संपूर्ण विश्व हे त्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेने चालत असते. हे पाहून मानवी मन आपली स्वतःची वैयक्तिक बुद्धिमत्ता तयार करते. वैश्विक बुद्धिमत्ता हि नैसर्गिक असते, ती असिमित असते, ती कालबध्द नसते. तर मानवी बुद्धिमत्ता हि वैचारिक असते, ती कालबध्द असते, संकुचित असते. संकुचित, कालबध्द असणारी मानवी वैचारिक बुद्धिमत्ता ज्या संकल्पना तयार करते त्यामध्ये मूलभूत विभाजन असते ज्यामुळे वैचारिक संकल्पनांचे पुढे अजून विभाजन होत जाते आणि त्या विभाजित दुहिमध्ये संघर्ष होत राहतो.
मी हा एक विचार असतो आणि तो विचार करून जी संकल्पना बनवितो ती सुद्धा विचार असतात. परंतु इथे मी हा त्याच्या संकल्पना पासून स्वतःस वेगळा समजत असतो. हे जे मूलभूत विभाजन असते ते पुढे प्रत्येक विचारात उतरते आणि सर्व विचारामध्ये संघर्ष होत राहतात.
सर्व मानवांनी एकोप्याने, सदाचाराने, सुरक्षित रहावे यासाठी देव, देश, धर्म आदि संकल्पना पूर्वी निर्माण झाल्या होत्या. परंतु त्यातून नंतर अनेक देव, अनेक देश आणि अनेक धर्म तयार झाले. या अनेकात संघर्ष होत राहिले आणि मानव त्याच्याच वैचारिक संकल्पनेमुळे असुरक्षित झाला आहे.
जर मानवी बुद्धिमत्ता मानवाला असुरक्षित करीत असेल तर वैश्विक बुद्धिमत्ता मानवाला का मदत करीत नाही?
वैश्विक बुद्धिमत्ता हि सर्वत्र असतेच असते फक्त आपल्या मानवी बुद्धिमत्तेमुळे ती दिसून येत नाही. मानवी बुद्धिमत्तेने ज्या काही संकल्पना बनविल्या आहेत त्या पासून आपण वेगळे झालो की आपणास वैश्विक बुद्धिमत्तेचे दर्शन होते. यासाठी प्रत्येक मानवी संकल्पनांना त्या कितीही महान असल्या तरी त्यांना राम राम म्हणणे अनिवार्य ठरते. आपल्या परंपरा आणि त्यांच्या श्रद्धा आणि त्यांची भीती या आपणास तसे करण्यापासून परावृत्त करतात.
सर्व परंपरा आणि श्रद्धा यांचे मूळ असलेल्या वेदांनी त्यावर उपाय सांगितला होता - नेती नेती, न इति, न इति. जे जे काही वैचारिक आहे ते ते सत्य नव्हे.
वैश्विक बुद्धिमत्ता आपणाशी प्रत्यक्ष संवाद करू शकत नाही त्यामुळे वैचारिक बुद्धिमत्तेनेच स्वतःचा धोका ओळखून, स्वतःस यथार्थ ओळखून, स्वतःस नजरबंद करणे आवश्यक असते. आणि हे आपण स्वतः करू शकतो त्यासाठी बाहेरचे कोणीही मदत करू शकत नाहीत.
