Friday, August 14, 2020

प्रेम आणि करुणा


प्रश्न : पालक आपल्या मुलाची काळजी घेतात. त्यांना चांगले  शिक्षण मिळावे म्हणून सुविधा  उपलब्ध  करून देतात. जे जे आवश्यक आहे त्याप्रमाणे मुलांची काळजी घेतात. पणअसे करताना ते आपल्या मुलांनी पुढे काय व्हावे, काय करावे, काय करू नये असे सांगण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आपले मत विचार आकांशा त्याच्यावर  लादतात. म्हणजे ते मुलावर खरे प्रेम करतात का? की मुलावर  अधिकार गाजवितात? मुलांवर अधिकार गाजवीत प्रेम करतो ते खरे प्रेम आहे काय? 

प्रत्येक सजीव हा एक स्वतंत्र जीव आहे आणि प्रत्येकाला आपले स्वातंत्र्य प्यारे असते. जर मला स्वातंत्र्य हवे आहे तर तसे स्वातंत्र्य माझ्या कुटुंबातील इतर सर्वांना हवे असते. मी जर कुटुंब प्रमुख म्हणून अधिकार गाजवीत असेन तर ते चुकीचे आहे. जर आपण आपल्या अधिकारातील इतरांना स्वातंत्र्य देत नसू तर त्याचा अर्थ आपण स्वतः अजून स्वतंत्र झालेलो नाही असा होवू शकतो. कुटुंबातील व्यक्तींमध्ये प्रेम असो वा नसो परंतु दुसऱ्या मानवी शरीरावर मालकी हक्क गाजविणे सर्वथैव अयोग्य आहे. मार्गदर्शन करणे वेगळे आणि मालकी हक्क गाजविणे वेगळे आहे. समाजाने आखून दिलेल्या कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची समज देणे हे कर्तव्य असते.

आपल्या मुलांना जे काही द्यायचे आहे ते जन्मतः आपण दिलेले असते. पूर्वीच्या पिढ्यांकडून जे आपणास प्राप्त झाले आहे ते आपण पुढच्या पिढीला देत असतो. आणि आपल्या वागण्याचा आदर्श पुढील पिढी उचलत असते जे अधिकार गाजवून शक्य होत नाही.


पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.... 

एखाद्या साम्राज्याचा सम्राट सुद्धा मनाचा गुलाम असतो हे जगज्जेत्या सिकंदर राजास भारतीय विचारवंतांनी पटवून दिले आणि तो माघारी परतला. संपूर्ण मानव जात ही मनाची गुलाम बनलेली आहे म्हणून ती इतरांना गुलाम करण्याच्या फंदात नेहमी असते. आपण मनाची गुलामी जेव्हा झुगारून देतो तेव्हा आपण खरे स्वतंत्र होतो बाकी सर्व बाह्य स्वातंत्र्य हे दिखावा मात्र आहे.

जबाबदारी, कर्तव्य आणि वासना यांचा ताळमेळ साधत मानवी मन प्रेम करण्याचा प्रयत्न करते परंतु ते प्रेम हे वैश्विक करुणेशी आपण तुलना करू शकत नाही. वैश्विक करुणेमध्ये विचार नसतात ते निव्वळ निखळ निर्वाज्य प्रेम असते.

No comments: