेव्हढा वेळ जावा लागतो ते विचार जगाच्या विचारांचा भाग बनण्यासाठी. कालांतराने ते नवीन समाजाच्या प्रगत चेतन मनात प्रवेश करत असतात.

ज्याला सत्य समजते तो गुहेतून बाहेर येवून नवीन डरकाळी फोडतो. गौतम बुद्ध यांनी राजत्याग करून बोधवृक्षा खालून उठून दूरवर प्रचार केला, माऊली आळंदी सोडून भारतभर फिरत होती, कृष्णमूर्ति जन्मभूमी सोडून जगभर फिरत होते, विजय पांढरे साहेब whatsapp groups मधून तेच करीत आहेत.

समाज मनाला पटो अगर ना पटो ज्याला सत्य समजले आहे त्याचा वैश्विक बुद्धिमत्ता उपयोग करून घेत असावी जेणेकरून समाजमन त्याच्या नवीन भाषेतून सत्याला समजू शकेल.