Monday, May 21, 2018

सहज अवस्था

सहज अवस्था हि अशी अवस्था आहे जिला कोणत्याहि साधनांनी व साधनेने प्राप्त करता येत नाहि. सहज अवस्था प्राप्त करण्याच्या  ईच्छाशक्तीचा व ति अवस्था प्राप्त करण्याच्या प्रत्येक कृतीचा पुर्णपणे अभाव असणे म्हणजे सहज अवस्था होय.

सहज अवस्था प्राप्त होण्यासाठी जे काहि आपण प्रत्यक्षरित्या करतो वा प्रत्यक्षरित्या जाणिवपुर्वक करायचे टाळतो ते दोन्हि प्रयत्न तिथे फोल ठरतात. एखादि वस्तु प्राप्त करण्यासाठी आपण जे काहि करतो वा जे काहि करायचे टाळतो ते दोन्हि ति वस्तु प्राप्त करण्याचि कृतीच असते. अशावेळी मती गुंग होते व काय करावे समजत नाहि.

खरे पाहता हि अवस्था समजणे तसे अवघड नाहि, तसे ते खुप सोपे आहे परंतु आपण ज्या संस्कारामधुन लहानाचे मोठे झालेलो असतो व आपल्या आसपास जे रितीरिवाज पाळले जातात त्या श्रध्दांमुळे हि साधि सोपि गोष्ट आपल्या लक्षात येत नाहि. ज्या गोष्टिचा आपण शोध घेत आहोत तसे काहिहि अस्तित्वात नाहि. समजुन घेण्यासारखे वा ज्ञात करण्यासारखे काहिहि नाहि. भितीपोटि ईश्वराचि निर्मिती केली गेली आहे. सत्तेसाठि, नावलौकिकासाठि व अर्थार्जनासाठि देव, देश, धर्म या कल्पना बनविल्या गेल्या आहेत. आत्मा, परमात्मा या मनाच्या कपोकल्पित गोष्टि आहेत. त्यामुळे आत्मसाक्षात्कार वगैरे सर्व थोतांड आहे. ज्यांनी या गोष्टि आपल्या माथी मारल्या त्यांनी स्वतःस व ईतरांना शतकानुशतके मुर्ख बनविले आहे. मानवी समस्या सोडविण्यासाठि देव, देश, धर्म कुचकामी ठरले आहेत. ऊलट त्यांच्यामुळे मानवानेच मानवाच्या रक्ताचे पाट वाहिले आहेत. आज आपल्या मुलभुत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्यासाठि आपणास देव, देश, धर्म याचि कोठेच आवश्यकता भासत नाहि. केवळ हे ज्यांचे व्यवसाय बनलेले आहेत असे राजकारणी व धर्मकारणि आपल्या मनावर सतत ते बिंबवत राहतात व आपण सत्य असत्याचि शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवतो. देशांचि व धर्मांचि ऊतरंड हि तर मनुष्याने रचलेली आहे हे सर्वांना माहित असायला हवे. देव हा निर्गुण, निराकार, जाणिवे पलीकडिल श्रध्देचा प्रकार आहे त्यामुळे त्याचि शहानिशा कोणि करू शकत नाहि. परंतु जो अज्ञात आहे तो ज्ञात होणे असंभव आहे त्यामुळे त्याचि भिती कशासाठि? जो अज्ञात आहे त्याच्या ज्ञानावर काहि बोलणे, एैकणे, लिहिणे वा वाचणे हे सर्व अर्थात काल्पनीक असणार आहे.

भितीपोटि, गरजेपोटि, व्यवसायासाठि, सत्तेसाठि अज्ञात देवांचा वापर सुरू झाला, त्यातुन धर्म निर्माण झाले व देश निर्माण झाले. अज्ञात दैवी शक्तिचा अनुभव घेण्याचि मानवी मनास ईच्छा निर्माण झाली व त्यासाठि गुरू व त्यांच्या साधना निर्माण झाल्या. जे मुळात अज्ञात आहे त्याचा अनुभव घेण्याच्या अट्टाहासापोटि मन बळि पडु लागले. शारिरीक व मानसीक क्रियाकलापामुळे मनास वेगवेगळे भास होत जातात व अशा साधनांवर व त्या साधना शिकविणाऱ्या गुरूवर विश्वास बसु लागतो. हजारांमध्ये एकाला जरी अनुभव आला तरी धंदा चालु राहतो, जुने सोडुन गेले तरी नवीन शेकडो भक्त येतच राहतात. अशा गुरूंमुळे व त्यांच्या साधनांमुळे मनाला नविन खुराक मिळतो, त्याला बरे वाटते मग ते येथे काहिकाळ रमते. जुन्या संप्रदायाचा विट आला कि नविन संप्रदाय, नविन गुरू, नविन मंत्र, नविन साधना हे चालुच राहते. काहितरी केल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होणार नाहि यावर ठाम खात्री असते व ईथेच खरी मेख असते. जोपर्यंत आपण कशावर तरी श्रध्दा ठेवत असतो व त्याअनुसार साधना करत असतो तोपर्यंत सहज अवस्था प्राप्त होत नाहि. आपल्या अस्तित्वामधुन जोपर्यंत सर्व श्रध्दा, सर्व साधना निघुन जात नाहित तोपर्यंत आपले अस्तित्व शांत होत नाहि व त्याला सहज अवस्था प्राप्त होत नाहि.

- यु जी कृष्णमुर्ती

No comments:

Post a Comment