Saturday, September 08, 2018

वास्तवतेचे मृगजळ


मन म्हणजे विचारांच्या न संपणाऱ्या शृंखला होत. विचारांच्या शृंखलांना मन हि संज्ञा दिली गेली आहे. मनास अस्तित्व नाहि, जे काहि चैतन्य जाणवते ते केवळ विचार होत. विचारांचे मुळ शोधले असता आपण आवाजाच्या स्पंदना पर्यंत जातो. तर स्पंदने हि ऊर्जाशक्तिचे आविष्कार आहेत. ऊर्जाशक्तिच्या स्पंदनांचा म्हणजे जिवनऊर्जेचा ऊपयोग करून सजिव जिव आपल्या जीवनावश्यक गोष्टि मिळवीत असतात व प्रजोत्पादन करत असतात. मानवी ऊत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये मनुष्य प्राण्याने या ऊर्जेच्या स्पंदनांचा भाषेमध्ये रूपांतरण केले व त्याच्या भाषा संवादाच्या प्रभुत्वाने म्हणजेच त्याच्या अधिक ऊच्च विचारांनी त्याने पृथ्वीवर प्रभुत्व मिळविले.

ऊर्जा स्पंदनांना भाषेमध्ये रूपांतरण करून आपण जे विचार करत असतो त्या विचारातुन ‘मी’ चि संकल्पना निर्माण झालेली आहे. जर विचार नसतील तर ‘मी’ सुध्दा नसणार. विचार हे शरीराहुन भिन्न आहेत. शरीर बेशुध्द झाले अथवा मृत झाले तरी विचार जिवंत असतात. कारण विचार हे ऊर्जेच्या स्पंदनांचे वेगवेगळे प्रकार आहेत व ऊर्जेचा विनाश होत नाहि. मृत व्यक्तीचि ऊर्जा स्पंदने हि दुसऱ्या जिवंत मनुष्याच्या संपर्कात येतात व त्यांचा पुढिल प्रवास सुरू राहतो. ऊर्जा स्पंदनांचे विचार हे शरिरास एक वाहन म्हणुन वापरत असतात. विचार हे सुध्दा ऊर्जेच्या स्पंदनास भाषेने दिलेले वेगवेगळी रूपे असतात. जसे एकाच हवेचे बासरीमधुन वेगवेगळे सुर निघतात त्याप्रमाणे एकाच वैश्वीक ऊर्जेच्या स्पंदनामधुन प्रत्येक शरीर वेगवेगळे विचार करत असते.

विचार व शरीर यांच्या संगनमताने मी, माझे आप्तेष्ट, माझा धर्म, माझा देश आदि वेगवेगळ्या संकल्पना निर्माण झालेल्या आहेत. पृथ्वीवरील अनेक आपत्ती व त्यामधिल अनेक जडणघडणीमुळे अपघाताने जिव निर्मिती झाली आहे. अनेक वनस्पती व अनेक प्रकारचे प्राणि निर्माण झाले व त्यामधिल एक मानव प्राणी आहे. मानव प्राण्याने भाषा निर्माण केली व या भाषेच्या माध्यमामुळे त्याचि अफाट वेगाने भौतिक प्रगती झाली. भौतिक प्रगती बरोबरच अफाट मानसिक कल्पना तो रंगवु लागला. देवता, राक्षस, भुते, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य हे त्याच्या अफाट मानसिक कल्पनांचे आविष्कार आहेत.

बोलाचिच कढि व बोलाचाच भात या ऊक्तिप्रमाणे विचारां मधुन जन्मलेल्या सर्व कल्पना या असत्य आहेत त्यांचा वास्तवाशी काहिहि संबंध नाहि. शरिर हे सुध्दा पृथ्वीतलावरील एक अपघात आहे. शरीर व मन हे ज्या ऊर्जेमधुन निर्माण झाले आहेत ती ऊर्जा अविनाशी आहे परंतु तिला ना शरीर आहे वा ना मन आहे, तिथे काहिहि अनुभवगम्य नाहि. अशा अवस्थेमध्ये आपण समाजामध्ये समाजाच्या नियमांप्रमाणे राहुन कालव्यतीत करण्याहुन तरणोपाय नाहि. सर्व आशा आकांक्षा, वासना नाहिशा झाल्याने भिती नाहिशी होते व आपण आपले आयुष्य निर्धोकपणे जगु शकतो. ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान हे संतांचे वचन याच सत्याचि साक्ष आहे. नवनविन वैज्ञानीक संशोधना मुळे जे ज्ञान आज विकसीत झालेले आहे ते पुर्वी संतांना उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांचि अनुभुती हि त्यावेळच्या ज्ञानावर आधारीत होती त्यामुळे ते चुकिचे होते कि काय असा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

No comments:

Post a Comment