दोन व्यक्ती एकमेकांस जरी ओळखत असल्या तरी त्यांच्यात सुसंवाद असतोच असे नाही. एकमेकांना सांभाळून घेताना सुसंवाद आवश्यक आहे. सुसंवाद तेव्हाच शक्य होतो जेव्हा सर्वजण एकाच वेळी एकाच पातळीवर असतात, एकमेकांविषयी आपुलकी असते.
मी धार्मिक, अध्यात्मिक, मानसशास्त्र अथवा वैज्ञानिक वाचन करीत नाही त्यामुळे मी त्यातील अवघड संकल्पना मांडीत बसत नाही. साध्या सोप्या शब्दात आपण संवाद केला तर समजणे सहज होते.
परंतु जर आपण ते लक्षपूर्वक ऐकले नाही तर ते सुद्धा समजणे अवघड होवू शकते. ऐकणे ही सुद्धा एक कला आहे. ऐकताना आपण आपले सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवायला हवेत. संपूर्ण लक्ष दिले तर ऐकणे सुलभ होते. परंतु ऐकताना जर आतून विरोध असेल, भीती असेल, आसक्ती असेल तर ते ऐकले जात नाही. किंवा आपणास आपल्या दैनंदिन जीवनात काही त्रास होत असेल तरी सुद्धा ऐकण्यावर लक्ष लागू शकत नाही. म्हणजे आपण जे ऐकत असतो ते आपलेच ऐकत असतो, समोरचे जे सांगणे असते ते आपल्या आतमध्ये उतरत नाही. त्यामुळे एकमेकांचे ऐकणे हे अतिशय अवघड होवून गेले आहे आणि ती आपल्या सर्वांची समस्या बनली आहे.
कदाचित माझ्या सांगण्यात येणारे जे काही असेल ते आपणास रुचत नसेल, आपल्या श्रद्धाच्या ते विरुद्ध असेल, आपला त्यास विरोध असेल, मी चुकीचे सांगत असेन किंवा आपण चुकीचे ग्रह बनविले असतील तरी सुद्धा कृपया ते लक्षपूर्वक ऐका. कारण आपण लक्षपूर्वक ऐकले आणि त्यावर चिंतन केले तर त्यामधून आपणास सत्य म्हणजे काय असते याचे कदाचित आकलन होवू शकते.
J Krishnamurti, First and last freedom, Introduction
