Tuesday, September 07, 2021

What-is

 


कृष्णमूर्ती यांनी सत्य स्थिती आकलन होण्यासाठी  नेहमी What-is म्हणजे आत्ता जे काही चालले आहे त्या वर्तमानाच्या जाणिवेत सतत राहावयास सांगितले आहे. साधक ध्याना मध्ये सतत श्वास किंवा मंत्र याच्या जाणिवेत असतो तसे दिवसभर अवांतर विचार टाळण्यासाठी फक्त what is याच्या जाणिवेत राहावे. आपण जे काम करीत असतो केवळ त्या कामाची जाणीव ठेवणे हेच what-is ची जाणिव असणे होय.

आत्ताच्या क्षणाची जाणिव असणे हे सत्य अवस्थेचे आकलन होण्यात अत्यंत आवश्यक असते. हि जाणीव तेव्हाच शक्य होती जेव्हा आपण त्यावेळच्या घटनेवर टीका करणे, प्रतिक्रिया देणे, अनुकूलता अथवा प्रतिकुलता दाखविणे, तिला नाव गाव आदि ओळख देणे हे थांबवितो. हे सर्व अवांतर गोष्टी टाळल्या तर त्या सोबतचे विचार थांबतात आणि आपण फक्त निरपेक्ष जाणिवेत ( *choiceless awareness* ) राहू शकतो. 


अशा निरपेक्ष जाणिवेच्या अवस्थेत असणारा साधक हा मुक्ततेच्या मार्गावर असतो. परंतु इतर जे तथाकथित भोंदू गुरु शिष्य असतात त्यांना अशा निरपेक्ष जाणिवेची कल्पनाच असू शकतं नाही. ते जे असतात ते लपवून ते जे नाहीत त्याचा दिखावा करीत राहतात. आणि ते त्याच धुंदीत सदैव असतात. इतरांवर टीका टिप्पणी करणे, प्रतिक्रिया देणे, पाठांतर केलेल्या पारंपरिक गोष्टी सतत उगळणे हा त्यांचा स्वभाव बनतो. 


ज्यांना सत्याचे आकलन करावयाचे आहे त्यांनी What-is म्हणजे नेमके काय आणि त्याच्या जाणिवेत कसे राहायचे हे माहिती करून घेणे म्हणून अत्यावश्यक होते. ' जे काय आहे ते' याची जाणीव ठेवण्यासाठी आणि त्याचे पालन करण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता आणि करुणामय हृदयाची आवश्यकता आहे. जे काय वर्तमानात होत असते ते हे नेहमी बदलत असते ते सतत परिवर्तनशील असते. ज्यांचे मन पारंपरिक श्रद्धा आणि परंपरा यांच्यामध्ये ठाण मांडी घालून बसलेले असते ती मने जे सतत हालचाल करीत असते, सतत बदलत असते त्याचा पाठलाग करीतच नाही. जे काही सत्य आहे ते कधीच स्थिर असू शकत नाही ते सतत बदलत असते. सतत परिवर्तनीय असलेल्या वर्तमानात राहण्यासाठी मन तितकेच ताजे असावे लागते. ज्यांची मने हजारो वर्षांच्या जुनाट ज्ञानाच्या चिखलात रुतलेली आहेत ते वर्तमानातील सत्याचा माग काढू शकत नाहीत. सत्य भूतकाळात नसते ते सतत वर्तमानात असते, त्यासाठी ते सतत परिवर्तनशील असते. अशा गतिमान सत्याचे आकलन करण्यासाठी आपले मन सुद्धा तितकेच गतिशिल असायला हवे, ते सतत वर्तमानात असावे. पूर्वीचे कितीही महान साधू संत विचारवंत होवून गेलेले असोत त्यांच्या वरील श्रद्धा, भक्ती मधून सत्य आकलन होवू शकत नाही किंवा त्यांनी लिहिलेल्या प्रचंड मोठ्या ग्रंथांचे वाचन केल्याने, पारायण केल्याने सत्याचे आकलन शक्य नाही. पूर्वीच्या परंपरांच्या चिखलात रुतलेले आजचे तथाकथित ज्ञानी हे समाजाचे अतोनात नुकसान करीत आहेत. ते स्वतः ज्या चिखलात रुतले आहेत तिथून ते बाहेर येवू शकत नाही मग इतरांना त्या चिखलात आणून सगळेच तो चिखल तुडवीत सर्व मानव जातीचे भविष्य वाया घालवीत आहेत.


जे कृष्णमुर्ती, Introduction, First and Last Freedom




Saturday, September 04, 2021

सत्य आकलन कसे होते?


 सत्य आपणास दुसरा कोणी देवू शकत नसतो. ते तुमचे तुम्हीच ओळखायचे असते फक्त ते ओळखण्यासाठी आपल्या मनाची अशी अवस्था असायला हवी की त्याच्यात ते आकलन करण्याची पात्रता असावी. ज्यावेळी मनात विरोध असतो, पूर्वग्रह असतात त्यावेळी मन आकलन करण्यास पात्र नसते. 

आपण आत्ता जे काही करीत असतो तिकडे आपण लक्ष न देता भलत्याच गोष्टींचा सतत विचार करीत असतो. आत्ता जे काही होत आहे त्याची जाणीव असली तर ते समजणे शक्य होते. जे काही होत आहे ते आहे तसे समजून तेव्हाच घेतले जाते जर आपण त्यास विरोध करीत नसू किंवा त्याचे समर्थन करीत नसू किंवा त्यावर टीका करीत नसू किंवा त्याचा गैरअर्थ काढीत नसू. अशी ज्यावेळी मनाची अवस्था होते तेव्हा ते मन विवेकी बनते. जेव्हा आपण त्याचा गैरार्थ काढू, टीका टिप्पणी करू, विरोध करतो तेव्हा त्या वास्तवाचे सत्य समजणे शक्य होत नाही. 


एखादे संशोधन करताना शास्त्रज्ञ ते जे काही आहे त्याचे फक्त अवलोकन करीत असतात. ते कसे असावे किंवा कसे नसावे असा ते अंदाज लावीत बसत नाहीत तसेच आपले आकलन असावे. जर आपण सर्वजण बघताना, ऐकताना, अवलोकन करताना अशी काळजी घेवू की जे जसे आहे ते तसेच त्याच्या फक्त जाणिवेत राहिलो तर सर्व प्रश्न सहज सुटू शकतात. सर्व संघर्ष समाप्त होवू शकतील. जर मी लबाड असेन आणि ते मी कबूल करीत असेन तर सर्व प्रश्न तिथेच निकालात निघतील. आपण जसे आहोत तशी त्याचे प्रत्येकानी कबुली देणे हाच विवेकाचा जन्म असतो, वास्तव परिस्थीती समजण्याची ती सुरुवात असते, त्यातूनच आपली काळाच्या बंधनातून मुक्तता शक्य होणार असते. 


आपण आता यापुढील संवाद मध्ये आपण तेच करणार आहोत. आत्ता जे काही आहे ते तसेच मी आपल्या निदर्शनात आणून देत जाईन, त्याचे माझ्या पूर्वग्रह अनुसार मी अर्थ लावणार नाही, आपण सुद्धा आपल्या पूर्वज्ञाना नुसार ते जे आहे त्याचा अर्थ लावीत बसू नये.


J Krishnamurti,

Introduction,

फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम




Friday, September 03, 2021

सुसंवाद


दोन व्यक्ती एकमेकांस जरी ओळखत असल्या तरी त्यांच्यात सुसंवाद असतोच असे नाही. एकमेकांना सांभाळून घेताना सुसंवाद आवश्यक आहे. सुसंवाद तेव्हाच शक्य होतो जेव्हा सर्वजण एकाच वेळी एकाच पातळीवर असतात, एकमेकांविषयी आपुलकी असते. 


मी धार्मिक, अध्यात्मिक, मानसशास्त्र अथवा वैज्ञानिक वाचन करीत नाही त्यामुळे मी त्यातील अवघड संकल्पना मांडीत बसत नाही. साध्या सोप्या शब्दात आपण संवाद केला तर समजणे सहज होते. 


परंतु जर आपण ते लक्षपूर्वक ऐकले नाही तर ते सुद्धा समजणे अवघड होवू शकते. ऐकणे ही सुद्धा एक कला आहे. ऐकताना आपण आपले सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवायला हवेत. संपूर्ण लक्ष दिले तर ऐकणे सुलभ होते. परंतु ऐकताना जर आतून विरोध असेल, भीती असेल, आसक्ती असेल तर ते ऐकले जात नाही. किंवा आपणास आपल्या दैनंदिन जीवनात काही त्रास होत असेल तरी सुद्धा ऐकण्यावर लक्ष लागू शकत नाही. म्हणजे आपण जे ऐकत असतो ते आपलेच ऐकत असतो, समोरचे जे सांगणे असते ते आपल्या आतमध्ये उतरत नाही. त्यामुळे एकमेकांचे ऐकणे हे अतिशय अवघड होवून गेले आहे आणि ती आपल्या सर्वांची समस्या बनली आहे.


कदाचित माझ्या सांगण्यात येणारे जे काही असेल ते आपणास रुचत नसेल, आपल्या श्रद्धाच्या ते विरुद्ध असेल, आपला त्यास विरोध असेल, मी चुकीचे सांगत असेन किंवा आपण चुकीचे ग्रह बनविले असतील तरी सुद्धा कृपया ते लक्षपूर्वक ऐका. कारण आपण लक्षपूर्वक ऐकले आणि त्यावर चिंतन केले तर त्यामधून आपणास सत्य म्हणजे काय असते याचे कदाचित आकलन होवू शकते. 


J Krishnamurti, First and last freedom, Introduction


Thursday, September 02, 2021

सत्याची ओळख

अध्यात्मिक साधक अशी कालातीत अध्यात्मिक अवस्था शोधीत असतात, ज्या अवस्थेत त्यांचा अहं आणि मी चा नाश होवू शकतो. परंतु हा एक असा चाणाक्षपणा आहे ज्यामुळे उलट शोध घेणाऱ्याचा मीपणा, अहं अधिक बळकट होत असतो.

जेव्हा साधक अशी श्रद्धा धरून चालतो की कालातीत, ईश्वर, सत्य, अमर अशी अवस्था असते त्यावेळी तो त्याचा मी पणा अधिक दृढ करीत असतो.

आपला मी हाच अशा अंध श्रद्धा युक्त कल्पना निर्माण करत असतो ज्या कल्पना मधून तो मीपणाचा नाश करण्याच्या वल्गना करीत असतो. कालातीत ब्रम्ह अवस्था ही अशीच कल्पना आहे ज्यामुळे आपला अहं दृढ होत असतो. अशा भ्रामक कल्पनांनी आपण आपल्या अहं चा नाश न करता त्याला ब्रम्ह हे वेगळे नाव, वेगळा आयाम मात्र दिला आहे. भौतिक किंवा अध्यात्मिक हे वेग वेगळे नसून ते मी पणाच्या वेगळ्या कृती आहेत. एकच अहं, एकच मी हा वेगवेगळ्या संकल्पना मांडून स्वतःला जिवंत ठेवीत असतो.

जेव्हा या संपूर्ण धूर्त, विलक्षण चाणाक्ष पणाच्या कृतीला प्रचारी सद्गुणांद्वारे, ऐकीव अनुभवाद्वारे, अंधश्रद्धाद्वारे कसे झाकतात हे पाहिले तर लक्षात येते की ते सर्व एका न संपणाऱ्या वर्तुळात फिरत आहेत. मन त्याच्या स्वतःच्या कुटील निर्मितीच्या पिंजऱ्यात अडकत असते. 

जेव्हा आपण हे पाहता तेव्हा काय होते?

जेव्हा काहीही नसताना या धर्मांध आणि तथाकथित अध्यात्मिक बुवाबाजी करणाऱ्यांनी त्याचा प्रचंड मोठा जो डोलारा उभा केला आहे तो पाहताना, तो धूर्तपणा जर लक्षात आला तर काय होईल?

जेव्हा एखाद्याला या सत्याची जाणीव होते, त्याबद्दल पूर्ण माहिती येते, तेव्हा तो विलक्षण शांत नाही का होणार? बळजबरीने नव्हे, कोणत्याही पुरस्काराद्वारे नाही, कोणत्याही भीतीद्वारे नाही, जेव्हा तुम्ही ओळखता की मनाची प्रत्येक हालचाल, प्रत्येक कल्पना ही फक्त त्याला बळकट करण्याचा एक प्रकार आहे, जेव्हा तुम्ही त्या स्थितीचे निरीक्षण करता, जेव्हा तुम्हाला त्याची पूर्ण जाणीव होते, जेव्हा तुम्ही त्या वैचारिक टप्प्यावर येता, मानसिक अनुभवांद्वारे नाही, परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्या स्थितीत असता, तेव्हा तुम्हाला दिसेल की, मन पूर्णपणे स्थिर झाले आहे आता त्याच्यात कुटीलता निर्माण करण्याची कुटिलता उरली नाही.

मन जे काही कुटिलता निर्माण करते ती कुटीलता तिच्या एका वर्तुळात फिरत असते, तिच्या स्वतःच्या क्षेत्रात. जेव्हा मन कुटिलता निर्माण करत नाही तेव्हा जी सहजता निर्माण होते, ती सहजता ओळखण्यायोग्य नसते. सहजपणा, वास्तव, सत्य ओळखले जाऊ शकत नाही. ती विचारांची प्रक्रिया नसते की ती विचारांनी ओळखली जावू शकते.

जीवनात सत्य येण्यासाठी श्रद्धा, ज्ञान, अध्यात्मिक अनुभव हे सर्व जाणे अत्यंत आवश्यक आहे.

सद्वर्तनी, सद्गुणांचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला सत्य सापडत नाही. तो एक अतिशय सभ्य व्यक्ती असू शकतो परंतु तो सत्य जाणणारा, सत्य समजणारा माणूस असण्यापेक्षा पूर्णपणे भिन्न असतो. एक सद्गुणी माणूस एक नीतिमान माणूस असू शकतो परंतु एक नीतिमान माणूस सत्य काय आहे हे समजू शकत नाही. कारण त्याच्यासाठी सद्गुण हे त्याच्या अहंचे आच्छादन आहे, अहंला तो बळकट करत असतो कारण तो वैचारिक, काल्पनिक सद्गुणांचा पाठपुरावा करत असतो. 

जेव्हा सद्गुणी म्हणतो, 'मी लोभाशिवाय असणे आवश्यक आहे,' अ-लोभाची स्थिती ज्याचा तो अनुभव घेतो ती केवळ एक मानसिक कल्पना असते आणि अशा अनेक मानसिक कल्पना ह्या अहं याला बळकट करत असतात.

म्हणून केवळ भौतिक संसाधनानीच नव्हे तर अंधश्रद्धा आणि ज्ञानामध्येही गरीब असणे खूप महत्त्वाचे आहे. ऐहिक श्रीमंती असलेला माणूस किंवा ज्ञान आणि अंधश्रद्धा यांनी समृद्ध असलेला माणूस अंधाराशिवाय दुसरे काहीही जाणणार नाही आणि तोच जगातील सर्व दुष्टपणा आणि दुःखांचे केंद्र असतो.

या उलट सत्याच्या माणसाला, सत्य हे त्याच्या जीवनातच अस्तित्वात आलेले असते.

परंतु जर तुम्ही आणि मी एक सामान्य व्यक्ती म्हणून मी पणाची संपूर्ण कुटिलता पाहू शकलो तरच सत्य काय आहे हे आपल्याला कळेल. आणि मी तुम्हाला खात्री देतो की हाच एकमेव बदल आहे जो जग बदलू शकेल. मी पण म्हणजे सत्य नव्हे, प्रेम नव्हे. 

अहंकार आणि मी पण हे कधीच सत्याला ओळखू शकत नाही. ते वर वर प्रेम करताना दिसेल परंतु अंतर्यामी ते कुटील असते. परंतु ज्याला सत्याचा स्पर्श होतो तो कुटील नसतो, तिथे मीपणा नसतो, अहंकार नसतो.

From the book The First and the Last Freedom, by J. Krishnamurti.


मानवी आहार आणि पृथ्वी

आपल्या आहारा मधील बदलाने आपण पृथ्वी ग्रह वाचविण्यात मदत करू शकतो !!! 

अन्न हे जीवनासाठी मूलभूत आहे.

आपण खात असलेल्या गोष्टी मानव जातीच्या अस्तित्वासाठी सर्वात मोठ्या धोक्यांना उत्तेजन देत आहेत. उपलब्ध पुराव्यांमुळे असे दिसून आले आहे की मानवाच्या औद्योगिक अन्न उत्पादन प्रणाली या प्रदूषणाचे स्त्रोत आहेत, हवामान बदलाला योगदान देणारे आणि जैवविविधता नष्ट होण्याचे कारण आहेत. पृथ्वी वरील अन्न साखळी नष्ट झाली तर मानव नामशेष होवू शकतो.


आपण ते बदलण्यास मदत करू शकता. आपल्या आहार मुळे होणारा पर्यावरणीय त्रास कमी करण्यासाठी आपण खालील काही गोष्टी आज करू शकता.

1. अन्न हे आता उत्पादन राहिले नाही ती एक फार मोठी व्यापारी प्रक्रिया बनली आहे

लोक बऱ्याचदा किराणा दुकानाच्या शेल्फवर अन्न पाहतात आणि ते तिथे कसे पोहोचले याबद्दल जास्त विचार करत नाहीत. परंतु शेत आणि आपले जेवणाचे ताट या दरम्यान, अन्नावर प्रक्रिया, पॅकेज, वाहतूक, विपणन आणि विक्री करणे आवश्यक आहे. त्यापैकी बरेच टप्पे ग्रहासाठी हानिकारक असू शकतात. जेव्हा आपण या संपूर्ण अन्नपद्धतीचा विचार करता, तेव्हा आपण जे खातो त्याची निवड करण्यासाठी आपण  अधिक चांगल्या स्थितीत असता.

2. शाश्वत शेतीला समर्थन द्या

आपले अन्न अशा उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करा जे टिकाऊ उत्पादनांमध्ये तज्ञ आहेत.

शाश्वत शेती 56 टक्क्यांपर्यंत कमी ऊर्जा वापरते, ६४ टक्के कमी हरितगृह वायू उत्सर्जन निर्माण करते आणि पारंपारिक शेतीपेक्षा जैवविविधतेच्या अधिक पातळीला परवानगी देते. टिकाऊपणे उत्पादित केलेली उत्पादने अधिक श्रम केंद्रित असतात, ते 30 टक्के अधिक रोजगार निर्माण करू शकतात, शेतकरी जास्त नफा कमावू शकतात आणि जास्त उत्पन्न मिळवू शकतात.

3. आपण काय खात आहात ते जाणून घ्या


कीटकनाशके, तणनाशके आणि अँटीमाइक्रोबियल औषधे बहुतेक वेळा पीक आणि पशुधन उत्पादन वाढवण्यासाठी वापरली जातात परंतु मानवी आरोग्यावर त्यांचा हानिकारक परिणाम होऊ शकतो. 


लेबल वाचा, प्रश्न विचारा आणि अन्न कुठून येते आणि ते कसे तयार केले जाते याबद्दल आपले संशोधन करा.  जेव्हा शक्य असेल तेव्हा रासायनिक शेती केलेले आणि खूप प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांपेक्षा शाश्वत-शेती केलेले संपूर्ण अन्न निवडा. पार्सल फूड खरेदी करण्याऐवजी घरी जेवण तयार करा.


4. स्वतःची बाग लावा


स्वतःचे शेती उत्पादन वाढवल्याने इतरांनी बनविलेले रासायनिक अन्न दूर होते. कीटकनाशके, पॅकेजिंग, संरक्षन, वाहतुकीसाठी इंधन आणि कोल्ड चेन स्टोरेज यावरील खर्च वाचविता येतो. फळे, भाज्या आणि औषधी वनस्पती त्यांच्या सर्वात नैसर्गिक स्वरूपात त्या सर्वात जास्त पौष्टिक असतात. ते अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्त्वे अधिक आहेत आणि तेही तुलनेने कमी खर्चात.


सामुदायिक शेती करण्यासाठी शेजारी आणि मित्रांना गुंतवा. आपल्या घराच्या आसपास, आपल्या बाल्कनीवर किंवा खिडकीवर फळे आणि भाज्या वाढवा.


5. स्थानिक अन्न निवडा


लहान व्यवसाय आणि शेतांना आधार देण्याव्यतिरिक्त, स्थानिक पातळीवर उत्पादित अन्न खरेदी केल्याने वाहतूक आणि कोल्ड चेन स्टोरेजशी संबंधित जीवाश्म इंधन उत्सर्जन कमी होते. वाटेत अन्न नुकसान होण्याची शक्यता देखील कमी करते.


स्थानिक उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांशी नातेसंबंध निर्माण केल्याने आपले अन्न कसे तयार होते हे समजून घेता येते. आपण सुसंवाद करून, विचारांची देवाणघेवाण करून एकमेकांस पूरक अन्न साखळी निर्माण करू शकतो.


6. वनस्पती आहार स्वीकारा


अलिकडच्या वर्षांत प्राण्यांच्या अन्नाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या, जगातील सुमारे 60 टक्के शेतजमीन हि पशुधन चराईसाठी वापरली जाते आणि लोक निरोगी राहण्यापेक्षा चवीसाठी पशूयुक्त अन्न जास्त वापरतात.


वनस्पती-समृध्द आहार स्वीकारल्यास कमी जमिनीचा वापर होईल, कमी विषारी वायू तयार होईल, कमी पाण्याची आवश्यकता असेल आणि प्राण्यांचे जीवनमान सुधारेल. 2050 मध्ये वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येला 9 अब्ज लोकांपर्यंत पोहोचवण्या बरोबरच ते अधिक शेत जमीन उपलब्ध करेल. वनस्पती-समृध्द आहाराकडे वाटचाल केल्याने हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोग यासारख्या जुनाट आजार कमी होण्यास मदत होऊ शकते. उपचाराचा संबंधित खर्च आणि गमावलेले उत्पन्न दोन्हींची भरपाई होवू शकते.


7. आपल्या आहारात विविधता आणा


आपला आहार हा अधिक प्रमाणात एकसंध आणि विषमतेने अशा अन्नावर आधारित असतात जे उर्जा समृद्ध असतात, परंतु सूक्ष्म पोषक घटकांमध्ये ते गरीब असतात. गेल्या 100 वर्षांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक पीक जाती गायब झाल्या आहेत.  आज, एकूण नऊ वनस्पती प्रजाती एकूण पीक उत्पादनाच्या 66 टक्के आहेत. तीनपैकी जवळजवळ एक व्यक्ती कुपोषणाच्या कोणत्या ना कोणत्या प्रकाराने ग्रस्त आहे, अनेक देशांना एकाच वेळी कुपोषण आणि जास्त वजन किंवा लठ्ठपणा या दोन्ही आव्हानांचा सामना करावा लागतो.


ईएटी-लॅन्सेट कमिशन रिपोर्ट नुसार, वनस्पती-आधारित खाद्यपदार्थांच्या विविधतेसह निरोगी आहाराकडे वाटचाल करणे, आणि अतिप्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांपासून दूर, साखर युक्त अन्न टाळले तर सर्व प्रौढांचे मृत्यू एक चतुर्थांशपर्यंत रोखता येतो.


8. अन्न टाकणे कमी करावे


उत्पादित केलेल्या अन्नापैकी एक तृतीयांश अन्न वाया जाते. हे केवळ दुकाने किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा केवळ श्रीमंत घरांमध्ये होत नाही. ही एक जागतिक समस्या आहे जी सर्व उत्पन्नाच्या घरात होत असते. 


अन्न वाया घालविणे कमी करण्यासाठी, अगोदर योजना करा आणि आपल्याला माहित असलेले अन्न खरेदी करा.  आपण खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांच्या प्रत्येक खाद्य भागाचा लाभ घ्या.


शिजवण्यापूर्वी तांदूळ आणि इतर मुख्य वस्तूंचे मोजमाप करा, अन्न योग्यरित्या साठवा (शक्य असल्यास फ्रीजर वापरा), उरलेल्या अन्नाचे नियोजन करा. आपल्या मित्रांसह आणि शेजाऱ्यांसह अतिरिक्त गोष्टी सामायिक करा आणि स्थानिक अन्न-वाटणी योजनेत योगदान द्या.  शेवटी अखाद्य अवशेषांपासून कंपोस्ट खत बनवा आणि आपल्या बागेला सुपिकता देण्यासाठी ते वापरा.


9. अनावश्यक पॅकेजिंग टाळा


दरवर्षी सुमारे 5 ट्रिलियन एकदाच-वापर केलेले प्लास्टिक पिशव्या जमीन आणि समुद्र प्रदूषित करतात.


जेव्हा शक्य असेल तेव्हा, पॅक न केलेले, टिकाऊ किंवा कमीत कमी पॅक केलेले खाद्यपदार्थ निवडा. अन्न खरेदीसाठी बास्केट वापरा, पुन्हा वापरण्यायोग्य किंवा कापडी पिशव्या सोबत ठेवा आणि काचेच्या भांड्यात अन्न साठवा किंवा मधमाशीचे मेण किंवा इतर टिकाऊ सामग्रीमध्ये लपेटून ठेवा.


10. आपला आवाज बुलंद करा


आता अस्तित्वात असलेल्या व्यापारी, विकृत अन्न व्यवस्थेला सबसिडी देण्यासाठी, त्यांना बाजारात खपविण्यासाठी, चांगल्या बदलाला अडथळा आणण्यासाठी आणि मानवी आणि पर्यावरणीय आरोग्याला हानी पोहोचवण्यासाठी जगभरातील सरकारी यंत्रणा दर मिनिटाला 1 दशलक्ष डॉलर्स खर्च करते.


शासकीय आणि धोरणकर्त्यांना शाश्वत शेतीकडे संक्रमण करण्यासाठी आणि त्यांच्या हवामान बदलाच्या कृती योजनांमध्ये अन्न नुकसान आणि कचरा कमी करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन करा. उत्पादक, किरकोळ विक्रेते आणि कृषीसेवां पुरविणारी यंत्रणा या सर्वांना अन्न आणि त्यांच्या पोषण मूल्यांबाबत पारदर्शकता आणण्याचे आवाहन करा.


आपल्या स्वतःच्या सामाजिक संस्थामध्ये प्रचारक व्हा.  माहिती, पाककृती, कल्पना आणि प्रेरणा सामायिक करण्यासाठी आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरा.  आपले नेटवर्क तयार करा, योजना सुरू करा, आपला आवाज वाढवा.


(सरकारी यंत्रणा, खाजगी व्यापारी संस्था, राजकारणी यांनी आता पर्यंत पृथ्वीचे अमाप नुकसान केले आहे, पुढेही ते करत राहतील. त्यांच्या कडून बदलाची अपेक्षा ठेवू नका. आपण बदलू चला, जग आपोआप बदलेल. शिवाजी, गांधी एकटेच होते परंतु त्यांनी इतिहास घडविला आहे.)

Wednesday, August 18, 2021

श्रद्धा आणि त्यांची हुकूमशाही

 


आपण आपल्या घरातील तसेच समाजातील वडीलधारी मंडळींचा आदर, मान सन्मान ठेवत असतो. आपण कुटुंब प्रमुख किंवा समाजातील नेत्यांचा आदर करीत असतो, प्रसंगी त्यांचे आदेश मानत असतो. समाजाचे संरक्षण करणारे नियम आणि त्या नियमांच्या अमलबजावणीसाठी असणाऱ्या यंत्रणेचा सुद्धा आपण आदर करीत असतो. शाळा कॉलेज मधील शिक्षक आपले आदरणीय असतात. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपण वरिष्ठ आणि ग्राहक यांचा आदर ठेवीत असतो. 

आपण सर्वजण भौतिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या एकमेकांवर अवलंबून असतो. तसेच कुटुंब किंवा समाजात राहताना एकमेकांचा आदर राखला तर सौहार्द पूर्वक राहता येते. हे आपल्या सर्वांच्या गरजेचे असते त्यामुळे आपण एकमेकांचा आदर करीत असतो. शेजारी एखादा उगाच दादागिरी करू लागला तर आपण ते सहन करीत नाही. तसेच लोकशाही देशात हुकूमशहा टिकत नाहीत त्यांना जावेच लागते. कितीही मोठा अधिकारी असला आणि जर तो आपल्या हितसंबंधांच्या विरुद्ध जात असेल तर आपण त्याला नाकारतो.

लहान मुले मोठ्यांचा संसार पहात त्याचे भातुकलीच्या खेळात ते रूपांतरण करीत असतात. अगदी तसेच भौतिक जगातील जे काही वास्तव असते त्याचे आपले मन त्याच्या मानसिक जगात, मानसिक कल्पनांच्या रुपात रूपांतरण करीत असते. मनाने देव, देश, धर्म आणि त्यांचे गुरू यांच्या मानसिक कल्पना बनविल्या आहेत. ते मानसिक आहेत कारण प्रत्यक्षात आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्या असण्या नसण्याचा काही फरक पडत नसतो. मनाने त्यांची मानसिक भीती तयार केली आणि त्यावर मानसिक उपचार करण्यासाठी, मानसिक सुरक्षेसाठी गुरूंचा अधिकार निर्माण केला. प्रत्यक्षात कसलाच कशाला आधार नसताना मन अधिकाधिक मानसिक कल्पना तयार करीत राहते आणि मग स्वतःला त्यांचा त्रास होवू नये म्हणून मग मानसिक आधार शोधते. आपल्या पेक्षा हुशार व्यक्तींचा ते गुरु म्हणून अधिकार मान्य करते आणि त्यांच्या पूर्ण आहारी जाते. अनेकदा आपल्या भौतिक गरजा आणि जबाबदाऱ्या टाळून गुरु आणि त्यांच्या आश्रमात अहोरात्र राबत राहतात.  धार्मिक किंवा अध्यात्मिक गुरू हे त्या अर्थाने हुकूमशहा असतात. समाजाच्या नियमापेक्षा त्यांना वैयक्तिक जे हवे असते तेच नियम ते इतरांवर लादतात आणि त्यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करतात. त्यांचे ईश्वरी शक्तीशी संबंध आहेत असे ते थापा मारीत असतात आणि आपण ते खुशाल मान्य करीत असतो. राजकारणात एखादा नेता थापा मारत असला तर ते आपणास कळते कारण त्याच्यावर सतत माध्यमांची नजर असते. परंतु श्रद्धेच्या आणि परंपरेच्या आड धर्मात आणि आश्रमात सहसा इतर डोकावत नाहीत. आणि त्यांच्या वरील अंधश्रद्धा मुळे आपणास त्यांचे खरे सत्य समजत नाही.

कुटुंबात आणि समाजात आपणास  स्वातंत्र्य हवे असते परंतु श्रद्धेच्या ठिकाणी आपण आपली अक्कल गहाण टाकतो आणि आपले स्वातंत्र्य आपण त्यांच्या हवाली करतो. पाच दहा टक्के लोक अनुभव घेवून त्यांच्या पासून लांब राहतात परंतु त्यांना नित्य नवे बकरे मिळत राहतात. दहा जुने बकरे सोडून गेले तरी शेकडो नवीन बकऱ्यांची waiting list तयार असते. 

ज्या समाजात धर्म आणि धर्मगुरू यांचे प्राबल्य जास्त आहे तो समाज आपली अधिक चांगली भौतिक प्रगती करू शकत नाही. धर्माच्या नावाखाली भारत पाकिस्तान वेगळे झाले. पाकिस्तान तेव्हाच मुस्लिम राष्ट्र झाले, कालांतराने का होईना भारताचे सुद्धा हिंदू राष्ट्र होत आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान येत आहे. 

हे सर्व घडत आहेत केवळ आणि केवळ मानसिक कल्पनांमुळे. अत्याधुनिक मानव प्राणी सुद्धा अजूनही त्याच्या मानसिक विश्वात जगत आहे. देव, देश, धर्म यांच्या सारख्या मानसिक संकल्पना जो पर्यंत समाजात विद्यमान आहेत तो पर्यंत समाजाला सत्य समजणार नाही. सत्य साक्षात्कार अभावी समाज सुजाण होवू शकत नाही आणि तोपर्यंत त्या समाजाचा घटक असलेल्या प्रत्येक मानव प्राण्यास दुःखात जीवन कंठीत राहावे लागणार. 

Why is it that we accept authority? In a democratic world, politically we shun any dictator. But religiously they are all dictators. Why do we accept it? Why do we accept the priest as an intermediary to something which he says he knows? So we stop reasoning. Politically we reason; we see how important it is to be free – free speech, everything free, as much as possible – but we never think freedom is necessary here. Spiritually we don’t feel the necessity of freedom, and therefore we accept any Tom, Dick or Harry, which is horrifying.

J Krishnamurti in Dialogue with Allan W. Anderson in San Diego, 27 February 1974

Thursday, July 29, 2021

योग्य जीवनशैली


आपल्या जीवनात निसर्ग निर्मित गोष्टी असतात, मानव निर्मित जीवनावश्यक गोष्टी असतात. तशाच मानव निर्मित अनावश्यक संकल्पना सुद्धा असतात. जीवनावश्यक तेव्हढे ठेवून अनावश्यक असेल ते काढून जगणे म्हणजे विवेकी जगणे असते आणि तेच योग्य जगणे असते. - कृष्णमूर्ति

जे कृष्णमूर्ती यांची ही सर्वात महत्त्वाची चर्चा आहे.  एखाद्याला हे समजल्यास, त्याला सत्य नक्कीच समजेल.

प्रश्नः रोजीरोटी मिळविण्या मागील योग्य हेतू काय आहे?  योग्य जगणे म्हणजे काय असावे?

कृष्णमूर्ती: जीवन जगण्याचा योग्य हेतू काय असावा असा प्रश्न आहे काय?  

हेतू सोपा, फायदेशीर किंवा आनंददायक किंवा लाभदायक असावा असे नाही, परंतु योग्य जीवनशैली म्हणजे काय? आणि तो हेतू बरोबर असेल हे आपण कसे सांगू शकाल?

बरोबर म्हणजे नेमके काय आहे? ती पुन्हा एक अतिशय जटिल गोष्ट आहे.

 'बरोबर' या शब्दाचा अर्थ अचूक असा आहे.* आपण स्वार्थासाठी किंवा मौजमजेसाठी काहीतरी केले तर ते अचूक असू शकत नाही - बरोबर?  योग्य जीवनशैली काय आहे हे समजण्यासाठी आपण प्रथम वास्तविकता म्हणजे काय ते पाहिलेच पाहिजे.

मानवी विचारांनी जे काही निर्मिले आहे ते सर्व वास्तव आहे. हा तंबू उभारण्यासाठी विचार करावा लागला आहे म्हणून तो सुद्धा वास्तव आहे. समोरील वृक्ष विचारांनी निर्मिलेला नाही परंतु तो सुद्धा एक वास्तव आहे. काल्पनिक संकल्पना सुद्धा वास्तव आहेत. आणि त्यांच्या भ्रमातून झालेली कृती विक्षिप्त आहे ती सुद्धा वास्तविकता आहे. आणि वास्तविकता म्हणजे सत्य नव्हे. सर्व प्रकारच्या श्रद्धा भ्रम आहेत आणि त्यांच्या क्रिया विक्षिप्त असतात.

वास्तविक जीवनात बरोबर काय आहे हे दुसऱ्यांचे न ऐकता स्वतः शोधायला हवे. दुसरे आपणास सांगू शकत नाहीत. *जेव्हा आपण भ्रामक संकल्पना टाळून वास्तविक जीवनाकडे पाहु, ते पाहणे आणि त्याचे आकलन होणे हा विवेक आहे.* वास्तव आणि भ्रम यांची सरमिसळ नसणे म्हणजे विवेकवृत्ती आहे. *हि विवेकबुद्धी मग आपणास सांगत असते की योग्य आणि अयोग्य काय आहे ते.

सारासार विवेक म्हणजे सत्य आणि असत्य काय आहे हे ओळखणे होय. सत्य काय आहे हे पाहताना कोणत्याही मानसिक, काल्पनिक भ्रम साथीला नसावेत. आपण जेथे जावू तेथे विवेक बुद्धीचा वापर करू लागतो, म्हणजेच विवेकबुद्धी हीच बरोबर काय आहे हे ठरवीत असते. 

मग सत्य काय असावे?

अर्थात ते वास्तविकता नक्कीच नाही. जे भ्रामक हि नाही आणि वास्तविक सुद्धा नाही असे जे काही आहे ते सत्य आहे. सत्य अवस्था हि विवेक बुद्धी द्वारा वास्तविक आयुष्यात कार्य करत असते. 

( कृष्णमूर्ती यांनी इथे illusion / भ्रम, reality / वास्तविकता आणि Truth / सत्य अवस्था अशा तीन अवस्था सांगितल्या आहेत. आपल्या जीवनात नदी, डोंगर, झाडे आदि नैसर्गिक गोष्टी असतात, मानवाने बनविलेल्या घरे, रस्ते आदी वास्तविक गोष्टी असतात तशाच देव, देश, धर्म, जात आदि केवळ भ्रामक संकल्पना सुद्धा असतात. आपण या भ्रामक संकल्पनांना आपल्या वास्तविक जीवनातून काढून टाकल्या तर केवळ नैसर्गिक आणि जीवनावश्यक गोष्टीचं आपल्या जीवनात शिल्लक राहतील. भ्रामक कल्पना काढून टाकून संकल्प विकल्प रहित जीवन जगण्यासाठी विवेक बुद्धी लागते. ही विवेक बुद्धी सत्य अवस्थेची देणगी असते. वास्तविक जीवनातून भ्रामक संकल्पना काढणे हेच सत्य अवस्थेची क्रिया असते आणि तेच सत्य असते).

(SAANEN 7TH PUBLIC TALK 25TH JULY 1976).

Tuesday, July 20, 2021

गोदान आणि कन्यादान

एका व्यक्तीकडे काही गाई होत्या आणि तो गरजू व्यक्तींना गाई दान करायचा. एकदा एक व्यक्ती त्याच्याकडे आला आणि त्याची गाय दान मागू लागला. माझ्याकडे चांगला गोठा आहे, शेत आहे, भरपूर चारा आणि पाणी आहे. माझा गुराखी आपल्या गाईची चांगली देखभाल करीन आणि तिची योग्य अशी काळजी घेईन. दानशूर व्यक्तीने त्या गरजू व्यक्तीला त्याची एक गाय दान देण्याचे कबूल केले. घेवून जा एक गाय असे तो म्हणाला. गरजू व्यक्ती म्हणाली की आपण जे करीत आहोत त्याची इतरांना सुद्धा माहिती व्हावी म्हणून आपण माझ्याकडील आणि आपना कडील चार चौघांना बोलावू आणि त्यावेळी पुढील व्यवहार कसा करायचा ते ठरवू या. दानी व्यक्तीने ते सुद्धा कबूल केले. 

ठरलेल्या दिवशी दोन्हीकडील बाया माणसे एकत्र आली, गाईची निवड केली. निवड झाल्या नंतर दानी व्यक्तीने गाय घेवून जा असे सांगितले. परत गरजू व्यक्तीने सांगितले असे नाही लगेच नेता येणार. आपण गाय घेवून जायचा मुहूर्त काढू या. पुजाऱ्याला बोलवा. पुजारी आला, मुहूर्त काढला गेला. गरजू व्यक्तीने जमलेल्या सर्वांना भोजन, पाहुणचार आणि पुजाऱ्याची दक्षिणा दानी व्यक्तीने करावी असे सांगितले. कारण दान तो करीत आहे.

नंतर योग्य मुहूर्तावर गाय दान करण्याचा सोहळा दानी व्यक्तीकडे घेण्याचे ठरले. दोन्हीकडील सर्व नातलग आणि मित्र मंडळीना पाचारण केले गेले. त्यांचा पाहुणचार दानी व्यक्तीला करावयास लावला. नंतर गाय सांभाळणाऱ्या गुराख्याचा यथोचित सत्कार केला गेला. गाईला सांभाळण्यासाठी दक्षिणा मागण्यात आली, गाईला नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करावयास लावली, कारण दान तो करीत आहे.

गोदान पेक्षा कन्यादान हे कितीतरी महान आहे. ती कन्या आता आपल्या कुटुंबाचा भाग होणार आहे, आपल्या मुलाची अर्धांगिनी होणार आहे, त्यांच्या मुलांची ती आई होणार आहे. तिचे नातलग सुद्धा आता आपले नातलग होणार आहेत. 

आणि ते कन्या दान घेताना आपण वधू पक्षाला किती छळत असतो याचा कधी आपण विचारच करीत नाही.

याचे कारण पूर्वी जे जे त्या अनुभवातून गेले आहेत अगदी जुन्या गायी सुद्धा त्यांना तेच योग्य वाटत असते. आणि नवीन गाय घेताना तोच व्यवहार अधिक क्रूर कसा करता येईल याचाच सगळेजण विचार करीत असतात. 

सत्य हे सहज असते त्याला आपण आपल्या अव्यवहाराने कडवट बनवीत असतो.

Tuesday, July 13, 2021

जागेपण

जागेपणातील प्रत्येक गोष्टी वर लक्ष ठेवण्यापेक्षा फक्त जागेपणा वरच लक्ष ठेवले तर चालू शकेल काय?

मनाला ज्याची सवय होते त्या गोष्टी मन त्याची जाणीव न ठेवता सुद्धा करीत राहते. पोहणे अथवा ड्रायव्हिंग हे सुरुवातीस लक्ष पूर्वक शिकावे लागते परंतु नंतर त्याची सवय झाली की मनाला ते सहज जमू लागते. मनाला जुने आणि तेच ते नको असते, त्याला सतत नवीन हवे असते. सतत नवे हवे असण्याची जी जाणीव आहे तेच मन असते. अशा अवखळ मनाला वेसण कशी घालायची तर त्याला जे नको आहे ते त्याला करावयास लावायचे. 

आपण आत्ता काय करीत आहोत याचे सतत भान ठेवल्याने मनाला अवांतर कल्पना मध्ये रमण्यास वेळ मिळत नाही. आणि आपल्या आयुष्याचा खूप कमी भाग असलेल्या मनास तेव्हढ्या उपायाने निरुत्तर करता येते. 

आपण जागे असतो याची जाणीव असते परंतु त्याची इतकी सवय झालेली असते की मन ते लक्षात ठेवत नाही. 

अशा वेळी मी जागा आहे या एकाच जाणिवेत राहणे योग्य होईल की मी आता जे काही करीत आहे त्या जागे पणातील जेव्हढ्या शक्य होईल तेव्हढ्या गोष्टीवर लक्ष ठेवणे योग्य होईल?

सकाळी उठल्यावर आपण जागे असतोच. समजा आपण फक्त मी जागा आहे एव्हढीच जाणीव सतत ठेवली तर मन तेथे अडकून राहील. जागे झाल्या नंतर पुढे काय करायचे आहे हे मन विचार करू शकणार नाही आणि जीवन तेथे ठप्प होण्याची शक्यता आहे. 

दिवस आणि रात्र हे भास आहेत, तथ्य फक्त सूर्य आहे. सूर्य असल्या आणि नसल्या मुळे दिवस रात्र भासतात. त्या प्रमाणे जीवन सतत चालू असते आणि त्यामधील जागृत अवस्था आणि निद्रिस्त अवस्था हे ठराविक काळ कामासाठी आणि विश्रांती साठी आवश्यक झाले आहेत. 

जागृत अवस्थेत आपण आवश्यक कामासाठी फक्त वेळ दिला आणि अनावश्यक कामांना वेळ दिला नाही, त्या बद्दल विचार केला नाही तरी सुद्धा आपण मनाला वेसण घालू शकतो. जीवन प्रवाह चालू ठेवून त्या मधील अनावश्यक / अवांतर गोष्टींना थारा न देणे याला नैसर्गिक शून्य अवस्था म्हणता येईल. 

Nothingness / शून्य अवस्था याचा अर्थ काहीच न करणे असा होत नसून आवश्यक तेव्हढे करणे आणि अनावश्यक ते टाळणे होय.

जागे असताना जागेपणा मधील देव, देश, धर्म, समाज, कुटुंब, नाते संबंध यांची सत्यता तपासा, फक्त श्रद्धेतून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या मधील असत्यता आपणास समजली तरच आपणास सत्य अवस्था समजू शकते. जागृत अवस्थेतील अशा सर्व गोष्टींचा असत्यपना लक्षात आला तरच मग फक्त जागे असण्याची जाणीव पुरेशी होईल. 

शरीराचा मृत्यू होण्या पूर्वी मनाचा मृत्यू होणे आवश्यक असतो. मन म्हणजे अवांतर, अनावश्यक विचार आशा आकांशा होत.

Thursday, July 08, 2021

आकलन

 राजकारणासाठी राजकारणी देव, देश, धर्म अशा श्रद्धाचा गैरवापर करतात याचे आकलन होणे म्हणजे त्या राजकारणाचे सत्य समजणे होय. हे साधे सत्य का समजत नाही तर त्यामध्ये आपला सुद्धा काही स्वार्थ असतोच. जोपर्यंत स्वार्थ आहे तो पर्यंत सत्य आकलन होत नाही. आणि तो पर्यंत सुराज्य अशक्य आहे. 

जीवनातील सत्य अवस्था न समजण्या मागे स्वार्थी वृत्ती हीच जबाबदार असते. सत्य सतत असते परंतु स्वार्थी अंतःकरणाने त्याचा बोध नाही. तो बोध करून घेण्यासाठी आपण परत तशाच स्वार्थी गुरूकडे जात असतो. 

आपणच आपल्या मध्ये जे काही न्यून आहे ते शोधले पाहिजे आणि त्याचा समाचार घ्यायला हवा. बाहेरचे कोणीही आपल्या आतील स्वच्छता करू शकत नाही. आपल्या वृत्ती हाच आपला मी असतो, वृत्ती क्षीण झाल्या की मी सुद्धा क्षीण होतो. सत्य तत्क्षणी समजू लागते.

Saturday, July 03, 2021

Why Life and Philosophy are different?

Why doesn't philosophy help us in our miserable life?

Just imagine a river and a bridge over it. The bridge is deliberately built at some distance above the river. So that river water does not flow over the bridge. Care is also taken not to drown the bridge in the river. For this a certain distance is kept between the two, the two do not meet each other.

Our real life is as natural as a river. We are creating bridges in the air of our thoughts, ideas, hopes, aspirations, desires etc. Our me and his thoughts are part of that psychological bridge they will never touch the actual river of Life.

If I realise who am I, then the ideas that I have created can also be understood. If one understands the real nature of I and his ideas, then he can ignore the bridge created by I and his ideas. Then he can touch the real life of river, then he can live real life, live his life without any philosophy. Otherwise he will remain separate forever from the river like a bridge. 

Bitter events in our life are coming to tear down the mental bridge of our ego. All those are psychological problems only and without them we will never get down in the real life of river. That is why the saints have asked a miserable life.

If we do not understand real nature of I beforehand, then the damage done when a river floods or a bridge collapses is irreparable.

Friday, July 02, 2021

नेती नेती

 


संपूर्ण विश्व हे त्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेने चालत असते. हे पाहून मानवी मन आपली स्वतःची वैयक्तिक बुद्धिमत्ता तयार करते. वैश्विक बुद्धिमत्ता हि नैसर्गिक असते, ती असिमित असते, ती कालबध्द नसते. तर मानवी बुद्धिमत्ता हि वैचारिक असते, ती कालबध्द असते, संकुचित असते. संकुचित, कालबध्द असणारी मानवी वैचारिक बुद्धिमत्ता ज्या संकल्पना तयार करते त्यामध्ये मूलभूत विभाजन असते ज्यामुळे वैचारिक संकल्पनांचे पुढे अजून विभाजन होत जाते आणि त्या विभाजित दुहिमध्ये संघर्ष होत राहतो. 

मी हा एक विचार असतो आणि तो विचार करून जी संकल्पना बनवितो ती सुद्धा विचार असतात. परंतु इथे मी हा त्याच्या संकल्पना पासून स्वतःस वेगळा समजत असतो. हे जे मूलभूत विभाजन असते ते पुढे प्रत्येक विचारात उतरते आणि सर्व विचारामध्ये संघर्ष होत राहतात. 

सर्व मानवांनी एकोप्याने, सदाचाराने, सुरक्षित रहावे यासाठी देव, देश, धर्म आदि संकल्पना पूर्वी निर्माण झाल्या होत्या. परंतु त्यातून नंतर अनेक देव, अनेक देश आणि अनेक धर्म तयार झाले. या अनेकात संघर्ष होत राहिले आणि मानव त्याच्याच वैचारिक संकल्पनेमुळे असुरक्षित झाला आहे. 

जर मानवी बुद्धिमत्ता मानवाला असुरक्षित करीत असेल तर वैश्विक बुद्धिमत्ता मानवाला का मदत करीत नाही?


वैश्विक बुद्धिमत्ता हि सर्वत्र असतेच असते फक्त आपल्या मानवी बुद्धिमत्तेमुळे ती दिसून येत नाही. मानवी बुद्धिमत्तेने ज्या काही संकल्पना बनविल्या आहेत त्या पासून आपण वेगळे झालो की आपणास वैश्विक बुद्धिमत्तेचे दर्शन होते. यासाठी प्रत्येक मानवी संकल्पनांना त्या कितीही महान असल्या तरी त्यांना राम राम म्हणणे अनिवार्य ठरते. आपल्या परंपरा आणि त्यांच्या श्रद्धा आणि त्यांची भीती या आपणास तसे करण्यापासून परावृत्त करतात. 


सर्व परंपरा आणि श्रद्धा यांचे मूळ असलेल्या वेदांनी त्यावर उपाय सांगितला होता - नेती नेती, न इति, न इति. जे जे काही वैचारिक आहे ते ते सत्य नव्हे. 

वैश्विक बुद्धिमत्ता आपणाशी प्रत्यक्ष संवाद करू शकत नाही त्यामुळे वैचारिक बुद्धिमत्तेनेच स्वतःचा धोका ओळखून, स्वतःस यथार्थ ओळखून, स्वतःस नजरबंद करणे आवश्यक असते. आणि हे आपण स्वतः करू शकतो त्यासाठी बाहेरचे कोणीही मदत करू शकत नाहीत.

Tuesday, June 29, 2021

संकल्प विकल्प रहित कृती


संकल्प विकल्प रहित होवून जगणे शक्य आहे काय? 

समाजात ज्ञानी व्यक्तीचा आदर राखला जातो. त्या ज्ञानी व्यक्तीचे अंतर्बाह्य जीवन काय आहे याची खातरजमा न करता केवळ तो किती शिताफीने पोपटपंची करीत असतो याकडे लोकांचे लक्ष असते. धर्मग्रंथांचे पाठांतरे करून त्यातील उतारे फेकून समाजाला बेवकुफ बनविता येते. साजेसा पोशाख घातला की महाराज सुद्धा सहज बनता येते. अशा तथाकथित ज्ञानी व्यक्ती केवळ पोथी पुराणे वाचून पुराणिक झालेले असतात त्यांना स्वतःचे यथार्थ ज्ञान झालेले नसते. स्वयं साक्षात्कार झालेला नसताना केवळ जुने ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करणे, नवीन ग्रंथ लिहिणे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार केला गेल्यामुळे समाजात अज्ञान पसरत असते. अज्ञानी त्यांच्या अज्ञानाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करण्यासाठी अज्ञान विकत असतात. अशा गोष्टी-वेल्हाळ व्यक्तीला ज्ञानी समजले गेल्याने समाज भरकटला जातो. समाजाचे भले करण्याच्या नादात आपण समाजाचे किती नुकसान करीत आहोत याचे कोणालाही भान राहत नाही. धार्मिक, अध्यात्मिक कल्पना अशा अज्ञानी व्यक्तींच्या अपप्रचाराने वृद्धिंगत होत असतात आणि कसलाही प्रचार प्रसार न करणारे खरे ज्ञानी आणि खरे ज्ञान झाकोळले जाते. सत्य म्हणजे काहीच नसणे होय आणि काहीच नसणे याचा प्रचार करता येत नाही. यामुळे जे अज्ञान असते ते समाजात बोकाळले जाते. 

कोणत्याही धार्मिक - अध्यात्मिक - सामाजिक संकल्पना शिवाय जगता येवू शकेल काय? समाजात अगोदरच रीती रिवाजांच्या असंख्य संकल्पना रुजलेल्या असतात. संकल्पना नुसार समाज कृती करीत असतो. 

आत्ताच्या वर्तमानात जगायचे असेल तर फक्त आत्ताच्या क्षणाच्या गरजेनुसार त्या क्षणाची कृती असायला हवी. तेव्हाच आपण संकल्पना रहित जीवन जगू शकतो. यासाठी आत्ताच्या क्षणाशी सतत सावधान आणि जागरूक असायला हवे. आपण आणि आपल्या कल्पना यांचे द्वैत नसले की विसंवाद उत्पन्न होत नाही. जेथे विसंवाद असतो तेथे प्रयत्न करावे लागतात. नदीच्या प्रवाह सारखा जीवन प्रवाह असतो त्या प्रवाह बरोबर सहज जगता येते. परंतु जीवन प्रवाह विरुद्ध जगताना त्रास, दुःख सहन करावे लागतात. म्हणजे आपले जीवन खडतर का असते तर आपण मानसिक कल्पनासाठी कृती करीत असतो आणि ते जीवन प्रवाहाशी विसंगत असते. 

जीवन प्रवाह बरोबर प्रवास करता येत नाही याचे कारण आपण आपल्या कल्पनांचे हवेत पुल बांधून त्यावरून जात असतो. प्रवाह आणि पुल दोघे सहसा एकमेकांना भेटत नाहीत. जीवन प्रवाह समजण्यासाठी एकतर कल्पनांचे पुल कोसळायला हवेत किंवा प्रवाहात महापूर यायला हवा. यासाठी महापुरुष जीवनात दुःख मागतात.

जीवन जगण्यासाठी सतत कृती आणि कार्य करीत राहावे लागते. कार्य करताना ते जीवनाशी विसंगत असेल तर ते योग्य कार्य नसते. विसंगती निर्माण करणारे मानसिक, काल्पनिक कार्य हे आपल्या मी पणाच्या अज्ञानातून निर्माण होत असतात. मी चे अज्ञान आपणास स्वतः शोधावे लागते. ते दुसऱ्याकडून शिकता येत नाही. मी म्हणजे स्मृतींचा प्रतिसाद असतो, तो भूतकाळात असतो. तो कधीच वर्तमानकाळ अनुभवू शकत नाही. त्यामुळे त्याच्या सर्व कल्पना ह्या भूतकाळातील असतात. याचे ज्ञान झाले तरच आपण मी शिवाय, मी पणाच्या कल्पना शिवाय जगू शकतो. मी सोडून जे इतर अनंत जीवन आहे त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. त्या अनंत जीवनाच्या ऊर्जेच्या संपर्कात असताना जे सहज कार्य होते ती योग्य कृती असते, ती योग्य कृती जीवनाशी विसंगत नसते, आणि सहज होत असल्याने प्रयत्नांची आवश्यकता नसते. प्रयत्न आणि विसंगती यांच्या संघर्षामध्ये, त्यांच्या सततच्या विचाराने मेंदू थकला जातो. व्यक्तीचे वय लहान असले तरी जुनाट विचाराने ते वयस्कर वाटतात.

जीवन जगण्याची ही सहज वृत्ती नसेल तर मनुष्य जीवन जगत नसतो तर तो त्याच्या मनाने बनविलेल्या कल्पनांचा पाठलाग करीत असतो. मी आणि त्याच्या संकल्पनांचे जीवन अतिशय संकुचीत असते त्या उलट त्यांच्या शिवायचे जीवन अनंत ऊर्जेने भारलेले असते. त्या अनंत जीवनाची सर मानवी शब्दात पकडता येत नाही.

The Collected Works of J. Krishnamurti -Volume XIV 1963-1964: The New Mind

(October 25, 1964.)




Friday, June 25, 2021

विचार म्हणजे नेमके काय असते?

 


आपला मी आणि मी जे सतत विचार करीत असतो त्यांचे खरे स्वरूप समजले तर आपणास आपल्या जीवनाचे खरे स्वरूप समजू शकते म्हणजेच सत्य आकलन होवू शकते. 

कॅसेट् प्लेअर येण्यापूर्वी सीडी सारखी मोठी तबकडी असणारा ग्रामोफोन प्लेअर होता. ती तबकडी गोल फिरत असायची आणि त्यावर एक पिन ठेवली जायची. तबकडीवर रेकॉर्ड केलेले गाणी ती पिन read करायची आणि स्पीकर मधून ते गाणे वाजले जायचे. हीच पद्धत कॉम्प्युटर मधील बंदिस्त hardisk या memory storage device मध्ये असते. हार्ड डिस्क मधील माहिती कॉम्प्युटर आपणास हवी तशी पुरवीत असतो. माहितीची ही देवाण घेवाण करणारी जी यंत्रे मानवाने बनविली आहेत ती सर्व यांत्रिक आहेत. म्हणजे यांत्रिक पद्धतीने आपण माहितीची देवाण घेवाण करू शकतो, माहिती साठवणूक करू शकतो. अगदी अशीच यंत्रणा आपल्या मेंदूमध्ये असते. आपल्या पूर्वजांनी जन्मतः दिलेली माहिती अधिक आपल्या लहानपना पासूनची सर्व माहिती आपल्या मेंदूमध्ये साठविलेली असते. ज्यावेळी जी माहिती मी याला हवी असेल त्यावेळीं ती माहिती आपल्या मेंदूमधील स्मृती मधून आपल्या मी ला पुरवली जाते. यालाच आपण विचार करणे असे समजतो. म्हणजे आपल्या विचाराची प्रक्रिया ही कॉम्प्युटर सारखीच यांत्रिक - तांत्रिक असते. 

मी हा सुद्धा आपल्या स्मृती मधील विचार असतो. ज्यावेळी आपणास कोणी काही विचारीत असतो त्यावेळी त्याचे उत्तर देण्यासाठी आपल्या स्मृती मधील माहिती संग्रहा मधून एक तात्पुरता announcer / उदघोषक तयार केला जातो. हा उदघोषक म्हणजे आपला मी असतो. अनुभव आणि माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी हा तात्पुरता तेव्हढ्या साठी मी नावाचा उदघोषक उत्पन्न होतो. व्यवहारीक गोष्टी करण्यासाठी, शरीराच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठीच्या विचारांसाठी हा मी तात्पुरत्या सोयीसाठी हवा असतो. परंतु एकदा मी निर्माण झाल्या नंतर त्याला जास्तीत जास्त काळ अस्तित्वात राहण्याची इच्छा तयार होते. त्याच्या या इच्छे पूर्ततेसाठी तो इतर अनेक इच्छा तयार करीत राहतो. तो फक्त इच्छा तयार करून थांबत नाही तर त्यासाठी इतर अनेक भावना, संकल्पना, श्रद्धा यांनाही तोच जन्माला घालतो. 

मी हा एक विचार आहे, त्याने बनविलेल्या सर्व इच्छा, आशा, आकांशा, भावना, संकल्पना, श्रद्धा हे सर्व विचार आहेत. आणि सर्व विचार हे तांत्रिक आहेत. 

राग येवुन गेल्या नंतर आपणास ते समजते, त्यावेळी राग आणि मी एकच असतात म्हणून मी ला नंतर समजते. नंतर समजणारी गोष्ट ही भूतकाळ असते, ती वर्तमानकालीन असू शकत नाही म्हणजेच ती जिवंत नसून मृत झालेली असते. आपले विचार हे सर्व भूतकाळातील मृत विचार असतात आणि तेच आपल्या संघर्षमय जीवनास कारणीभूत असतात. 

आपले जुने कोणतेही विचार हे वर्तमानाला कदापिही जानु शकत नाहीत म्हणून सर्व पारंपरिक ज्ञान आणि त्यांचे गुरू सत्याचे आकलन करण्यात सपशेल अयशस्वी होतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते सगळे विचार, ज्ञान आणि परंपरा ह्या स्मृती मधून तयार झालेले केवळ भास आहेत. मी आणि मी चे भास म्हणजे तथ्य नव्हेत, सत्य तर कदापिही नव्हेच. म्हणून मी म्हणजे आत्मा वगैरे केवळ कल्पना आहेत. 

ज्यावेळी आपण रागावतो तेव्हा नेमके कोण रागावते? आपल्या मी चे विचार दुःखी झाले की ते रागावतात. मी हा एक भास आहे, ते भास रागवण्याचे भास तयार करतात. प्रत्यक्षात तिथे इतर कोणीच रागावण्यासाठी नसते. इतर विचारापासून मी हा विचार वेगळा होतो आणि तो द्वैत निर्माण करतो. मी आणि इतर अनुभव आणि त्यांचे विचार अशी भासामध्ये विभागणी होते. आणि जेथे मानसिक विभागणी होते तेथे संघर्ष अटळ असतो. उदा. दोन धर्म, दोन देश, दोन संस्कृती वगैरे.  

शरीराचे संरक्षण, संवर्धन यासाठी विचार आवश्यक असतात परंतु या भौतिक गरजांचे आपला मी त्याच्या मानसिक संकल्पना बनविण्यात यशस्वी झाला आहे. उदा. आपल्या संरक्षणार्थ समाज / धर्म / देश अशा संकल्पना आपल्या मी याने बनविल्या आहेत. परंतु दोन गटामध्ये हिंसाचार होवून मूलभूत संरक्षण धोक्यात येते. 

मी आणि त्याचे विचार यांचे यथार्थ ज्ञान झाले तर जीवन मानसिक संघर्षातून निवृत्त होवून नैसर्गिक सहजीवनात बदलू शकते, आणि ते सहज शक्य आहे.

Thursday, June 24, 2021

नैसर्गिक ध्यान

 

आपण आपली वर्तमानातील कामे सोडून टीव्ही समोर बसून आपले मनोरंजन करीत असतो. टीव्ही वरील सर्व कार्यक्रम हे भूतकाळा मध्ये तयार केलेले असतात, अनेकदा त्यांचे repeat telecast केलेले असतात. टीव्ही केंद्रात असे असंख्य कार्यक्रम साठविलेले असतात. 

भूतकाळात होवून गेलेल्या घटना पासून आपण जेव्हा आपले मनोरंजन करत असतो तेव्हा आपले वर्तमान कालाकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेले असते. वर्तमान काळातील समस्यांकडे आपले लक्ष जावू नये म्हणून सुद्धा अनेकदा टीव्ही वर जास्त मनोरंजक कार्यक्रम दाखविले जातात.

अगदी असेच आपल्या अंतरंगात होत असते. आपले मन सतत आपणास मेंदूच्या समृतिमध्ये साठविलेल्या जुन्या घटना दाखवित असते, त्यावर मन सतत विचार करीत असते. जुन्या घटना पाहताना आणि त्यावर विचार करीत असताना त्याचवेळी ते मन भविष्य काळातील योजना सुद्धा बनवीत असते. मनातील सततच्या विचारामुळे आपणास वर्तमानकाळ कधीच समजत नाही. तो समजुच नये यासाठी मनाला अधिक मनोरंजक अशा श्रद्धा, भक्ती, साधना यांच्या आहारी केले जाते. 

ज्या ज्या वेळी आपण अवांतर विचार करीत असतो त्या त्या वेळी आपल्या मेंदूमध्ये त्या अवांतर विचारांची फिल्म फिरत असते. या फिल्म मुळे आपले वर्तमानाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत राहते. या फिल्म मधून जर आपल्या भावना उत्तेजीत केल्या जात असतील तर त्याची नशा होवून जाते आणि मग आपण त्या फिल्म शिवाय जगू शकत नाही. 

आपले नैसर्गिक जीवन आणि आपले मानसिक जीवन यामधील हा फरक आहे. आपले मानसिक जीवन हे तथ्य नसून ते काल्पनिक आहे हे लक्षात येणे खूप महत्वाचे आहे. 

काल्पनिक जीवनाची नशा उतरवायची असेल तर नशा चढविनाऱ्या ज्या श्रद्धाच्या गोष्टी परंपरा सतत सांगत असतात त्यांचा त्याग करायलाच हवा आणि नैसर्गिक जीवनात स्थिर होण्यासाठी जे काही आपण आता वर्तमानात कार्य करीत असतो त्याच्या कडे सतत लक्ष देत राहणे, वर्तमानाचा योग करीत राहणे अगत्याचे आहे. 

त्याग कशाचा करायचा आणि योग कशाचा करावयाचा याचे सतत स्मरण ठेवणे म्हणजे खरे ध्यान होय.


Tuesday, June 22, 2021

भिती

 


भिती कशी तयार होते आणि ती कशी नाहीशी करावी?

मानव प्राणी हा सतत भीती खाली वावरत असतो. मृत्यू, आजार, वृद्धत्व, अपघात, एकटेपणा, अंधार, आपण कोणीच नसण्याची भीती, नोकरी - व्यवसायात मोठे यश न मिळण्याची भीती, नेता नसण्याची भीती अशा वेगवेगळ्या गोष्टींची भीती आपणास सतावत असते. 

अनेकांना भीतीची जाणीव असते तर काही जण आपला न्यूनगंड लपविण्यासाठी आपण खरे कोण आहोत, आपणास कशाची भीती आहे याचा विचारच करीत नाही. या गोष्टी त्यांच्या जाणिवेत सुद्धा नसतात. आणि जर अशा गोष्टी लपविलेल्या असतील तर त्या उघड कशा होणार? 

भीतीची संपूर्ण रचना आकलन करून घेणे अगत्याचे आहे, केवळ २-३ मिनिटे ऐकून नंतर ते विसरून जाण्यासारखे नाही. 

भीतीचे मूळ सापडले तर तिच्या विविध प्रकारावर उपचार करण्याचा वेळ आणि श्रम वाचविता येतील. 

भीतीचे द्रष्टा आणि दृष्य एक आहेत या द्वारे अवलोकन केले तर भीतीचा समूळ उच्चाटन करता येणे सहज शक्य आहे. 

उदाहरणादाखल आपण एकाकीपण मधून निर्माण होणाऱ्या भीतीचे अवलोकन करू यात. एकाकीपणा हे वास्तविक आहे की ती एक कल्पना आहे. एखादी व्यक्ती खरीच एकटी असते तर दुसरी व्यक्ती गर्दीमध्ये असून सुद्धा स्वतःला एकटी समजते. दोघांना त्या एकटेपणाची भीती वाटत असते. भिती खरी आहे की भीतीची केवळ कल्पना केलेली आहे याचा आपण विचार केलेला असतो काय? कारण बऱ्याचदा भीती ही केवळ मानसिक असते. 

समजा आपली एकटेपणाची भीती हि कल्पना नसून वास्तविक आहे तर एकटेपणा म्हणजे नेमके काय? 

एकटेपणाची भीती निर्माण होण्यास आपली स्वकेंद्रित वृत्ती, केवळ स्वतःचा विचार करणे, स्वतःचे पुढे पुढे करणे, स्वतःची मते, वैयक्तिक स्वप्ने, दृष्टिकोन, मानमरातब, महत्त्व स्वतःकडे घेणे आदि कारणीभूत असतात. हे सर्व आपणास अप्रत्यक्षरीत्या एकाकी करत असतात हे आपल्या लक्षात येत नसते. दररोज वर्षानुवर्षे आपण हे करत आलो आहोत आणि अचानक आपल्याला आढळून येते की आपण पूर्णपणे एकटे आहोत. एकटेपणाची तीव्र भावना मधून भीती निर्माण होते. 

भीतीची भावना कोणाला होत असते? आपल्या मी याला. आपला मी आणि आपली भीती हे वेगवेगळे असतात अशी मी याची समजूत झाल्याने मी भीती घालविण्यासाठी प्रयत्न करतो अथवा पलायन करतो. आपला मी आणि आपली भीती यांच्या मधील संबंध जर आपल्या लक्षात आला तर दोघांचे मूळ उलगडू शकते आणि त्या साक्षात्कार मध्ये दोघांचे भ्रम नाहीसे होवू शकतात. 

आपण भीती या अनुभवाचे सूक्ष्म अवलोकन केले तर आपला मी म्हणजे भीती आणि भीती म्हणजे मी हे लक्षात येते, ते दोघे एक असल्यामुळे भीती पासून मी पलायन करू शकत नाही, तो भीती टाळू शकत नाही. मी कोणतीही साधना करून, सत्कर्म करून, गुरूकडे जावून अथवा देवाची प्रार्थना करून भीती पासून वेगळा होवू शकत नाही. मी आणि मी याने बनविलेली भीतीची मानसिक कल्पना हे दोघे एक आहेत, दोघेही काल्पनिक आहेत, दोघेही भ्रम आहेत हे अवलोकन केल्या नंतर लक्षात आले तर? ना मी उरतो आणि ना त्याची भीती उरते.

मी आणि भीती एक कसे असू शकतात?

आपली भीती म्हणजे आपणास भीती विषयक असणारी पूर्व माहिती होय. ही पूर्व माहिती आपल्या मेंदूच्या स्मृतीमध्ये वर्षानुवर्षे साठवीलेली असते. म्हणजे भीती हि एक प्रकारे स्मृती मधील केवळ माहिती होय. आपला मी हा या स्मृतींचा प्रतिनिधी असतो, स्मृतींचा प्रतिसाद असतो, तो स्मृती मध्येच तयार होत असतो, म्हणून मी सुद्धा स्मृतींचा एक भाग आहे. भिती आणि मी हे दोघे स्मृतींचा भाग आहेत म्हणजे ते दोघे एक आहेत. 

मी आणि मीची भीती हे वेगवेगळे नसून एकच आहेत, ते दोन्ही स्मृती आहेत, ते भूतकालीन आहेत याचे यथार्थ आकलन झाले तर आपण मी आणि त्याची भीती या द्वैत भावने मधून मुक्त होतो. मी आणि मिची भीती हे एकच आहेत याच्या आकलनामधून आपण दोघांचा होणारा संघर्ष टाळू शकतो, भीतीच्या समग्र भावनांचे उच्चाटन करू शकतो. 

एकाकीपणाच्या एका भीतीद्वारे आपण समग्र भीतीची मध्यवर्ती वस्तुस्थिती पाहू शकलो. भिती ही मी पणाच्या अस्तित्वामुळे आहे. मी आहे म्हणून मी याच्या भीती सारख्या अनेक संकल्पना आहेत. मी पणाची भावना नसेल तर भीती सारख्या भावना नसतील. 

आपण आपल्या शिक्षण, संस्कार यातून मीपणा जतन करीत असतो. मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, मी अमका आहे, मी तमका आहे यातून आपण मी पणाचे संगोपन करीत राहतो. 

आपण “मी” शिवाय या मी च्याच जगात राहू शकतो काय? जेव्हा आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर “मी” चा शिक्का असतो : संस्कृती, सभ्यता, कला, व्यवसाय, राजकारण, धर्म, आपल्या सभोवतालच्या या प्रत्येक गोष्टीद्वारे आपणास सतत ठामपणे सांगितले जाते की, ‘मी व्हा’ - ‘मी’ वाढवा. अशा मानवी संस्कृतीत किंवा सभ्यतेत ‘मी’ शिवाय कोणी जगू शकेल काय? अध्यात्मिक म्हणतात की ते शक्य नाही, म्हणून ते जगापासून दूर पळतात, मठात राहतात, आपले नाव बदलतात, ते आपले जीवन अज्ञातास समर्पित करतात. परंतु “मी” अजूनही तेथे आहे कारण “मी” आणि ईश्वर यांच्या प्रतिमेसह मी स्वतःची ओळख जिवंत ठेवतो. “मी” वेगळ्या अध्यात्मिक रूपात अजूनही जिवंत राहतो.

तर मग एखादी व्यक्ती मी” शिवाय जगू शकते काय? - कृपया, हा एक अत्यंत महत्वाचा आणि अतिशय गंभीर प्रश्न आहे, हे केवळ एक चर्चेची गोष्टच नाही - या राक्षसी जगात कोणीही “मी” शिवाय जगू शकेल का? म्हणजेच वेडेपणाच्या जगात एखादा शहाणा माणूस जगू शकतो का? आस्तिक, श्रद्धाळू आणि धार्मिक जगात सर्व वेडे आहेत. तुम्हाला जे काही घडत आहे ते माहित आहे, मी तुम्हाला ते सांगत बसत नाही. 

 https://kfoundation.org/the-root-of-fear





Sunday, June 20, 2021

सुव्यवस्था

आपले घर, आपल्या व्यवसायाची जागा, आपला परिसर हे व्यवस्थित राखण्यासाठी तेव्हढी बुद्धिमत्ता आणि तेव्हढी जबाबदारीची काळजी असणे आवश्यक असते.

म्हणजे सुव्यवस्थित अवस्था असण्यासाठी intelligence आणि compassion हे अंगभूत असणे आवश्यक असते.

Compassion, intelligence हे उसने आणता येत नाही, विकत घेता येत नाही, ते मानसिक रित्या तयार करता येत नाही. त्यासाठी गुरु आणि त्यांचे courses करून ते शिकता येत नाही. 

आपले जीवन सुव्यवस्थित नाही आणि ते सुव्यवस्थित असलेच पाहिजे याची जाणीव होणे हीच ती अंतर्दृष्टी / आकलन असते ज्यामुळे परिवर्तन शक्य असते. 

संपूर्ण विश्व हे कमालीचे सुव्यवस्थित (in order) आहे. या सुव्यवस्थित अवस्थेचे स्वतःचे अंगभूत असे Intelligence असते आणि ते विश्वातील सर्वांची काळजी घेत असते.

आपला वैयक्तिक मी हा हजारो वर्षांच्या मानवी संस्कृती चा प्रातिनिधिक भाग आहे. मानव समाजाची जी धारणा असते तीच आपल्या मी याची धारणा असते. मी याच्या मानवी धारणेला त्यांच्या अंगभूत अहंकार मुळे वैश्विक सूव्यवस्थेचे आकलन होणे शक्य नसते. त्यामुळे मानवी अहंकार हा त्याची स्वतःची वेगळी मानसिक व्यवस्था ( disorder ) निर्माण करीत असतो. ज्या व्यवस्थेचा पाया हा विभाजन, अहंकार आणि मी असतो ती व्यवस्था कधीही सुव्यवस्था होणे शक्य नसते. मानवी अहंकार मधून बनलेल्या सर्व मानवी व्यवस्था मध्ये संघर्ष अटळ असतो. 

जी व्यक्ती प्राधान्याने आपले जीवन सुव्यवस्थित करते म्हणजे स्वतःमधील सर्व मानवी धारणा नाहीशा करते त्यावेळीच तो वैश्विक सुव्यवस्थेशी सहजरीत्या जोडला जातो. विश्र्वा मध्ये सुव्यवस्था आहे फक्त मानवी मनाला त्याच्या अव्यवस्थेमुळे ती कळत नाही. 

आपल्या मानसिक धारणांच्या मानसिक धरणाने आपण आपला जीवन प्रवाह कोंडून ठेवला असतो. मी ची भिंत नाहीशी झाली की सर्व काही सुव्यवस्थित होते. 

Order बाबतचे J Krishnmurti यांचे विचार खालील व्हिडिओ मध्ये आले आहेत.

https://youtu.be/mxoe9IrLdfo



Monday, June 14, 2021

ध्यान

 


ध्यान कसे करावे? ध्यान करताना सुद्धा विचार थांबत नाहीत, मग विचारशून्य अवस्था कशी प्राप्त करावी? 

विचारशून्य अवस्था म्हणजे अजिबात विचार नसणे असे समजले जाते. त्या ऐवजी ते अनावश्यक विचार नसणारी अवस्था असे समजावे. 

विचार नाहीत हे कोणास समजते? विचारांना. विचार नसतील तर ते समजू शकत नाही. आपण विचारपूर्वक जे विचार करतो तेच आपणास समजतात. इतरवेळी आपला मेंदू जे काही विचार करीत असतो ते सजग विचारांना समजत नाही. आणि त्याही पलिकडील अशी निर्विचार अवस्था असते तिचा आपणास पत्ता लागू शकतं नाही. 


जीवन जगण्यासाठी विचार आवश्यक आहेत, त्याला आपण जीवनावश्यक विचार म्हणुया. परंतु इतर असंख्य अवांतर विचार आहेत त्यामुळे मेंदू वर प्रचंड ताण येतो ते अनावश्यक विचार काढणे आवश्यक ठरते.

विचारशून्य होण्यासाठी ध्यान साधना करताना सुद्धा विचार येतात. ध्यान करताना आपण येणाऱ्या विचारांकडे लक्ष ठेवून त्या वेळी आपण थोडेफार विचार कमी करू शकतो. जसे लहान मुलांवर लक्ष ठेवले की तेव्हढा वेळ मुले अवखळपणा कमी करतात. तसे ध्यान करताना जे विचार येतात ते कोठून येतात, कोण विचार करीत आहे, थोडा वेळ शांत बसता येत नाही काय? असे प्रश्न विचारीत राहिलो की विचारांवर त्या वेळी काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. विचारांवर लक्ष ठेवणे याला ध्यान समजले जाते. मंत्र म्हणणे सुद्धा विचार आहे. श्वासावर लक्ष दिले तर श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम असा नैसर्गिक नाद तयार होतो, त्याला संप्रदायीक मंत्र बनविला गेला आहे. 

सतत विचार करणे हा मनाचा स्थायी स्वभाव आहे (default mode of mind). त्या सततच्या विचारांना शक्य होईल तसे अटकाव करणे (धारणा / धरण) आपणास सहज शक्य आहे.

ध्यान केले अथवा नाही केले तरी दिवसभर आपण जे काही कार्य करीत असतो त्यावेळी फक्त त्या कृतीचा विचार करावा. त्या वेळी इतर विचार येवू देवू नये. याला निरपेक्ष सजगता असे  म्हटले जाते. 

जीवनावश्यक विचार आले तरी चालतील परंतु अनावश्यक विचार येवू न देण्यासाठी आपण आपल्या अनावश्यक सवयी बंद करायला हव्यात. अनावश्यक सवयी आपणास अनावश्यक विचार करण्यास भाग पाडतात.

जसे की राजकारण, समाजकारण, टीव्ही, चित्रपट, कथा, कादंबऱ्या, शेजाऱ्यांच्या कुचाळक्या आदि विषय बंद केले तर किती प्रमाणात आपण विचार कमी करू शकतो. तेव्हढा बोजा आपण मेंदूचा कमी करीत असतो. 

एकदा वरील अवांतर विषय कमी झाले की आपण आपल्या कुटुंबात, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यामध्ये नसल्या सारखे राहू शकतो (संन्यास). विचार अजून कमी होतील, मेंदूचा बोजा अजून कमी होईल.

या नंतर देव, देश, धर्म, जात, संप्रदाय, गुरु, ग्रंथ आदि सर्व संकल्पना जर सोडता आल्या तर विचार अजून कमी होतील, मेंदू अधिक मोकळा होईल (वानप्रस्थ).

वरील सर्व गोष्टी आणि इतर अनेक गोष्टी आपण स्वतः पकडून ठेवल्या आहेत आणि तरीही thoughtless, peaceful होण्यासाठी परत साधना कोणत्या कराव्यात, कशा कराव्यात याच्या विचारांची भर टाकतो. मनाचा हा चतुरपणा सहसा लक्षात येत नाही.

आपला मी म्हणजे आपला पूर्व माहिती संग्रह, सर्व संकल्पना त्या बाबतचे सर्व विचार आहेत आणि त्या सर्व विचारांचा प्रतिनिधी असलेला मी हा विचारांपासून वेगळा होवू शकत नाही. 

वरील सर्व गोष्टी टाळता येत नसतील, बंद करता येत नसतील तर आपण फक्त जीवनावश्यक काय आहे आणि अनावश्यक - अवांतर काय आहे याचा शोध घ्यावा. मी म्हणजे नेमके काय आहे याचा शोध घ्यावा. 

आपला नशिला मी तसे करू देत नाही. नशा सुरू करता येतात पण बंद करणे मी ला जमत नाही. नशा सोडणे जितके अवघड आहे तितके मी पण सोडणे अवघड आहे, परंतु अशक्य नक्कीच नाही. जो जीव ते सोडल्या नंतरचे हलाहल अवस्थेचे प्राशन करतो तोच शिव होतो.





Sunday, June 13, 2021

विश्वाचे आर्त - २

 


विश्वाचे मूळ अधिष्ठान

प्रश्न: जे अज्ञात तत्व आहे त्याला पारंपरिक तत्वज्ञानाने निर्गुण, निराकार, विश्वाचे अधिष्ठान, ब्रम्ह असे संबोधले आहे. 

कृष्णमूर्ती: नाही, आपणच मला सांगितले होते की जे अज्ञात आहे ते विचारांनी तयार केलेले नाही, म्हणून त्याला आपण अज्ञात असे म्हणतो. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही विचारांच्या आधारे अज्ञाताचा शोध घेऊ शकत नाही. एकजण कृष्णाला भजतो, दुसरा जिजस, तिसरा मुहम्मद, बौद्ध, महावीर, नानक अशांचे पाठीराखे वेगवेगळ्या मान्यता मानतात, आणि ते एकमेकांच्या दैवतांचा तिरस्कार करतात. ज्यांनी जीजस यांचे नाव ऐकले नसेल त्यांना त्याचा अनुभव येत नाही, तीच गोष्ट इतर प्रेशीतांची. एक विचारी मनुष्य म्हणून मी सर्व श्रद्धा स्थानांचा विचार करीत नाही. 

प्रश्न: जगतील बहुतेक धर्म असे सांगतात की जो विश्वाचा मूळ आधार आहे तो ईश्वर आहे आणि तो निर्गुण, निराकार, ब्रम्ह असून अनुभवात येत नाही मग आपण काही वेगळे सांगत आहात काय?

कृष्णमूर्ती: त्यांची चतुराई आपल्या लक्षात येत नाही. ते एकीकडे असे सांगतात की ते जे काही अज्ञात आहे त्याचे शब्दाने वर्णन करता येत नाही आणि दुसरीकडे त्या अज्ञाताची वर्णने करण्यासाठी असंख्य ग्रंथ लिहितात! ग्रंथात लिहिल्या प्रमाणे आपला मी ते जाणण्याचा प्रयत्न करतो ते सुद्धा विचारानेच ना? ते जे असिमित अज्ञात आहे ते ग्रंथ कर्ता आणि वाचक यांच्या संकुचित विचारा मध्ये येवू शकेल काय? 

प्रश्न: मग आपण त्या बद्दल विचारच करू नये काय?

कृष्णमूर्ती: आपण सर्व धर्माचा अभ्यास केला आहे, सर्व शोधण्याचा प्रयत्नही केला आहे परंतु ते सर्व फक्त शब्द आहेत. जिज्ञासू माणूस म्हणून मला ते शोधणे भाग आहे. मानवी मेंदू हजारो वर्षे झाले तो कधी हिंदू होतो, कधी मुस्लिम, कधी ख्रिश्चन असतो परंतु या सर्वांचे मूळ श्रद्धा आहेत, त्याचे वरील आवरण वेगळी आहेत परंतु आतमध्ये सर्व श्रद्धा आहेत. 

डीबी: म्हणजे या सर्व धार्मिक श्रद्धाच्या विचाराद्वारे हे विश्वाचे मूळ अधिष्ठान नावाचे खूळ मानवी मेंदूमध्ये पेरले गेले आहे. धर्म, धार्मिक ज्ञान आणि विचारांच्या माध्यमातून आणि इतर विविध मार्गांनी लोकांनी निर्माण केलेली ब्रम्ह हि केवळ कल्पना आहे आणि प्रत्यक्षात तसे काहीच नाही असेच ना?

कृष्णमूर्ति: नक्कीच. मग अशा काल्पनिक ब्रम्ह आणि मानवी मनामध्ये काही संबंध असावा काय? 

DB: मानवी मन हे एक भ्रम आहे आणि वैश्विक आधाराची कल्पना असलेले ब्रम्ह हे त्या मनाचा भ्रम आहे. 

कृष्णमूर्ती: हिंदू असे म्हणतात की देव तुमच्यात आहे, जे सर्वोच्च तत्व आहे ते ब्रह्म तुमच्यात आहे, ही एक सुंदर कल्पना आहे. मी त्या सर्व शब्दांच्या प्रकारातून गेलो आहे.

आपले मन हे सर्व भ्रमाचे मूळ अधिष्ठान आहे, मन हे सर्व मानसिक कल्पनांचे केंद्र आहे. हे केंद्र सर्व गैरवर्तन, सर्व मानसिक निष्कर्ष, सर्व भ्रम, सर्व साधना, सर्व प्रयत्न, सुख दु:ख यास हे मनाचे मी नावाचे केंद्र कारणीभूत आहे. या मनाचा भ्रम निरास होणे अत्यावश्यक आहे. मनाचा विस्फोट होवून त्यामध्ये त्याचा विनाश होणे गरजेचे आहे. हजारो वर्षांच्या मानवी प्रयत्नाने ते गेले नाही. 

जसा चांगुलपणा आणि वाईटपणा यांचा सुतराम संबंध नसतो तसे प्रत्यक्ष जीवन आणि मानसिक कल्पना यांचा काहीच संबंध नसतो.

( उदाहरण: नदी सारखे नैसर्गिक प्रवाही आपले जीवन असते. आपण विचार करून त्या नैसर्गिक नदी प्रवाहावर ज्ञानाचे पुल बांधतो. पूल इतका सोईचा होतो की आपण मूळचा नदी प्रवाह विसरून जातो. पूल हा कधीच नदीस स्पर्श करीत नाही म्हणजे वैचारिक / मानसिक जीवन हे कधीच नैसर्गिक जीवन समजून घेत नाही.

ज्यावेळी नदीस महापूर येतो तेव्हा ती नदी जसा तो पुल ढासळून टाकते तसे आपल्या जीवनात वादळे आली की आपल्या सर्व मानसिक सुरक्षेच्या कल्पना ढासळतात आणि आपण उघडे पडले जातो. त्या अवस्थेत नैसर्गिक जीवनाचा अर्थ कळू शकेल.)

डीबी: होय, जर आपण असे म्हणत असाल की एका अर्थाने मी चे केंद्र हा एक भ्रम आहे आणि जे सत्य आहे त्याच्याशी भ्रम संबंधित असू शकत नाही कारण भ्रमातील सामग्रीशी जे सत्य आहे त्याचा काही संबंध असू शकत नाही.

कृष्णमूर्ती: तेच, ते तसेच आहे. हा एक खूप महत्वाचा शोध असल्याचे पहा. मी ला त्या मूळ अधिष्ठान याच्या बरोबर संबंध प्रस्थापित करायचा आहे. मी नामक छोट्या गोष्टीला त्या विशालतेशी संबंध जोडण्याची इच्छा आहे. ते होवू शकत नाही.

डीबी: होय, ते ब्रम्ह केवळ त्याच्या विशालतेमुळेच नाही तर खरं तर ती गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीच. 

कृष्णमूर्ती: एखादे गंभीर असणारे मानवी मन जे अनेक वर्षांपासून भ्रमात जगत होते त्याला जर या सत्याचे आकलन झाले तर त्याचा विस्फोट होवून त्या मनाचा विनाश होवू शकतो. 

प्रश्न: विज्ञान सुद्धा असे सांगते की मन हि एक कल्पना आहे, भ्रम आहे.

कृष्णमूर्ती: नाही, विज्ञान असे म्हणते की आम्ही भौतिक जगताचे संशोधन करीत भविष्यामध्ये जगाच्या उत्पत्तिकर्त्याचा शोध लावू शकू. शास्त्रज्ञ म्हणतात, 'या सगळ्या पलीकडे काही आहे की नाही हे शोधण्यासाठी आम्ही पदार्थ, मानवी मेंदू आणि त्या सर्वांचा अभ्यास करीत आहोत.' 

प्रश्न: ईश्वर आहे अथवा नाही हे समजल्या शिवाय त्याला नाकारून फारसा फरक पडताना communist देशात दिसत नाही.

डीबी: जोपर्यंत मनाचे केंद्र असेल आणि त्या केंद्रात गोंधळ असेल तोपर्यंत आपण ते मन योग्य मार्गाने वापरु शकत नाही.  मला वाटते की हे सांगणे अधिक अचूक होईल की त्या गोष्टींमध्ये एक महान संभावना होती परंतु जोपर्यंत त्याचा केंद्रावर परिणाम होत नाही तोपर्यंत ते सर्व निरर्थक आहे.

कृष्णमूर्ती: जर आपले मन त्याच्या सर्व मानसिक संकल्पना, सर्व मानसिक श्रद्धा सोडू शकले तर तेच मूळ आधार बनू शकते नवीन समाज रचना करण्यासाठी. 

डीबी: होय. मला असे वाटते की आपण असे म्हणू शकतो की आपण पूर्व ज्ञानाद्वारे जे अज्ञात शोधत असतो ते पूर्व ज्ञान हेच आपल्या मार्गात अडथळा बनत असते.

कृष्णमूर्ती: जीवनावश्यक तांत्रिक ज्ञान मिळविण्या ऐवजी मानवाने अनावश्यक धार्मिक ज्ञान संकल्पना का बनविल्या असाव्यात? 

David Bohm: असे दिसते की अनावश्यक ज्ञानाच्या द्वारे एका अभेद्य भ्रामक ब्रम्ह वस्तूची निर्मिती मुद्दाम केली गेली असावी. 

कृष्णमूर्ती: याचा अर्थ प्राचीन संत, तत्ववेत्ता, यांनी आपणास ज्ञान दिले आणि त्या ज्ञानाद्वारे कपोकल्पित अज्ञात ब्रम्ह शोधण्यासाठी आपणास प्रोत्साहित केले?

प्रश्न: समाजा मधून अंधश्रद्धा कमी करण्यासाठी तसे मुद्दाम केले असावे काय?

कृष्णमूर्ती: नाही. छोट्या अंधश्रद्धा घालविण्यासाठी कोणी मोठ्या ब्रम्हश्रद्धा तयार करणार नाही.

डीबी: आता तुम्ही आधी जे बोललात ते म्हणजे मन हेच मूळ भूमी आहे, तेच अज्ञात आहे.

कृष्णमूर्ती: होय मन हीच मुळभुमी आहे परंतु ते मन वेगळे आहे. ज्यावेळी आपले मन पूर्वीच्या सर्व संकल्पनांचा अंत करते तेव्हा ते नवीन मन बनते. .

डीबी: होय. ते स्पष्ट आहे. जुने मन हेच त्याची सामग्री आहे आणि मनाची सामग्री हे त्याचे ज्ञान आहे आणि पूर्वज्ञाना शिवाय असलेले मन हे नवीन मन आहे.











Saturday, June 12, 2021

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले


विश्वाचे मूळ अधिष्ठान

Dr David Bohm: या विश्वाच्या मूळ आधाराचे स्वरूप काय असावे? आणि ते जे काही असेल त्याचा मानवामध्ये काही रस असावा का? त्याच्यामुळे मानवाच्या वर्तनात बदल होण्याची शक्यता आहे काय?

कृष्णमूर्ती: विश्वाचा मूळ आधार असावा ही केवळ कल्पना आहे काय? एक भ्रम आहे काय, एक तत्वज्ञान आहे काय? किंवा, ज्या अर्थाने ते मूळ आधार आहे त्यापलीकडे परत दुसरे काही नाही ना? याचा तपास करावा लागेल. 

डीबी: होय, मूलभूतपणे आपण असे म्हणतो की जे काही सत्य असेल ते मूलतः अज्ञात आहे. म्हणून आपण पूर्व ज्ञानापासून सुरुवात करू शकत नाही. अज्ञाताचा शोध घेण्यास अज्ञाता पासून प्रारंभ करायला हवा.

कृष्णमूर्ती: एखाद्याचे मन जे पुरातन ज्ञानाद्वारे विकसित झाले आहे, ज्यास त्या ज्ञानाने अत्यंत शिस्तबद्ध केले आहे ते मन हे कसे जाणू शकते? कारण ते जे काही अज्ञात असावे ते पूर्व ज्ञान असू शकत नाही, ते विचारांनी सुद्धा आकलन केले जावू शकत नाही.

ते जे काही अज्ञात आहे, जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा भ्रम आहे, जोपर्यंत इच्छा, आनंद, भीती आणि या अशा सर्व मी च्या गोष्टीं आहे तो पर्यंत अज्ञाताला स्पर्श करता येत नाही. याचा अर्थ मूळ अधिष्ठान ही एक केवळ कल्पना आहे काय? किंवा ते असे काहीतरी असावे ज्याचा तपास केला जाऊ शकत नाही, ते नेहमी अज्ञातच राहील?

आपली मने पूर्व अनुभवाद्वारे आणि पूर्व ज्ञानाने संस्कारित, अनुशासित केली आहेत आणि अशी मने त्या ज्ञात ठिकाणीच कार्य करू शकतात, ती मने अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील काय? आणि समजा एखादा असे सांगू लागला की, मूळ अधिष्ठान ही केवळ कल्पना नाही, ते तात्विक संकल्पना नाही, ते विचारांनी एकत्र केले जाऊ शकत नाही किंवा ते विचारांनी आकलन केले जाऊ शकत नाही. तर जिज्ञासू माणूस या गोष्टीची कशा प्रकारे अनुभूती घेवू शकतो, त्यास कसा स्पर्श करू शकतो किंवा ते कसे समजून घेवू शकतो?  

शब्द ते व्यक्त करू शकत नाहीत, त्यामुळे गुरु आणि त्यांचे ग्रंथ उपयोगाचे नाहीत. मग आपल्याकडे असे तंत्र असले पाहिजे जे सर्व प्रकारच्या ज्ञात ज्ञानापासून आपणास मुक्त करेल. मी प्रयत्न करेन असे म्हणावे तर तेही स्वार्थी इच्छेतून जन्माला येते. 

मग मी काय करावे? मला वाटते हा साधारण प्रश्न नाही. हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे.  

मी या प्रश्नाकडे कसे जाऊ? मला ते अव्यक्त आणि अज्ञात शोधायचे आहे. माझ्या मते जे जीवनाला अर्थ देते, जीवनाचा आधार आहे ते शोधणे, समजणे याचे मानवी जीवनात अपार महत्व आहे.

डीबी: मानव समाजाने जे जीवनाला महत्त्व देते तिथे देवाची कल्पना वापरली आहे.

कृष्णमूर्ती: नाही, नाही. देव हि फक्त एक कल्पना आहे, ती आपल्या मनाची कल्पना आहे, मनाची कल्पना मधून मन मुक्त नाही होवू शकत. आपण सांगता की ते जे काही अज्ञात आहे ते विचारांनी तयार केलेले नाही. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मानसिक कल्पनांच्या आधारे अज्ञाता पर्यंत येऊ शकत नाही. एक प्रामाणिक, विचारवंत माणूस म्हणून मी हे सर्व सर्वस्वी नाकारतो.

कारण सर्वप्रथम देव हे सर्वश्रुत, श्रद्धा आणि म्हणून ते सामान्य ज्ञान झाले आहे. सामान्यतः सगळेच तसे श्रद्धेने देव मानतात, तेथे त्यात इच्छा, आशा, भीती यांनी निर्माण केलेल्या भ्रमाची एक मोठी भावना आहे.

( कृष्णमूर्ती आणि Dr David Bohm यांच्या मध्ये १९८० साली Ojai, California येथे झालेली चर्चा )

क्रमशः…..


Wednesday, June 09, 2021

मृत्यूचा अंत !!!

अंतर्दृष्टि इच्छाशक्तीद्वारे, साधनेद्वारे, कोणत्याही प्रकारच्या मानवी प्रयत्नातून तयार केली जाऊ शकत नाही. तशी ती शक्यताच नाही. आपण ते सर्व करून पाहिले आहे. आपण पाहिले आहे की काही लोकांकडे ही अंतर्दृष्टी सहज नैसर्गिक असते आणि मग ती इतरांना ती सहज, नैसर्गिकरीत्या का मिळत नाही?

कृष्णमूर्ती: समजा क्ष या व्यक्तीकडे अंतर्दृष्टी आहे. ती त्यालाच का प्राप्त होते?

David Bohm: बहुतेक सर्वच नैसर्गिक रित्या पशुवृत्तीचे असतात. आणि ते समजतात की त्यांचा दुसरा सहकारी क्ष हा अप्राकृतिक आहे. म्हणून मानवजात नेहमी असा विचार करते की जर खरोखरच काही लोक असे वेगळे असतील तर ते खूपच असामान्य आणि दैवी असले पाहिजेत.

कृष्णमूर्ती: तेच. बहुतेक मानव हे द्वेषाद्वारे द्वेषाला प्रतिसाद देत असतात. म्हणून ते जेव्हा वेगळी क्ष सारखी व्यक्ती पाहतात ते त्यांना नैसर्गिक किंवा तर्कसंगत दिसत नाही. क्ष् कडे अंतर्दृष्टी आहे आणि त्यामुळे त्याच्या जीवनातील अंधकार आणि त्या अंधाराचे केंद्र असणारा मी आणि अहंकार पूर्णपणे दूर झाले आहेत. आणि दुसरा एक गंभीर, प्रामाणिक, हुशार माणूस, त्याचे म्हणणे ऐकतो आणि क्ष जे काही सांगितले ते त्याला अतिशय वाजवी, तर्कसंगत आणि शहाणपणाचे वाटते. तो तसे वागण्याचे ठरवितो, काही साधना करतो परंतु ते सर्व विचार असतात आणि जोपर्यंत अंतर्दृष्टि येत नाही तोपर्यंत ते सर्व मिच्या अंधारात घडत असते. 

ज्याच्या जवळ अन्तरदृष्टी नाही त्याच्या जवळ काहीच पर्याय रहात नाही काय? 

त्याने त्याच्या जीवनात अंधकार कशामुळे आहे हे शोधले पाहिजे. आपले विचार हेच आपला मी आहे, मी हा भास आहे आणि या भासरुपी मी चे विचार हेच मिच्या अंधकारास जबाबदार आहे हे मीच्या लक्षात येत नाही. मी ला हे का समजत नाही? 

आपला मी हाच आपल्या जीवनातील अंधकारास जबाबदार आहे हे समजणे हि सत्य आकलनात येण्यासाठी खूप महत्वाचा टप्पा आहे. 

ज्यावेळी X इतरांना सांगतो की प्रत्यक्षात अंधकार नाही, तो अंधकार आपल्या मिने त्याच्या विचारांनी बनविलेला आहे. मीने बनविलेल्या सर्व संकल्पना केवळ मानसिक आहेत. हे ऐकल्या नंतर ज्यांच्या मनात स्फोट होतो त्याच क्षणी त्यांच्या मि ने बनविलेल्या संकल्पना डळमळीत होवू लागतात. मी चे विचार, मी च्या संकल्पना असतात. संकल्पना नाहीशा झाल्या तर मी चे अस्तित्व धोक्यात येते. X ने केलेला बोध हा मूलभूत सत्य असेल तर त्याने इतरांच्या मनाची घडी विस्कटून टाकण्यास मदत होते.

मी माझ्यातील अंधार दूर करण्यास काही करू शकत नाही परंतु जेव्हा X त्याच्या अंतर्दृष्टिचा इतरांना बोध करतो त्या प्रकाशात मी चा अंधार नाहीसा होतो. 

मी चे विचार, मी च्या अनावश्यक संकल्पना नाहीशा झाल्याने ती व्यक्ती नैसर्गिक पातळीवर येते. या पातळी वरील जीवनात अंधार नसतो की प्रकाश नसतो. त्याला आदि आणि अंत नसतो. त्या जीवना मधील चैतन्याची विभागणी नसते, द्वैत नसते. काळ नसतो, अंतर नसते, काहीच नसते. परंतु तीच काहीच नसण्याची अवस्था संपूर्ण ऊर्जेची असते. जे कालातीत आहे तेच अमर सुद्धा आहे. मी च्या मानसिक संकल्पनांचा अंत म्हणजे मी चा मानसिक अंत, मानसिक मृत्यू असतो. 

कसलाही संघर्ष नसलेल्या मेंदूची अवस्था काय असेल? त्या मनाची गुणवत्ता काय असेल ज्यामध्ये कोणतीही अडचण नसेल? समजा असे मन शुद्ध प्रदूषण रहित हवेमध्ये रहात असेल, योग्य प्रकारचे अन्न घेत असेल तर ते जास्त वर्षे सहज, नैसर्गिकरीत्या जगू शकत नाही का?

किती विलक्षण गोष्ट घडली आहे! याचा माझ्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होईल, कारण मला या पृथ्वीवर जगायचे आहे ना? पूर्वी माझे दैनंदिन जीवन म्हणजे आक्रमकता, सतत काहीतरी मिळविण्याचा प्रयत्न करणे, यशासाठी धडपडत - त्या सर्वाचा अंत झाला आहे.





Monday, June 07, 2021

मी ची खरी ओळख

आपल्या मी ची ओळख हीच आपली ओळख

अध्यात्मिक साधना करणाऱ्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीची ओढ असते. आत्मसाक्षात्कार म्हणजे मी नेमका कोण आहे याचा साक्षात्कार करणे होय. 

जीवनातील असंख्य समस्यांचे कारण सुद्धा मी चे अज्ञान हेच असते. त्यामुळे मी चे आकलन हा आपल्या जीवनातील एक फार मोठा शोध ठरतो. 

अध्यात्मिक शास्त्र या विषयी असे सांगते की मी देह नाही, मी मन नाही आणि त्याही पलिकडील मी आत्मा आहे. त्यालाच इतर काही spirit, soul असेही समजतात. वैयक्तिक आत्मा आणि वैश्विक परमात्मा अशा त्या संकल्पना आहेत. गीता आणि इतर अनेक धर्म ग्रंथात याची वर्णने आहेत. 

मी म्हणजे आत्मा आहे हे शास्त्रांनी सांगितल्या मुळे सर्वजण आत्म्याचा शोध घेत राहतात, त्या एकाच मार्गाने जातात. मी चा शोध करण्यासाठी आणि त्याचा साक्षात्कार साठी अनेक साधना कराव्या लागतात, ध्यान करावे लागते, अभ्यास करावा लागतो. असा शास्त्रांनी आपला पक्का समज करून ठेवला आहे.

कृष्णमूर्ती यांनी मी म्हणजे नेमके काय आणि तोच कसा द्रष्टा आणि दृष्य आहे हे सप्रमाण सिद्ध केले, कोणत्याही गुरु, संप्रदाय आणि साधने शिवाय. आणि त्यांनी नंतर जगभर स्वतःच्या अनुभवाचा प्रचार केला. आपणही मी चा साक्षात्कार कोणत्याही साधने शिवाय करून घेवू शकतो. फक्त आकलन आणि बुद्धिमत्ता याची थोडी आवश्यकता आहे.

कृष्णमूर्ती यांनी मी म्हणजे आपला भूतकाळ आहे, आपल्या स्मृतीचा प्रतिसाद आहे असे सांगून तोच आपला संपूर्ण पूर्व माहिती संग्रह आहे, तोच आपला पूर्वग्रह आहे, तोच काळ आहे, तोच विचार आहे, तोच द्रष्टा आहे आणि तोच दृष्य आहे हे सतत प्रतिपादन केले आहे. हे सर्व त्यांच्या भाषणातून अनेकदा ऐकून सुद्धा मी नेमका सापडणे अवघड असते.

एकदा मी स्वतः अनुभव म्हणजे नेमके काय असते आणि अनुभवाच्या एक एक पायरीचे आकलन करताना वरील सर्व गोष्टी मला त्या मध्ये एकत्रित दिसल्या आणि मी माझ्या परीने मी चा शोध लावला आहे. आपण प्रत्येक जण त्याची शहानिशा करू शकता. स्वीकारणे अथवा न स्वीकारणे पेक्षा याचे फक्त आकलन होणे खूप महत्वाचे आहे.

सत्य हे नेहमी अज्ञात असते आणि जे ज्ञात आहे ते सत्य नसते या साध्या कसोटीवर कोणतेही पारंपरिक शास्त्रे आणि त्यांचे ज्ञान हे ज्ञात असल्यामुळे ते सत्य नसते हे मान्य करणे अवघड जाते. याचे कारण श्रद्धा असतात. श्रद्धा या सत्य संशोधनातील सर्वात मोठा अडसर आहे हे बहुतेकांच्या लक्षात येत नाही. 

आता आपण कोणतीही कल्पना न करता शास्त्रशुध्द रित्या आपल्या मी चा शोध घेऊया. आपले शरीर स्वतःच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी सतत अनुभव घेत असते. अनुभव करताना नेहमी दोन घटक असतात, एक अनुभव घेणारा मी असतो आणि दुसरा अनुभवात येणाऱ्या घटना असतात. अनुभव करणारा जो मी असतो त्याला द्रष्टा संबोधले जाते आणि तो जे काही अनुभव करीत असतो ते त्याचे दृष्य असते. 

आपण एक झाड पहात आहोत या साध्या आणि सोप्या अनुभवाचा उदाहरणासाठी उपयोग करूया. आपण जेव्हा झाड पहात असतो तेव्हा प्रत्यक्ष डोळे झाड पहात असतात. डोळे कॅमेरा प्रमाणे झाडाची प्रतिमा काढतात आणि ती प्रतिमा ते मेंदूकडे पाठवितात. मेंदूकडे आलेली झाडाची प्रतिमा मेंदूच्या स्मृतीमध्ये साठविली जाते. स्मृतिमधून हा अनुभव विषद करण्यासाठी एक विचाराची प्रतिक्रिया निर्माण होते. ही प्रतिक्रिया म्हणजे आपला मी असतो. मी हा स्मृतींचा प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद विचारांच्या माध्यमातून व्यक्त होतो. हाच मी म्हणजे द्रष्टा असतो. हा मी स्मृती मध्ये असल्यामुळे तो प्रत्यक्ष झाड पाहु शकतं नसतो. तो नेहमी स्मृतीमधील साठविलेल्या प्रतिमा / माहिती पहात असतो. द्रष्टा असणाऱ्या मी चे दृष्य हे नेहमी स्मृती मधील माहिती असते. 

द्रष्टा मी हा स्मृतींचा प्रतिसाद असतो तर स्मृती मधील माहिती म्हणजे दृष्य असते. या अर्थाने द्रष्टा आणि दृष्य हे स्मृतीचे भाग असतात, ते दोन्ही स्मृती असतात, म्हणून ते दोघे एक असतात.

प्रत्यक्ष झाड आणि आपण वेगळे आहोत परंतु मानसिक अनुभव मध्ये दोन्ही एक आहेत, यालाच भ्रम म्हणतात

वर्तमान काळातील दृष्य हे स्मृतीमधील मिला समजे पर्यंत ते भूतकाळ झालेले असते. याचाच अर्थ आपला मी हा स्वतः भूतकाळात जन्मत असतो आणि तो भूतकाळातील स्मृती मधील माहिती अनुभव करीत असतो. आपले सर्व अनुभव हे प्रत्यक्ष नसतात ते काही कालांतराने आपणास समजतात. 

मी चे हे सत्य स्वरूप खरोखर आकलन झाले तर त्याच्या बद्दलच्या अनेक भ्रामक कल्पना आपोआप गळून पडतील. मी हा एक तात्पुरता विचार आहे, तो भ्रम आहे, तो जे काही विचार करतो ते सर्व भ्रम असू शकतात. जे काही तथ्य असते त्याचा खरे तर विचार करावा लागत नाही परंतु मी नामक विचार स्वतःस जिवंत ठेवण्यासाठी सतत नवनवीन कल्पना लढवीत राहतो आणि त्या सतत चर्वण करीत राहतो. 

मी च्या मानसिक कल्पनामध्ये अडकलेला मानव यामुळे जीवना मधील सत्य समजू शकत नाही.

मी चे यथार्थ आकलन झाले तर भ्रामक मी ने बनविलेल्या त्याच्या आत्मा, परमात्मा, ईश्वर, धर्म, देश आदि असंख्य भ्रामक कल्पनांचा निरास होवू शकतो. आणि मनाचे भ्रामक पण लक्षात आले की त्याच्या सर्व मानसिक संकल्पना शुन्यवत होतात, त्या बरोबरच आपले जीवन नैसर्गिकरीत्या यथार्थ होते, परिपूर्ण होते, पूर्णत्व प्राप्त होते. 

@ vitthal@viyoddha.com

Sunday, June 06, 2021

तथ्य, भ्रम आणि सत्य

विश्व आणि विश्वातील सर्व सजीव निर्जीव हे जसे तथ्य आहेत तसेच तथ्य म्हणजे मानवी युद्ध आहे. बरोबर? मनुष्य हिंसक आहे ही वस्तुस्थिती आहे. तथ्य म्हणजे राष्ट्रा राष्ट्रातील विभागणी, राजकीय विभागणी, धार्मिक विभागणी, वैचारिक विभागणी आहे.  बरोबर?  तुम्ही आणि मी - विभागणी आली, स्त्री आणि पुरुष - विभागणी आहे. आणि वस्तुस्थिती अशी आहे की जेथे विभाजन आहे तेथे संघर्ष आहे. यहूदी - अरब, मुस्लिम -  हिंदू इत्यादी. तर जेथे विभाजन आहे तेथे संघर्ष आहे. ते एक सत्य आहे. तो एक नियम आहे. बरोबर?

प्रत्यक्षात जे काही चालले आहे किंवा प्रत्यक्षात काय आहे ते सर्व तथ्य असते. या तथ्यांवरून आपण जे निष्कर्ष काढतो, आवड आणि नापसंत ठरवितो जरी ते वास्तविक दिसले तरी ते भ्रम असतात.

विचारांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट वास्तविक आहे. विचारांनी हा मंडप तयार केला आहे. मंडप एक वास्तव आहे. विचारांनी हा मायक्रोफोन तयार केला आहे. तो वास्तव आहे. विचारांनी विविध भ्रम आणि संकल्पना निर्माण केले आहेत, ते सर्व वास्तविकता आहे. जे काही विचार निर्माण करते ते सर्व वास्तविकता असते - इमारत, तांत्रिक गोष्टी ज्या विचारांती तंत्रज्ञानाने तयार केल्या आहेत - संगणक, दूरदर्शन इत्यादी. विचारांनी निर्माण केलेले भ्रम यासह विचारांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट वास्तविकता आहे. राष्ट्रीयत्व हा एक भ्रम आहे. आणि देव हा सुद्धा एक भ्रम आहे, विचारांनी ते सर्व निर्माण केले आहेत.

परंतु विचारांनी निसर्ग - झाड, बाहेरील गोष्टी तयार केल्या नाहीत.  बरोबर?  पण झाडाच्या लाकडापासून बनविलेले खुर्ची ही एक वास्तविकता आहे.  कृपया, लक्ष द्या.  विचारांनी निसर्ग निर्माण केलेला नाही, परंतु झाडा पासून खुर्ची बनविणे हे वास्तव आहे. 

जेव्हा आपणास कोणताही भ्रम नसतो तेव्हाच योग्य कृती होऊ शकते. बरोबर?  जेव्हा भ्रम नसतो, जेव्हा मन सर्व प्रकारच्या भ्रमांपासून मुक्त असते तेव्हाच योग्य कार्य होऊ शकते. ते स्पष्ट आहे.  मी मनोरुग्ण असल्यास मी योग्यरित्या वागू शकत नाही. ते स्पष्ट आहे. मी संभ्रमित असल्यास मी योग्य वागू शकत नाही. मी त्याच्या निष्कर्षांद्वारे एखाद्या पूर्वग्रहाच्या विशिष्ट प्रकारात अडकल्यास मी योग्य रीतीने वागू शकत नाही. दैनंदिन जीवनात, योग्य मार्गाने वागण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा भ्रम आहे तोपर्यंत योग्य कृती शक्य नाही.

तर सत्य जे काय आहे ते असे वसंत ऋतू सारखे, फुलांसारखे, पाण्यासारखे सहज वाहणारे होऊ द्या. जेव्हा मनाने सर्व काही जे अव्यवस्थित होते ते सर्व व्यवस्थित केले असेल तेव्हाच ते येऊ शकते. बरोबर?

अजून एक प्रश्न होता: मनुष्य आणि निसर्गाचा काय संबंध आहे? 

विचारांनी मनुष्य निर्माण केलेला नाही.

मग माणसाचा निसर्गाशी काय संबंध आहे? मनुष्य त्याने निर्माण केलेल्या भ्रमात राहिला तर त्याचा निसर्गाशी काही संबंध नाही. पण भ्रम नसलेला माणूस, ज्याने विचारांनी काय निर्माण केले आहे हे पाहिले आहे तो मनुष्य सर्व विचार त्यांच्या योग्य जागी ठेवतो, मग त्याचा निसर्गाशी संबंध आहे. 

मला आश्चर्य वाटेल जर आपणास हे समजले तर.