Tuesday, August 18, 2020

जाणीव आणि नेणीव भगवंती नाही

प्रश्न: एखाद्या गोष्टीची जाणीव होते याचा अर्थ द्वंद्व अजून अस्तीत्वात आहे असा अर्थ निघतो का? म्हणजेच ज्याला सत्य कळते त्याला खरंतर त्याची जाणीव होत नाही असा अर्थ निघतो का? म्हणजेच ती व्यक्ति जाणीवांच्या पलीकडे गेली आहे असं समजायचं का ? 

जाणीव आणि नेणीव भगवंती नाही याचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे.

जाणीव आणि नेणीव या मनाच्या अवस्था आहेत. जागृत अवस्थेत विचारा मुळे अनुभव येतात आणि झोपे मध्ये विचारा अभावी अनुभव येत नाही. सर्व मानवाचे अनुभव असेच असतात. ज्ञानी माणसाचे सुद्धा असेच असते. या जाणीव आणि नेणीव अवस्थां पलीकडील अवस्था जर असेल तर ती अनुभवात येणे शक्य नाही, त्याबद्दल काही सांगता येणे शक्य नाही, अशा अवस्थेला भगवंती नाव दिले गेले.

द्वंद्व याचा अर्थ समजू या. दोन गोष्टी असणे म्हणजे द्वंद्व. कोणत्याही जाणिवेत म्हणजेच अनुभवा मध्ये दोन गोष्टी कल्पिल्या जातात. एक अनुभव आणि दुसरी अनुभव करणारा.

अनुभव आणि अनुभव करणारा हे दोघे वेगवेगळे नसून एकच आहे, तो जो एक आहे तो केवळ विचार आहे हे समजणे म्हणजे अद्वैत आहे.

हे ज्याला कळते त्याला सुद्धा अनुभव येतच असतात, जाणीव होतच असते. जाणिवांच्या पलीकडे जाणे म्हणजे त्या जाणिवांना, अनुभवांना यथार्थ जाणणे की ते फक्त विचार आहेत.

म्हणजे घटना घडत असते ती सत्य असते परंतु त्या घटनेची मीमांसा न करता स्वीकारणे. घटनेची मीमांसा म्हणजे विचार येणे होय, तेच जाणीव आणि अनुभव निर्माण करीत असतात.

No comments: