Saturday, October 31, 2020

अंतर्दृष्टी

ज्ञान प्राप्तीसाठी आपल्या मेंदूमध्ये काय बदल आवश्यक आहे?

आपल्या मेंदूमध्ये ईश्वरा बद्दल, विश्वाबद्दल आणि स्वतःबद्दल ज्या अफाट कल्पना आहेत त्या प्रथम सोडून द्यायची तयारी हवी. 

कल्पना कोण तयार करते त्याच्या मुळाशी आपण जायला हवे. कल्पना म्हणजे आपल्या मेंदूमधील विचारांचा अविष्कार होय. विचार हे विचार असतात ते ज्ञानीयांचे आणि अज्ञानीयांचे वेगळे असतात असे नाही. जिज्ञासा निर्माण होणे हे खूप चांगले लक्षण आहे परंतु जिज्ञासा ही ब्रह्मजिज्ञासा आहे की भीतीपोटी निर्माण झालेली जिज्ञासा आहे हा मूलभूत फरक आहे. 

ब्रह्मजिज्ञासा म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे जाणून घेणे होय. मीच ब्रह्म आहे किंवा मी ईश्वराचा अंश आहे अशा आपल्या अहंकारी मनाची ठाम समजून झालेली असेल तर ब्रम्ह आपल्या अहंकारामुळे समजणारच नाही.

संसारात निर्माण झालेले दुःख हे मेंदूतील विचारांच्या अज्ञाना मुळे आपणास भोगावे लागत असतात. अशा दुःखातून मुक्ती मिळविण्यासाठी मेंदूतील विचारांना त्यांच्या अज्ञानातून मुक्त करावे लागते. 

परमात्मा, आत्मा, पुनर्जन्म हे सर्व या परंपरा आणि श्रद्धांनी संमोहित केलेल्या मेंदूतील विचारांच्याच उत्पत्ती आहेत, कल्पना आहेत. हे लक्षात येणे म्हणजे insight आहे आणि ही insight पुढील action साठी कारणीभूत ठरते. 

बाहेर पाण्याच्या टाकी मध्ये भरपूर पाणी आहे, टाकीमधून आपल्या घरामध्ये नळ आलेला आहे, आपणास पाणी हवे आहे परंतु तो नळ आपोआप का चालू होत नाही किंवा चालू केला आणि तो परत बंद करावा लागेल परत चालू करावा लागेल, टाकीतील पाणी संपले तर काय अशा अनेकविध भीतीने आपण नळ चालूच करत नाही. 

परंपरा आणि श्रद्धा आपणास त्यांच्या विरुद्ध प्रश्न निर्माण होऊ देत नाही. 

हि मुळामध्ये निर्माण झालेली विकृती हीच महान संस्कृती आहे असे जनमानसावर हजारो वर्षांपासून ठसवले गेले आहे. त्यामुळे जनमानसांच्या हे अज्ञान सामान्यतः लक्षात येत नाही. आपल्या संकुचित विचारांच्या पलीकडे जाणे हेच त्यामुळे खूप अशक्य झाले आहे. 

जिज्ञासू मनाला प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर ते संस्कृतीने निर्माण केलेल्या संकुचित माहिती मधूनच शोधावी लागतात त्यामुळे जिज्ञासू मन पाप आणि पुण्य या विचारांच्या बाहेर पडू शकत नाही. पाप आणि पुण्यावर आधारित कर्मसंकल्पणा या आपल्या संमोहित मेंदुंच्या उत्पत्ती आहेत. त्यांच्या शिवाय इतर मार्ग शोधण्यास धाडस आवश्यक असते.

Insight अतर्दृष्टी

संसारात निर्माण झालेले दुःख हे मेंदूतील विचारांच्या अज्ञाना मुळे आपणास भोगावे लागत असतात. अशा दुःखातून मुक्ती मिळविण्यासाठी मेंदूतील विचारांना त्यांच्या अज्ञानातून मुक्त करावे लागते. आत्मा, परमात्मा या परंपरा आणि श्रद्धांनी संमोहित केलेल्या मेंदूतील विचारांच्याच उत्पत्ती आहेत, कल्पना आहेत. हे लक्षात येणे म्हणजे insight आहे आणि ही insight पुढील action साठी कारणीभूत ठरते. 

समजा एखादी व्यक्ती अतिशय दुःखामध्ये आहे, दुःख ओसरल्यावर जे काही नुकसान झाले आहे ते नुकसान भरून येणारे नाही, ते कटू सत्य आहे, आता आपणास ते विसरायला हवे, आपल्या सारखे इतर अनेकजण असेच दुःख भोगत असतात हे आकलन होणे, कळणे म्हणजेच अंतर्दृष्टी होय. हे दिसते तितके सहज नसते परंतु ते तेव्हढेच सहज ठेवणे आपल्या हिताचे असते. जीवनातील हे असे कसोटीचे क्षण आपणास सत्याच्या निकट घेऊन जात असतात. 

Insight म्हणजे अतर्दृष्टी कशी काम करते?

आपण हे असे प्रसंग सहज का घेत नाही? कुटुंब, समाज आणि त्यांचे नीतीनियम यांनी बनलेले आपले विचार आपणास त्यातून काहीतरी भलतेच करावयास भाग पाडतात आणि आगीतून निसटलेला जीव फुफाट्यात अडकत राहतो. संसारात राहून संसारातील दुःखातून मुक्त होण्याचे संसारात कोणतेही साधन उपलब्ध नाही. संसार हा ज्या विचारांनी बनलेला आहे, त्याच विचारांचे दुःख बनलेले आहे.  

Insight अंतरदृष्टि हि अचानक असते, विचारपूर्वक केलेली कृती नसते, तिचा आपल्या पूर्वज्ञानाशी संबंध नसतो, तिचा उगम आपल्या स्मृतीमधून झालेला नसतो, तिचा आपल्या भूत काळाशी संबंध नसतो, तिचा काळाशी संबंध नसतो. अंतरदृष्टी म्हणजे संपूर्ण विचार प्रक्रियेचा अभाव असतो. तिथे सत्याचे प्रत्यक्ष दर्शन असते. आणि ही अंतर्दृष्टि आपल्या मेंदूमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत असते जी आपणास सत्य अवस्थेत प्रस्थापित करत असते.

सत्य अवस्था ही नित्य आहे परंतु आपले विचार तिला गाठू शकत नाहीत. त्या अवस्थेचे नामकरण आणि विवरण म्हणजे ती अवस्था नव्हे.