Monday, May 03, 2021

तथ्य आणि भास

जीवनातील तथ्य आणि जीवनातील भास हे दोन वेगवेगळे विभाग आहेत. मनुष्य सोडून इतर सर्व जीवसृष्टी हि फक्त तथ्य मध्ये जगत असते. मनुष्याने आपली बुद्धिमत्ता वापरून अफाट विचार निर्मिती केली आहे. या विचाराने त्याने भौतिक प्रगती करून आपले जीवन अधिकाधिक सुखी आणि सुरक्षित केले आहे परंतु त्याच विचारांनी बनविलेल्या इतर मानसिक संकल्पना मुळे त्याचे जीवन त्याने मनोरुग्ण करून दुःखी केले आहे.

आपले विश्व आणि आपले शरीर आणि आसपासचे सर्व नैसर्गिक जीव हे आपण बदलू शकत नाही ते जसे आहे तसे स्वीकारावे लागते त्यामध्ये त्या अर्थाने निवडानीवड करता येत नाही, त्यांना टाळता येत नाही. मी माझे शरीर निवडू शकत नाही, माझे आई वडील निवडू शकत नाही, माझे भाऊबंद निवडू शकत नाही, माझे शेजारी, माझा समाज आदि मी जसे असतील तसे स्वीकारून त्या प्रमाणे राहतो. 

निसर्गाने प्रत्येक जीवास त्याच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी विचार करण्याची सोय केली आहे. इतर सर्व जीव विचारांचा तेव्हढाच विचार करतात फक्त मनुष्य प्राणी अधिक, अवांतर विचार करतो. मनुष्य प्राणी सुद्धा फक्त जीवनावश्यक विचार करून नैसर्गिक अवस्थेत राहू शकतो. इथपर्यंत विचार ठीक आहेत, आवश्यक आहेत, नैसर्गिक आहेत, त्यांना थांबविता येत नाही.

परंतु जे इतर अवांतर विचार आहेत जे कल्पना बनविते आणि त्या कल्पना रंजन करीत मनुष्य प्राणी काल्पनिक जीवन जगू लागतो, मरू आणि मारू लागतो ते गैर आहेत. 

कृष्णमूर्ती सारख्या विचारवंतांच्या हे द्वैत लक्षात येते आणि ते सांगतात की, जे काही नैसर्गिक आहे ते जसे आहे तसे स्वीकारा (what is) न बदलता (choiceless). आणि जे जीवनावश्यक विचार आहेत (reality) ते सुद्धा आवश्यक आहेत, त्यांना सुद्धा राहू द्या. फक्त ज्या धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक व्यवस्था आपण विचारांच्या माध्यमातून बनविलेल्या आहेत आणि ज्या मानसिक संकल्पना मुळे आपण दुःख भोगतो फक्त त्याचे आकलन करा आणि त्यांचे खंडन करा. त्या मानसिक व्यवस्था कशा परंपरेतून तयार झाल्या हे ते स्पष्ट करतात, त्यामुळे मानसिक परंपरा मोडीत काढणे किती अगत्याचे आहे हे ते आयुष्यभर सांगत राहिले. मानसिक परंपरा आणि त्यांची अव्यवस्था लक्षात येणे ही Insight आहे त्यासाठी आत्मसाक्षात्कार लागत नाही की अपरोक्ष अनुभूती लागत नाही. हे सर्व थोतांड स्वार्थी विचारातून निर्माण झालेले आहे. 

आता या नंतर आपण समुद्र आणि समुद्रावरील लाटा या विषयाकडे येवू. वर सांगितल्या प्रमाणे तथ्य काय आहे आणि भास काय आहे हे आपण आपल्या सतसत्विवेक बुद्धी ने ओळखणे महत्वाचे आहे. हा दृष्टांत आहे त्या द्वारे असे समजविन्याचा प्रयत्न आहे की समुद्र हे एक तथ्य आहे आणि त्यावरील लाटा/फेस हे भास आहेत. 

शेत जमिनीत गवत सुद्धा उगवणार आणि पिके सुद्धा उगवणार. गवत उगवले म्हणून आपण शेत जमीन नाकारू शकत नाही, पिके नाकारू शकत नाही फक्त गवत जे अनावश्यक आहे ते उपटून फेकून देणे हि सत्सत्विवेक बुद्धी आहे. 

कृष्णमूर्ती जेव्हा आपण आणि झाड यांचे उदाहरण देवून म्हणतात की द्रष्टा आणि दृष्य एक आहे तेव्हा त्यांचा असा उद्देश नसतो की आपण म्हणजे झाड आणि झाड म्हणजे आपण. आणि ते हे नेहमी स्पष्ट करतात. 

जेव्हा आपण विचार करीत मी मी म्हणत असतो ते आपण म्हणजे आपला मानसिक मी होय, मी ची आपण मानसिक प्रतिमा बनविलेली असते आणि झाडाचा अनुभव येतो तो त्या झाडाच्या मानसिक प्रतीमेतून. या दोन्ही प्रतिमा आहेत, त्या स्मृतीमध्ये आहेत म्हणून ते मानसिक भास दृष्ट्या एक आहेत. प्रत्यक्षात आपले शरीर आणि झाड वेगवेगळे आहेत.