Tuesday, June 19, 2018

मुक्तावस्था



सर्व अध्यात्मिक गुरूंनी आपणास सांगीतले आहे कि परमेश्वर हा अव्यक्त, निर्गुण, निराकार असे ब्रम्ह आहे. ति एक अवस्था आहे व तिचा साकार विश्वाशी, साकार विश्वामधिल साकार जिवजंतु, प्राणि, वनस्पती यांच्याशी सुतराम संबंध नाहि. अव्यक्त, निर्गुण, निराकार ब्रम्हाचा कोणासहि, कोणत्याहि काळि कदापिहि अनुभव येऊ शकणार नाहि. म्हणजे ते आहे असेहि सांगता येऊ शकणार नाहि व ते नाहि असेहि सांगता येऊ शकणार नाहि. जर ते असेल असे मानले तरी ते साकार मुर्तीमध्ये तर नक्किच असु शकणार नाहि. व ते जर निर्गुण निराकार व अव्यक्त स्वरूपामध्ये राहु ईच्छित असेल तर ते आपल्या दैनंदिन जिवनामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या काहि प्रभाव पाडणार नाहि कारण जे निराकार आहे त्याच्या ध्यानीमनीहि (त्याला मन नसणार) साकार विश्व व त्यामधिल साकार सजीव व निर्जिव नसणार. त्यामुळे त्याचि भिती बाळगण्याचि आवश्यकता नाहि व त्याचि आराधना करण्याचिहि आवश्यकता नाहि.

निर्गुण निराकार अव्यक्त ब्रम्हाविषयी कसलीहि माहिती ऊपलब्ध होऊ शकत नाहि. ज्याचि आपणास कसलीहि माहिती नसते त्याचे ज्ञान होऊ शकत नाहि, त्याचे आपण वर्णन करू शकत नाहि. असे असताना ब्रम्ह हे सच्चिदानंदमय आहे, ते परमशांत, परमानंदमय, परमप्रेममय, परम चैतन्यमय आहे असे त्याचे वर्णन करणे रास्त नव्हे, चुकिचे आहे. हा केवळ बुध्दिमानांनी आपल्या बुध्दिचे वैभन दाखविण्यासाठि केलेला कल्पनाविष्कार आहे.

निर्गुण, निराकार ब्रम्हाचा कोणताहि अनुभव येऊ शकणार नाहि त्यामुळे त्याचि धारणा होऊ शकणार नाहि, त्याचे ध्यान करता येणार नाहि. ईतर सर्व साधना या सगुण, साकार विश्वामधिल लबाड मनुष्यांनी ऊदरभरणार्थ सुरू केल्या आहेत. निर्गुण निराकारास प्राप्त करण्याच्या कोणत्याहि साधना नाहित. आपण जे काहि करू ते सर्व भौतिक शरीर व मनाच्या माध्यमातुन करणार. शरीर व मन हे आपणास निराकाराच्या विश्वामध्ये घेऊन जाऊ शकत नाहित. जर साध्य निराकार असेल तर साकार साधना ऊपयोगाच्या नाहित.

मुळात निर्गुण निराकार अव्यक्त ब्रम्ह वगैरे काहिहि नाहिये. साध्यच नाहिसे झाले कि साधना आपोआप नाहिशा होतात. जोपर्यंत आपण काहितरी आहे असे गृहित धरतो तोपर्यंत आपण त्यासाठि काहिंना काहि करत रहातो. प्राप्त करण्यासारखे ब्रम्ह, ईश्वर, परमात्मा, आत्मा, आत्मसाक्षात्कार वगैरे काहिहि नाहिये हे लक्षात येताच आपली फार मोठ्या शोधापासुन मुक्तता होते, आपण शांत होतो, आपली भिती नाहिशी होते. आपण आपल्या नैसर्गिक अवस्थेमध्ये येतो. हव्यास, अपेक्षा, सततचा शोध यांच्या दुष्टचक्रामधुन आपली जेव्हा सुटका होते तोच मुक्तीचा क्षण असतो व त्यानंतरचि अवस्था हिच मुक्तावस्था असते.

यु जी कृष्णमुर्ती

No comments:

Post a Comment